गेल्या १० वर्षांमध्ये दिल्लीतील भ्रष्टाचारविरोधी आंदोलनापासून सुरुवात झालेला आम आदमी पक्ष आता दोन राज्यांमध्ये स्वबळावर सत्तेत आहे. याच आत्मविश्वासाच्या जोरावर आता आम आदमी पक्षानं आगामी गुजरात विधानसभा निवडणुकांवरही दावा सांगितला असून तिथेही पक्षाला जिंकण्याची हमी वाटतेय. राष्ट्रीय पक्ष म्हणून आम आदमी पक्ष लवकरच अधिकृत दावा करण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर गुजरात निवडणुकांविषयी ठाम आत्मविश्वास असणारे दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी रविवारी गुजरातच्या सुरतमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत एक अनपेक्षित गोष्ट केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आम्ही अमुक निवडणूक जिंकणार असं अनेकदा वेगवेगळ्या पक्षाची नेतेमंडळी, पदाधिकारी आणि अगदी कार्यकर्तेही ठामपणे सांगत असतात. पण अरविंद केजरीवाल यांनी त्याहीपुढे एक पाऊल टाकत चक्क हे लिहूनच दिलं आहे. त्यामुळे पत्रकार परिषदेत उपस्थित अनेकांच्या भुवया उंचावल्या. अरविंद केजरीवाल यांच्या चेहऱ्यावर मात्र आपण जे बोललो आणि जे लिहून दिलं, ते सत्यात उतरणार असल्याचे हावभाव दिसून येत होते.

नेमकं झालं काय?

सुरतमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत अरविंद केजरीवाल यांनी गुजरातमधील सत्ताधारी भाजपावर टीकास्र सोडलं. “गुजरातमधली जनता भाजपाला इतकी घाबरते की त्यांना उघडपणे आम आदमी पक्षाला पाठिंबा द्यायची भीती वाटते”, असं ते म्हणाले. ओल्ड पेन्शन स्कीमविषयीही त्यांनी यावेळी भाष्य केलं.

Gujarat Election 2022: अहमदाबादमधून अमित शाह नावाच्या व्यक्तीला भाजपाकडून उमेदवारी

“पुढील वर्षी ३१ जानेवारीपर्यंत आम्ही ओल्ड पेन्शन स्कीम गुजरातमध्ये लागू करण्यासंदर्भात अधिसूचना काढू. मी हे फक्त हवेत बोलत नाहीये. पंजाबमध्ये आम्ही तसं नोटिफिकेशन काढलंही आहे”, असंही केजरीवाल यावेळी म्हणाले.

…आणि कोऱ्या कागदावर केजरीवालांनी चक्क लिहून दिलं!

यावेली केजरीवाल यांनी आप गुजरात विधानसभा निवडणुका जिंकणार असल्याचं फक्त विधान केलं नसून कोऱ्या कागदावर चक्क लिहून दिलं आहे. पत्रकार परिषदेत निवडणुकीसंदर्भात दावा केल्यानंतर केजरीवाल यांनी समोरचा कोरा कागद घेतला आणि त्यावर आपल्या सहीनिशी आप गुजरात निवडणुका जिंकणार असल्याचं लिहून पत्रकारांना दाखवलंही.

Gujarat Election 2022 : “दिल्लीतील ‘आप’चा ‘नमूना’ दहशतवादाचा…”; योगी आदित्यनाथ यांची केजरीवालांवर जहाल टीका

“२०१४मध्ये मी एका पत्रकाराला लिहून दिलं होतं…”

“अनेक लोक म्हणतात की राजकारणात माझी भविष्यवाणी खरी ठरते. २०१४मध्ये जेव्हा दिल्लीत निवडणुका झाल्या तेव्हा मी एका पत्रकाराला लिहून दिलं होतं की काँग्रेसला शून्य जागा मिळतील. कुणीही तेव्हा विश्वास ठेवला नव्हता. पण त्या निवडणुकीत काँग्रेसला शून्य जागा मिळाल्या होत्या. पंजाबच्या निवडणुकीत मी खूप सारी भाकितं केली होती. मी म्हटलं होतं नवज्योतसिंग सिद्धू हरतील. चन्नी दोन्ही जागांवरून हरतील. बादल यांचं पूर्ण कुटुंब हरणार”, असं अरविंद केजरीवाल यावेळी म्हणाले.

आज मी सगळ्यांच्या समोर लिहून भविष्यवाणी करतोय..गुजरातमध्ये आम आदमी पक्षाचं सरकार बननणार आहे. तुम्ही आज ही गोष्ट लिहून ठेवा. ही भविष्यवाणीही लिहून ठेवा. ही भविष्यवाणी खरी ठरणार आहे. २७ वर्षांच्या कुशासनानंतर आता गुजरातच्या जनतेची यांच्या तावडीतून सुटका होणार आहे”, असा ठाम विश्वास केजरीवाल यांनी यावेळी व्यक्त केला.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aap delhi chief minister arvind kejriwal written party victory in gujrat elections 2022 pmw