गेल्या काही दिवसांपासून आम आदमी पार्टीचा राष्ट्रीय राजकारणातही दबदबा वाढत चालला आहे. गुजरातमध्ये आम आदमी पक्षाचा (AAP) प्रवास २०२१ मध्ये सुरू झाला, पक्षाने सुरत महानगरपालिकेत (SMC) १२० पैकी २७ जागा जिंकल्या. त्यानंतर २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत पाच जागा जिंकल्या. मात्र गेल्या महिनाभरात या पक्षाला सलग दोन धक्के बसले आहेत. १३ डिसेंबरला आम आदमी पार्टीचे जुनागडचे आमदार भूपेंद्र भयानी यांनी भाजपमध्ये प्रवेश करत आपचा राजीनामा दिला. पाच दिवसांनंतर त्यांच्या विधिमंडळ पक्षाचे नेते चैतर वसावा यांना वन अधिकार्‍यांना धमकावल्या आणि मारहाण केल्याच्या आरोपाखाली फौजदारी प्रकरणात अटक करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दुसरीकडे आम आदमी पार्टीचे निमंत्रक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अहमदाबाद न्यायालयात बदनामीच्या खटल्याला सामोरे जावे लागत आहे. तसेच अंमलबजावणी संचालनालया (ईडी)चा ससेमिराही त्यांच्या मागे आहे. खरं तर केजरीवाल यांनी रविवारी ५० हजार आदिवासींच्या मेळाव्यात जाहीर करून टाकले की, वसावा हे लोकसभा निवडणुकीसाठी भरूच लोकसभा मतदारसंघातून आम आदमी पार्टीचे उमेदवार असतील. केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सोमवारी वसावा आणि त्यांची पहिली पत्नी शकुंतला यांची भेट घेतली, चैतर वसावा हे अटकेपासून नर्मदा जिल्ह्यातील राजपिपला उप कारागृहात आहेत.

चैतार वसावासारख्या “सिंहाला पिंजऱ्यात” ठेवल्याचा आरोप करतही अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर हल्ला चढवला होता. त्यांच्या जामीन याचिकेवर युक्तिवाद करण्यासाठी आपने सर्वात महागडे अन् सर्वोच्च वकिलांना नियुक्त केले. यावरूनच या क्षणी पक्षातील वसावा यांचे महत्त्व अधोरेखित होते.

हेही वाचाः भाजपा संपूर्ण यूपीतील मुस्लिम महिलांपर्यंत पोहोचणार, ७५ हजारांहून अधिक लाभार्थ्यांना लक्ष्य करणार

चैतर वसावा यांचा राजकीय प्रवास

३५ वर्षीय चैतार वसावा हे नर्मदा जिल्ह्यातील डेडियापाडा येथील आदिवासी नेते आहेत. महेश वसावा यांच्या नेतृत्वाखालील भारतीय आदिवासी पक्ष (BTP) मधून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. ते त्यांच्या संघटनात्मक आणि प्रचार कौशल्यांसाठी ओळखले जातात आणि २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत डेडियापाडा येथून महेशच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्याचे श्रेय त्यांना दिले जाते.

हेही वाचाः INDIA आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर? राहुल गांधींच्या पदयात्रेतून वाद मिटणार का?

२०२२ च्या निवडणुकीपूर्वी बीटीपीने विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टी (AAP)बरोबर युती करण्याची घोषणा केली. सप्टेंबरमध्ये BTP ने AAP बरोबरचे संबंध तोडले आणि वसावा यांनी AAP मध्ये जाण्याचा निर्णय घेतला. बीटीपी सोडण्याचे कारण सांगताना त्यांनी द इंडियन एक्स्प्रेसला त्यावेळी सांगितले की, “डेडियापाडामध्ये बीटीपीला सार्वजनिक पाठिंबा नव्हता आणि मी या भागात पक्ष मजबूत करण्यासाठी काम केले. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत मला डेडियापाडा येथून निवडणूक लढवायची होती, परंतु महेश यांना उमेदवार म्हणून उभे केले. त्यावेळी पिता-पुत्र दोघांनीही मला आश्वासन दिले की, २०२२ च्या निवडणुकीत मला तिकीट दिले जाईल. मात्र, यावेळी मला तिकीट नाकारण्यात आले.

बीटीपीच्या वरिष्ठ नेतृत्वाने महत्त्वाचे निर्णय घेताना संघटनेच्या इतर नेत्यांची मते किंवा सूचना विचारात घेतल्या नाहीत, असा आरोप वसावा यांनी केला. भाजपच्या हितेशकुमार देवजीभाई वसावा यांच्या विरोधात ४०,२८२ मताधिक्क्याने ते विजयी झाले. चैतरने वनविभागाच्या अधिकाऱ्यांना धमकावल्याचा आरोप केल्यानंतर ३० ऑक्टोबर रोजी डेडियापाडा येथील त्यांच्या राहत्या घरी शस्त्राने हवेत एक राऊंड गोळीबार केला, त्याच प्रकरणात वसावा यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला. त्यानंतरच खरी अडचण सुरू झाली. शकुंतला आणि आणखी एका व्यक्तीला या प्रकरणी अटक करण्यात आली. चैतरने एक महिन्यापेक्षा जास्त काळ अटक टाळली आणि १४ डिसेंबर रोजी आत्मसमर्पण केले आणि न्यायालयात जामीन याचिकाही दाखल केली. डेडियापाडा येथील स्थानिक न्यायालयाने मंगळवारी जामीन अर्ज फेटाळला.

नोव्हेंबर २०२३ मध्ये चैतरची दुसरी पत्नी वर्षा हिने सांगितले की, लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये सामील होण्यासाठी तिच्या पतीला “षड्यंत्र” म्हणून खोट्या आरोपांमध्ये अडकवण्यात आले आहे. खरं तर रविवारी चैतरला पक्षाचा आदिवासी चेहरा म्हणून दाखवून केजरीवाल यांनी आदिवासी समुदायाला त्यांच्याकडून झालेल्या “अपमानाचा बदला” घेण्याचे आवाहन केले. “त्यांनी तुमचा मुलगा आणि आमचा भाऊ चैतर वसावा यांना अटक केली आहे. पण त्याहून निराशाजनक कृती म्हणजे चैतरच्या पत्नी शकुंतलाबेनला अटक केलीय. भाजपनं तुमच्या समाजाच्या सुनेला अटक केली आहे. हा संपूर्ण समाजाचा अपमान आहे. तुम्ही याचा बदला घेणार नाही काय?” असा सवाल केजरीवाल यांनी उपस्थित केला.

“भाजप हे दरोडेखोरांहून वाईट आहेत, जे गावे लुटायचे, पण याआधी ते महिलांना किंवा कुटुंबाला कधीही हात लावत नव्हते… परंतु ते आता एक पाऊल पुढे गेले आहेत. भाजपाला चैतर वसावा या तरुण नेत्याला चिरडून टाकायचे आहे, जेणेकरून दुसरे कोणी त्यांच्या विरोधात पुन्हा उभे राहण्याची हिंमत करू नये. भाजपावाले चैतारला घाबरतात कारण ते लवकरच आदिवासींना न्याय मिळवून देऊ शकतात, पण त्यांना ते नको आहे,” असंही केजरीवाल पुढे म्हणाले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aap tribal face in gujarat now candidate for lok sabha elections who is chaitar vasava vrd
Show comments