-
राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शनिवारी ( १२ ऑगस्ट ) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात पुण्यात भेट झाली. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सुद्धा उपस्थित होते.
-
त्यामुळे जयंत पाटीलही अजित पवारांच्या गटात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या चर्चांवर जयंत पाटील यांनी भाष्य केलं आहे. ते सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
-
जयंत पाटील म्हणाले, “मी अजित पवारांच्या गटात जाणार असल्याच्या चर्चा का होतात? याची मला कल्पना नाही. मी राष्ट्रवादी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष असून, शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काम करतो आहे. अजित पवार आमच्यापक्षात आहेत.”
-
“पण, अजित पवारांनी पक्षात काही बदल केल्याचे पत्र निवडणूक आयोगाला पाठवले आहे. शरद पवारांच्या वतीने आमचं उत्तर पाठवलं आहे. त्यामुळे निवडणूक आयोगामध्ये भविष्यात न्यायनिवाडा होईल. घरातील वाद घरात संपण्यासाठी कोणताही शहाणा माणूस प्रयत्न करेल,” असे जयंत पाटील यांनी म्हटलं.
-
“शक्यतो बेरजेचं राजकारण करायचं असते. भागाकार आणि वजाबाकी होऊ नये, हा प्रयत्न कोणत्याही पक्षाच्या अध्यक्षाने करायचे असतो. हा प्रयत्न मी एकटाच नाहीतर, शरद पवारांच्या संबंधातील बरेच हितचिंतक हा प्रयत्न करत आहेत,” असं जयंत पाटलांनी सांगितलं.
-
“आम्ही यशवंतराव चव्हाण किंवा शरद पवारांच्या संस्कृतीत राजकारण करणारे लोक आहोत. अचानक पक्षातून माणसे बाहेर जात असतील, तर हे टाळण्याचा प्रयत्न आवश्यक आहे. अन्यथा लढाई सुरु झाली, तर होणारच आहे,” असेही जयंत पाटलांनी म्हटलं.
झटका मटणासाठी नितेश राणेंनी आणलं मल्हार प्रमाणपत्र; म्हणाले, “सर्टिफिकेट नसेल तर हिंदूंनी…”