शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची आज, गुरूवार (२३ जानेवारी ) जयंती आहे. जयंतीचे औचित्य साधत त्यांनी रेखाटलेली व्यंगचित्रे आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्र काढतांना… फ्री प्रेस जर्नलमधून व्यंगचित्रकार म्हणून बाळासाहेबांनी आपली कारकीर्द सुरू केली होती. त्यानंतर त्यांनी मार्मिकमध्ये नियमितपणे व्यंगचित्रं काढणं सुरू ठेवलं. बाळासाहेब ठाकरे हे राष्ट्रीय पातळीवरील एक अग्रगण्य व्यंगचित्रकार होते. घटना-प्रसंगांतील विसंगती, विरोधाभास टिपण्यातली त्यांची विचक्षणता, रेषांवरील कमालीची हुकूमत, व्यंगचित्राचा विषय ठरलेल्या व्यक्तींचा गाढा अभ्यास आणि आपल्या विलक्षण कल्पनाशक्तीने त्यांची व्यंगचित्रे त्याकाळी खूप गाजली. 'व्यंगचित्रकार बाळासाहेबां'चं हे रूप… स्वातंत्र्य अगदी उंबरठय़ावर आलेलं होतं, पण मिळालेलं नव्हतं. त्यावेळचे एक चित्र बाळासाहेबांनी काढलंय (३१-५-४७). ब्रिटिश सरकारशी सल्लामसलत करून लॉर्ड माऊंटबॅटन पुन्हा भारतात परतले, ही बातमी होती. बाळासाहेबांनी चित्राला नाव दिलं- ‘द जगलर इज बॅक अगेन!’ हा रस्त्यावरचा मदारी आता कोणकोणती हातचलाखी करतोय, हे चित्रात दिसतंय. पण त्याकडे अविश्वासाने बघणाऱ्या मुलांमध्ये बॅ. जिना (लुंगी नेसलेले), शालेय वेषातील नेहरू आणि चिंताक्रांत संस्थानिक दिसताहेत. १९५१ सालातल्या प्रजासत्ताकाच्या पहिल्या वर्धापनदिनी ठाकरे यांचे एक चित्र अत्यंत वेगळं व विलक्षण उठावदार आहे. विशेष म्हणजे त्यात पं. नेहरूंचे अर्कचित्र नसून रिअॅलिस्टिक स्केच आहे. परंतु गांधीजींचा नेहरूंवरचा प्रभाव दाखवण्यासाठी पाश्र्वभूमीवर तेजाची उपमा देताना ठाकरे यांच्यातील व्यंगचित्रकार दिसतो. एका चित्रात पाकिस्तानला अमेरिकेने शस्त्रं दिली, आता प्रशिक्षणही देणार, अशी बातमी आहे. व्यंगचित्रात पाकिस्तानचे मंत्री बंदूक उलटी धरून स्वत:वरच नेम धरताहेत असं चित्रण आहे. मथळा आहे- डिफेन्स और सुइसाईड? पाकिस्तानने सीमेवर हल्ले केले की त्याचा निषेध करणारं पत्र पाठवायचं, हे आपलं धोरण आहे. ते अर्थातच त्या काळातही होतंच. एका चित्रात पाकिस्तानचे आयुबखान हातात बंदूक (अर्थात अमेरिकन) घेऊन उभे आहेत. त्याला प्रत्युत्तर देताना आपले मंत्रीही निषेधाची कागदी भेंडोळी घेऊन पाकला धमकावत आहेत! ‘जागतिक शांततेसाठी युद्धाची तयारी करावी लागते’ या बातमीला अनुसरून त्यांनी सैनिकी वेषातील कबुतर हे विसंगती दाखवणारं प्रभावी चित्र काढलंय. पहिल्या पंचवार्षिक योजनेचं काम याच काळात सुरू झालं. यावरच्या चित्रात जमिनीची मशागत करून नेहरू व अर्थमंत्री सी. डी. देशमुख हे खऱ्या अर्थानं बीजं रोवताहेत असं चित्रण आहे. मात्र, त्याच वेळी झाडाच्या फांदीवर कावळ्यांच्या रूपातले टीकाकार बसलेलेही ठाकरे यांनी दाखवले आहेत. या योजनेची माहिती जनतेला व्हावी म्हणून लोककलांच्या माध्यमातून ती पसरवण्याची योजना नभोवाणी मंत्रालयाने मांडली. त्यावरचं ठाकरे यांचं व्यंगचित्र अत्यंत खुमासदार आहे. (मेलडी टाइम). या चित्रात सी. डी. देशमुख पेटी वाजवणाऱ्याच्या रूपात आहेत, नंदा पिपाणी वाजवताहेत, तर नभोवाणी मंत्री केसकर नृत्यांगनेच्या भूमिकेत. या चित्रातील प्रेक्षकांचे हावभावही बघण्यासारखे आहेत. ‘पंचवार्षिक योजनेमध्ये परकीय गुंतवणूक आली तर तिचं स्वागत करावं, अर्थात त्यात भारताचा आत्मसन्मान कायम राहणार असेल तरच!’ या सी. डी. देशमुखांच्या विधानावरचं व्यंगचित्रही प्रभावी आहे. अमेरिका-चीन यांच्यातल्या तत्कालीन संबंधावरच्या त्यांच्या चित्राची कल्पना गमतीदार आहे. त्याचबरोबर आशयही सामान्य वाचकाला पटकन् कळेल असा आहे. भारत-चीन संबंध हे तिबेट प्रकरणावरून जेव्हा तणावग्रस्त झाले तेव्हाचं त्यांचं ‘बॅड कॉइन’ हे चित्रही असंच प्रभावी आहे. जिनिव्हा येथील परिषदेमध्ये कृष्ण मेनन हे अखेपर्यंत जागतिक शांततेसाठी प्रयत्न करत होते. या बातमीवर व्यंगचित्र रेखाटताना बाळासाहेबांनी कृष्ण मेननमधला फक्त कृष्ण घेतला. त्याच्या हातात बासरी दिली, पण त्याच्या (शांततेच्या) बासरीवादनाला आजूबाजूचे मस्तवाल गाई-बैल (अर्थातच बडी राष्ट्रं) दाद देत नाहीत असे झकास चित्र रेखाटले. यात अर्थातच प्रत्येक गुराला त्या-त्या राष्ट्रप्रमुखाचे कॅरिकेचर चिकटवले आहेच! चेहऱ्यावरचे नेमके हावभाव रेखाटणं हाही ठाकरे यांचा विशेष पैलू म्हणावा लागेल. ‘विवाहविषयक कायदा’ संसदेने संमत केल्यावरचं त्यांचं ‘कन्यादान’ हे चित्र अवश्य पाहण्यासारखं आहे. विशेषत: उपवर मुलीचं रेखाटन. ‘आराम हराम है’ हा तर नेहरूंनी दिलेला अजरामर संदेश आहे. यानिमित्ताने काढलेल्या चित्रातील काँग्रेसचे नेते अगदी टिपिकल म्हणावेत असेच आहेत. एखाद्या पात्राची विशिष्ट वेशभूषा रेखाटावी तर ती बाळासाहेबांनीच! ‘लास्ट चान्स’ या मथळ्याखाली गोवा पोर्तुगीजांच्या अंमलाखालून दूर होतानाचा कडय़ावर लटकलेल्या पोर्तुगीज सरकारचा वेश आणि आवेश पाहण्यासारखा आहे. महत्त्वाचं म्हणजे पाश्र्वभूमीवर पाँडेचरीहून परतणारे फ्रेंच सैनिक आहेत. ‘व्हिक्टरी परेड’ या चित्रात अन्नमंत्री किडवाई यांना वेल डन ‘किड’! असं म्हणून शाबासकी देणारे नेहरू आहेत. पण धान्याची पोतीच सैनिकांप्रमाणे सलामी देताहेत, ही कल्पनाच गमतीशीर आहे! समाजवादी मंडळींवर बाळासाहेबांची विशेष ‘माया’ असावी. त्यांच्या अनेक व्यंगचित्रांतून ही मंडळी बरीच गमतीजमती करताना दिसतात. त्यातल्या दोन चित्रांचा उल्लेख केलाच पाहिजे अशी आहेत. विनोबा भावे यांची ‘भूदान’ चळवळ ऐन भरात असताना त्याचा राजकीय फायदा घ्यायला काँग्रेसने सुरुवात केली. त्याबद्दल समाजवादी (निष्क्रिय) नेते (अशोक मेहता, लोहिया वगैरे) यांनी काँग्रेसवर टीका करायला सुरुवात केली. याचं चित्रण अतिशय परिणामकारक आहे. कारण या चळवळीत जयप्रकाश नारायण यांचा प्रत्यक्ष सहभाग यातून दिसतोच, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे विनोबाजींची फक्त दाढी दाखवून त्यांचं व्यक्तिमत्त्व उभं केलंय. एका शाळेच्या वर्गातील आदर्श शिक्षक व उनाड विद्यार्थी या वातावरणाचे ‘समाजवादी’ दर्शन पाहायचे असेल तर ‘पिटी द आचार्यजी’ हे चित्र पाहावं लागेल. यात अनेक नेते वेगवेगळ्या कोनांतून व हावभावांसकट रेखाटले आहेतच, पण समाजवादी मंडळींची पुढे एकमेकांशी न पटण्याची लक्षणंही यात स्पष्टपणे दिसतात. सीमाप्रश्नाच्या निमित्ताने एसेम जोशी व इंदिरा गांधी यांची भेट यावरचं चित्रही बोलकं आहे. विशेषत: काँग्रेसचा नागपूर ठराव आणि महाराष्ट्रवाद्यांचा नागपूर पॅक्ट यादरम्यानची दोन मोठय़ा नेत्यांमधली शांतता खूप बोलकी आहे. स्वातंत्र्यानंतरचा नवखेपणाचा कालावधी लोटल्यानंतर देशापुढचे आर्थिक व औद्योगिक प्रश्न भेडसावण्याचा तो काळ होता. पब्लिक सेक्टर आणि प्रायव्हेट सेक्टर यांच्यातला संघर्ष, तणाव, सवलती, कर्ज, धोरणं यांतील बॅलन्स साधताना होणारी नेहरू राजवटीची तारांबळ ही बाळासाहेबांनी टिपिकल व्यंगचित्रकाराच्या नजरेतून टिपली आहे. आजही प्रायव्हेट आणि पब्लिक सेक्टरमधील संघर्ष चालूच आहे. यावेळी, देश म्हणून भूमिका घेतली पाहिजे, हे या व्यंगचित्रातील भाष्य कालातीत आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये एक इरसाल व्यंगचित्रकारही लपला आहे. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे त्यांचं ‘धोबी सेन्स’ हे खळखळा हसायला लावणारं व्यंगचित्र! त्यावर काही बोलण्यापेक्षा ते प्रत्यक्ष अनुभवलेलंच बरं!
भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”