-
राहुल गांधींच्या प्रत्येक मुद्द्याला मोदींनी सव्वादोन तासांच्या भाषणामध्ये तितकेच कडवे प्रत्युत्तर दिले. ‘काँग्रेसच्या देशविरोधी कारस्थानांना मोदी घाबरत नाही, माझे सरकारही घाबरत नाही. ‘विकसीत भारता’चा संकल्प आम्ही पूर्ण करू. २०१४ आणि २०१९ मध्ये विरोधकांनी मला आत्ता इतकाच विरोध केला होता. पण, माझी उमेद, माझा आवाज तितकाच बुलंद झालेला आहे’, अशा शब्दांत मोदींनी काँग्रेससह विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीच्या लोकसभेतील वाढलेल्या ताकदीलाच आव्हान दिले. (सर्व फोटो- संसद टीव्ही)
-
पंतप्रधान मोदींनी काल (२ जुलै) त्यांच्या भाषणात काँग्रेसवर जोरदार हल्ला चढविला आहे, जाणून घेऊयात ते काय म्हणाले.
-
लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा ‘बालकबुद्धी’ असा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लोकसभेत काँग्रेसवर हल्ला चढवला. काँग्रेसने अख्ख्या हिंदू समाजाचा अपमान केला असून देश कधीही माफ करणार नाही, असे ठणकावतानाच काँग्रेस देशात अराजक माजवत असून जनतेने काँग्रेसच्या खोटेपणापासून आणि षड्यंत्रांपासून सावध राहिले पाहिजे, असा इशारा मोदींनी दिला.
-
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान राहुल गांधींनी मोदी व भाजपच्या धोरणांचे वाभाडे काढले होते.
-
‘काँग्रेसने माजवलेल्या कोलाहलामध्ये सत्याचा आवाज कधीही दबून जाणार नाही. खोटेपणाला मुळे नसतात, हा खोटेपणा टिकणार नाही. लोकसभेमध्ये मला सत्याची ताकद पाहायला मिळाली, त्याचा मला आनंद होत आहे’, असे म्हणत मोदींनी राहुल गांधींना अप्रत्यक्ष टोला दिला.
-
२०२४ मधील काँग्रेस पक्ष ‘परजीवी काँग्रेस’ म्हणून ओळखला जाईल, अशी टीका मोदींनी केली. मित्र पक्षांना संपवून काँग्रेस टिकून राहण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपविरोधातील थेट लढाई काँग्रेसचे जिंकणारे प्रमाण (स्ट्राइक रेट) फक्त २६ टक्के होते. मित्र पक्षांची मदत मिळाली तिथे हे प्रमाण ५० टक्क्यांवर गेले. काँग्रेसला मिळालेल्या ९९ जागा मित्र पक्षांच्या मदतीनेच मिळाल्या आहेत, असे मोदी म्हणाले.
-
जनतेने सावध रहावे
काँग्रेस देशात अराजक परसवत असून जनतेने सावध राहिले पाहिजे. कधी दक्षिण विरुद्ध उत्तर तर, कधी भाषांच्या मुद्द्यांवरून फूट पाडली जात आहे. काँग्रेस लोकांना जाती-जातींमध्ये लढवत आहे. लोकांमध्ये वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जात असून आर्थिक अराजकही माजवण्याचे कटकारस्थान काँग्रेस करत आहे. काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये घेतले जाणारे आर्थिक निर्णय देशावर आर्थिक ओझे बनेल. तसा जाणीपूर्वक खेळ काँग्रेस खेळत आहे. काँग्रेसने ‘सीएए’वरून अराजक माजवले. दंगली भडकवण्याचा प्रयत्न होत आहे, असा गंभीर आरोप मोदींनी केला. -
काँग्रेसचा तिसरा पराभव
गेल्या तीन निवडणुकीत काँग्रेसला शंभर जागादेखील मिळवता आलेल्या नाहीत. काँग्रेसचा हा तिसरा मोठा पराभव आहे. खरेतर काँग्रेसने आत्मपरिक्षण केले पाहिजे. काँग्रेसने विकासामध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न करू नये. त्यांच्या प्रत्येक षडयंत्रांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले जाईल. देशविरोधी कारस्थान आम्ही सहन करणार नाही, असा इशाराही मोदींनी दिला. -
काँग्रेस दलितविरोधी
काँग्रेसने संविधानाचे रक्षणकर्ता असल्याचाही खोटेपणा केला आहे. आणीबाणी लादून क्रुरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. दलित, ओबीसींवर अन्याय केला. काँग्रेसच्या दलित विरोधी धोरणांमुळेच डॉ. आंबेडकरांनी नेहरूंच्या मंत्रिमंडळातून राजीनामा दिला होता. डॉ. आंबेडकरांना निवडणुकीत पराभूत केले गेले, त्यांचा पराभव साजरा केला गेला. इंदिरा गांधी मंडलविरोधी होत्या. राजीव गांधी आरक्षणविरोधी होते, असा आरोप मोदींनी केला. -
देशाची दिशाभूल
काँग्रेसना खोटेपणाला राजकारणाचे हत्यार बनवले आहे. काँग्रेसने देशाची दिशाभूल केली आहे. महिलांना ८,५०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, तिचे काय झाले? काँग्रेसने मतदानयंत्र, संविधान, आरक्षण, राफेल, एचएएल, एलआयसी, बँक अशा अनेकांबद्दल खोटे बोलण्याचा प्रयत्न केला. खोटेपणा काँग्रेसच्या नसानसांत मुरलेला असून हा खोटेपणा जनतेच्या विवेकाच्या कानाखाली मारण्याचा निर्लज्जपणा काँग्रेसने केला आहे. काँग्रेसला तिसऱ्यांदा विरोधी बाकांवर बसण्याचे जनमत मिळाले आहे. तर्क संपले असतील तर फक्त आरडत राहा, अशी उपहासात्मक टिप्पणी मोदींनी केली.
![Natasa Shares Cryptic Video As Hardik Pandya Returns](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/07/hardik_natasha.jpg?w=300&h=200&crop=1)
हार्दिक पंड्याची पत्नी नताशाने टीम इंडिया भारतात येताच केलेली पोस्ट पाहून घटस्फोटाच्या चर्चांना उधाण; लिहिलं, “तेव्हा माझं रक्षण..”