अमरावती : मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सरकारचा लेखाजोखा मांडण्यासाठी आयोजित सभेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेले सूचक वक्तव्य, आमदार रवी राणांच्या मतदारसंघात भाजपने उघडलेली आघाडी यामुळे नेहमीच भाजपची बाजू मांडणाऱ्या राणा दाम्पत्याची कोंडी झाली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावतीत कार्यकर्त्यांना ‘घर चलो अभियान’ प्रभावीपणे राबविण्याचा कानमंत्र दिला. ‘आता गरुडाने ठरवले आहे की, पुन्हा एकदा गगन भरारी घ्यायची. येवढी मोठी झेप घ्यायची आहे की, महाराष्ट्रात २०० हून अधिक आमदार आणि लोकसभेमध्ये अमरावतीसह ४५ हून अधिक खासदार निवडून आणायचे आहेत’, असे वक्तव्य बावनकुळे यांनी केले आणि त्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देवेंद्र फडणवीस हे आमचे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वात आम्ही काम करीत आहोत, असे आमदार रवी राणा नेहमी सांगतात. खासदार नवनीत राणा यांनी नेहमीच भाजपची बाजू मांडली आहे. हनुमान चालिसा पठन आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी भाजपसाठी अनुकूल वातावरण निर्मिती केली. उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी राणा दाम्पत्य गमावत नाहीत, अशा स्थितीत चंद्रशेखर बावनकुळे यांचे वक्तव्य राणा समर्थकांना पसंत पडलेले नाही. रवी राणांचा युवा स्वाभिमान हा स्वतंत्र पक्ष आहे. पक्ष विस्ताराची राणा दाम्पत्याची महत्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. अशा स्थितीत भाजपला त्यांच्यासोबत युती करणे किंवा विरोधात उमेदवार देणे हे पर्याय आहेत. गेल्या निवडणुकीत नवनीत राणा या कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आल्या होत्या. निवडणुकीनंतर लगेच त्यांनी मोदी सरकारला पाठिंबा दिला. त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या वर्तुळात त्यांना मानाचे स्थानदेखील मिळाले, पण आता निवडणुका जवळ येताच भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची अस्वस्थता बाहेर येऊ लागली आहे. भाजप जर बाहेरच्या लोकांसाठी ‘गालिचा’ अंथरणार असेल, तर आम्ही केवळ ‘सतरंज्या’ उचलायच्या का, असा प्रश्न कार्यकर्ते विचारू लागले आहेत, त्यामुळेच अमरावती जिल्हा भाजपमय करण्याचा संकल्प भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी बोलून दाखविला.

हेही वाचा – जमाखर्च : गिरीश महाजन, खात्यांपेक्षा राजकारणातच अधिक मग्न

नवनीत राणांच्या पुढील राजकीय वाटचालीविषयी सध्या आडाखे बांधले जात आहेत. त्या भाजपच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार की, भाजपमध्ये प्रवेश करणार, याची उत्सुकता ताणली गेली आहे. भाजपमध्येही अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास काही उमेदवार इच्छूक आहेत. त्याचवेळी नवनीत राणा यांचे गेल्या निवडणुकीतील निकटचे प्रतिस्पर्धी उमेदवार आनंदराव अडसूळ यांनी आपली रवी राणांसोबत समेट झालेली नाही, हे स्पष्ट करून राणांच्या अडचणीत भर टाकली आहे.

आनंदराव अडसूळ हे शिवसेनेच्या शिंदे गटात सहभागी झाले आहेत. ते सत्तारूढ आघाडीतील असले, तरी आपण अमरावती मतदारसंघावरील दावा सोडलेला नाही, हे त्यांनी ठासून सांगितले आहे. रवी राणांच्या बडनेरा मतदारसंघातून भाजपचे माजी नगरसेवक तुषार भारतीय यांनी निवडणूक लढण्याची जोरदार तयारी केली आहे. त्यातून दोघांमध्ये चांगलेच खटकेदेखील उडाले आहेत. भाजपमधून इतरही काही नेते उमेदवारी मिळावी, म्हणून प्रयत्नात आहेत. भाजपला पाठिंबा देणाऱ्या रवी राणांसाठी ही डोकेदुखी ठरली आहे.

हेही वाचा – जमाखर्च : सुधीर मुनगंटीवार; चर्चेतच अधिक

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्रीदेखील आहेत. अमरावतीतील विकास कामांचे श्रेय भाजपला मिळावे, अशी अपेक्षा भाजपचे कार्यकर्ते बाळगून असतात, पण ही कामे आम्ही खेचून आणली, असा दावा राणा समर्थक करीत असतात. त्यामुळे आता श्रेयवादाचे राजकारण रंगले आहे. त्यातून भाजपला आणि राणा दाम्पत्यालादेखील वाट काढावी लागणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A challenge to the navneet rana and ravi rana political ambitions from the bjp itself print politics news ssb
Show comments