-
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेल्या मराठा आक्रोश मोर्चातील आंदोलकांवर झालेल्या पोलिसांच्या लाठीचार्जवर प्रतिक्रिया दिली आहे.
-
यात राज ठाकरेंनी जालन्यात मराठा मोर्चातील आंदोलकांवर लाठीमार करणं यात प्रशासन आणि सरकार चुकलं असं स्पष्ट मत मांडलं.
-
या प्रकरणावर राज ठाकरे नेमकं काय म्हणाले याचा हा आढावा…
-
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात काल मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून सुरु असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांकडून लाठीमार झाला आणि गर्दी पांगवण्यासाठी हवेत गोळीबारही झाला – राज ठाकरे
-
ही घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि मी याचा निषेध नोंदवतो. या घटनेवर मी कालपासून लक्ष ठेवून आहे आणि या घटनेवर येणाऱ्या प्रतिक्रिया पाहत होतो – राज ठाकरे
-
मुळात मराठा समाजाने आरक्षणासाठी जी आंदोलनं केली, त्या आंदोलनांचा इतिहास बघितला, तर मी माझ्या अनेक सभांमध्ये म्हणलं तसं की, ती आंदोलनं, मोर्चे याचा आदर्श जगाने घ्यावा इतकी शांततेत आणि समंजसपणे झाली होती – राज ठाकरे
-
अशी पार्श्वभूमी असताना जालन्यात काल काय असं घडणार होतं की प्रशासनाने असं टोकाचं पाऊल उचललं? – राज ठाकरे
-
पोलिसांच्या अहवालात माहिती येईलच, पण मी खात्रीने सांगतो की, पूर्व-इतिहास बघता आंदोलकांनी कोणतंच चुकीचं पाऊल नसतं टाकलं. त्यामुळे इथे सरकारचं चुकलं हे निश्चित – राज ठाकरे
-
राहता राहिला प्रश्न या संवेदनशील विषयाचा, तर याला आत्ताचे आणि आधीचे सगळेच जबाबदार आहेत – राज ठाकरे
-
मराठा समाजाला आरक्षण देणं खरंच शक्य आहे का? ते न्यायालयात टिकेल का? – राज ठाकरे
-
बरं आरक्षण देऊन मराठा समाजातील मुलामुलींना देण्यासाठी किती सरकारी नोकऱ्या आहेत? – राज ठाकरे
-
त्या जोडीला या समाजातील तरुण तरुणींना स्पर्धात्मक जगात घौडदौड करण्यासाठी कसं तयार करता येईल यासाठी प्रामाणिक प्रयत्न होत आहेत का? – राज ठाकरे
-
इथे घोषणा केलेल्या योजनांबद्दल बोलायचं नाहीये तर प्रयत्नांबद्दल बोलायला हवं – राज ठाकरे
-
मुळात हा प्रश्न फक्त मराठा समाजाच्या आरक्षणापुरता नाहीये, तर एकूणच मराठी तरुण-तरुणींच्या रोजगाराशी संबंधित आहे – राज ठाकरे
-
साध्या तलाठी भरतीसाठी जर लाखभर अर्ज येत असतील आणि भरती अवघ्या शेकड्यात होणार असेल, तर मराठी मुलांच्या मनात काय धुमसतंय याचा विचार करावा लागेल – राज ठाकरे
-
शिकलीसवरलेली मुलं नोकरीच्या शोधात वणवण फिरत आहेत, हे चित्रं चांगलं नाही – राज ठाकरे
-
त्यामुळे उगाच भूलथापा देणं किंवा एकमेकांवर आरोप करून स्वतःची मान काढून घेणं या दोन्ही गोष्टी आधीच्यांनी आणि आत्ताच्यांनी करू नयेत – राज ठाकरे
-
काल जे घडलं त्यात प्रशासनाची चूकच आहे, पण ते ज्या कारणांनी घडलं, त्याला गेल्या २० वर्षांत महाराष्ट्राचं विस्कटलेलं राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण जबाबदार आहे – राज ठाकरे
-
यावर दीर्घकालीन उपायांची गरज आहे – राज ठाकरे
-
चकवा देऊन सरकार बनवणं आणि ते पाडून दुसरं सरकार आणणं, यातून जे काही शौर्य दाखवायची खुमखुमी होती, ती खुमखुमी आता मिटली असेल असं आम्ही मानतो – राज ठाकरे
-
त्यामुळे आता दोषारोप नकोत तर कृती अपेक्षित आहे – राज ठाकरे
-
माझी तमाम मराठा समाजातील बांधवांना विनंती आहे की या घटनेचे पडसाद उमटू देऊ नका – राज ठाकरे
-
तुम्ही आंदोलनं आणि मोर्चांचा आदर्श घालून दिला आहे, तो खरंच वाखाणण्यासारखा आहे – राज ठाकरे
-
तुमचा राग समजू शकतो, पण तुम्ही कोणाच्या राजकारणाला आणि भूलथापांना बळी पडणार नाही याबद्दल मला आणि माझ्या पक्षाला खात्री आहे – राज ठाकरे
-
मराठी माणसाच्या आक्रोशातून उभ्या राहणाऱ्या कुठल्याही आंदोलनाच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आजपर्यंत उभी राहिली आहे आणि यापुढे पण राहील – राज ठाकरे
-
मनसेने व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, माय-भगिनीच्या रक्तबंबाळ शिरावर भळभळणारी जखम महाराष्ट्राच्या समाजमनावर आता खोलवर रुतली आहे. ही संतापजनक घटना आहे.
-
“हा कोणता अमानुषपणा? एखादा प्रश्न हाताळण्याची ही कोणती पद्धत? प्रश्न मिटवायचा होता की चिघळवायचा होता?”; असा प्रश्न मनसेने शिंदे-फडणवीस-पवार सरकारला विचारला. (सर्व छायाचित्र – संग्रहित, लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

‘झी मराठी’ची मालिका संपली; आता लोकप्रिय अभिनेत्रीची ‘स्टार प्रवाह’च्या मालिकेत एन्ट्री! पहिल्यांदाच साकारणार खलनायिका