-
नीति आयोगाच्या नियामक परिषदेच्या रविवारी झालेल्या बैठकीमधील एक फोटो सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. या बैठकीला उपस्थित असणाऱ्या सर्व मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नीति आयोगाच्या अधिकाऱ्यांचा हा फोटो असून या फोटोत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अगदी शेवटच्या रांगेत उभे असल्याचं दिसत आहे.
-
नीति आयोगाच्या बैठकीनंतर काढण्यात आलेल्या या फोटोमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शेवटच्या रांगेत स्थान देणे हा मराठीजनांचा अपमान आहे, अशी प्रतिक्रिया रोहीत पवार यांनी दिली आहे. “एकनाथ शिंदे हे मोठे नेते आहेत. तसेच ते देशाच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. तरीही त्यांना शेवटच्या रांगेत स्थान देणं योग्य नाही. प्रत्येक मराठी मनाला यामुळे नक्कीच दुःख झाले आहे. यापुढं असं होणार नाही याची दक्षता केंद्र सरकार घ्यावी”, असे ट्वीट रोहित पवार यांनी केले आहे. रोहित यांच्याबरोबरच इतर अनेक जणांनी या फोटोवरुन ट्विटरवरुन मत व्यक्त करताना अगदी फिल्मी स्टाइलपासून एकनाथ शिंदेंच्याच्या आधीच्या वक्तव्यांच्याही संदर्भ दिल्याचं चित्र दिसत आहे. जाणून घेऊयात या फोटोसंदर्भातील सोशल मीडियावरील चर्चा…
-
हे अजून एक ‘एकनाथ कुठं आहे?’वालं मीम
-
या फोटोला एकाने गेला कुठं रं? शोधू कुठं रं अशी कॅप्शन दिली आहे.
-
रोहित पवार यांनी केलेल्या या ट्विटवरुन शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना अगदी शेवटच्या रांगेत उभं केलं आहे, असं रोहित पवार यांनी फोटो ट्विट करत म्हटलं आहे, असं म्हणत उदय सामंत यांची या विषयावरील प्रतिक्रिया पत्रकारांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावर उत्तर देताना उदय सामंत यांनी, “फोटो बघितल्यावर एक लक्षात येतं की एकनाथ शिंदे केवळ फोटोसाठी तिथे उभे होते,” असं म्हटलं आहे.
-
तसेच उदय सामंत यांनी पुढे, “याच्या आगोदरचा एक प्रसंग मी आपल्याला सांगू इच्छितो,” असं म्हणत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमात शिंदे पहिल्या रांगेत होते याची आठवण करुनदिली. “राष्ट्रपतींचा शपथग्रहण सोहळा ज्या दिवशी झाला त्या दिवशी एकनाथ शिंदे हे पहिल्या रांगेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बाजूला होते. ते कोणाला दिसलं नाही हे आपलं दुर्दैव आहे,” असं उदय सामंत म्हणाले.
-
“कुठं तरी राजकारणासाठी राजकारण करण्यात अर्थ नाही. महाराष्ट्राचा मान-सन्मान दिल्लीमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने नक्की वाढलेला आहे. त्याची प्रचिती ओबीसी आरक्षणापासून अनेक गोष्टींमधून आलीय. शिंदेंचा अपमान केलाय असं मला तरी वाटत नाही,” असं उदय समांत यांनी म्हटलंय.







