पश्चिम बंगालमध्ये राजकीय विजनवासात जाण्यापासून स्वत:ला वाचवण्याची काँग्रेस पक्षाकडून धडपड केली जात आहे. एकीकडे सत्ताधारी तृणमूल पक्षाची राज्यावर असलेली मजबूत पकड तर दुसरीकडे विरोधक म्हणून भारतीय जनता पार्टीने वाढवलेले प्राबल्य, या दोन्ही पक्षांच्या कात्रीमध्ये एकेकाळी सत्तेवर असणारे डावे पक्ष आणि त्यांच्यासहित काँग्रेस पक्ष अडकला आहे. पश्चिम बंगालमधील यंदाची लोकसभेची निवडणूक ही तिहेरी झाली. डाव्यांबरोबर लढणाऱ्या काँग्रेसला फार चमकदार कामगिरी करता आली नाही आणि त्याच पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी हे आता पदावरून पायउतार झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : मराठा आरक्षणाचा निर्णय पंतप्रधानांनीच घ्यावा; आरक्षणावर उद्धव ठाकरे यांनी चेंडू पंतप्रधान मोदींकडे टोलावला

पश्चिम बंगालमध्ये २०२६ साली विधानसभेची निवडणूक होणार असून या निवडणुकीची तयारी म्हणून काही महत्त्वाचे बदल काँग्रेस पक्ष संघटनेमध्ये करण्यात येत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अखिल भारतीय काँग्रेस समितीला निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून पश्चिम बंगालमधील पक्षसंघटनेची पुनर्रचना करायची आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसबरोबर जायचे की त्यांच्याविरोधातच लढायचे, याबाबतचा निर्णयही येत्या काळात घ्यायचा आहे. सोमवारी (२९ जुलै) पश्चिम बंगाल प्रदेश काँग्रेस समितीच्या २१ नेत्यांनी अखिल भारतीय काँग्रेस समितीचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल यांची दिल्लीमध्ये भेट घेतली आहे. या बैठकीला अधीर रंजन चौधरी, प्रदीप भट्टाचार्य, दीपा दासमुंसी, अमिताव चक्रवर्ती आणि राज्यातील पक्षाचे एकमेव लोकसभा खासदार ईशा खान चौधरी इत्यादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. अधीर रंजन चौधरी यांच्या जागी प्रदेशाध्यक्ष म्हणून कुणाची नियुक्ती करायची, याबाबतचा निर्णय राज्यातील नेत्यांनी पक्षाच्या हायकमांडकडेच सोपवला असून पक्षसंघटनेला पुनरुज्जीवित करण्याची गरजही त्यांनी विषद केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यांनी अखिल भारतीय काँग्रेस समितीमधील नेत्यांना राज्यामध्ये ब्लॉक स्तरापासून नवीन समित्या स्थापन करण्याचे आणि नेतृत्वासाठी नवे चेहरे समाविष्ट करण्याचेही आवाहन केले असल्याचे सूत्रांनी सांगितले. अधीर रंजन चौधरी यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पद असणे ही बाब काँग्रेससाठी तृणमूल काँग्रेसबरोबर जाण्यामधील मोठा अडथळा होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता तृणमूल काँग्रेसबाबतच्या भूमिकेचा पुनर्विचार केला जाऊ शकतो. एकीकडे काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस हे दोन्हीही पक्ष राष्ट्रीय स्तरावर इंडिया आघाडी म्हणून एकत्र असले तरीही चौधरी यांच्या कार्यकाळामध्ये राज्यातील काँग्रेस पक्ष ममता तृणमूल काँग्रेसच्या विरोधातच राहिला होता. मात्र, आता अधीर रंजन चौधरी यांची जागा घेऊ शकेल, असा नवा चेहरा शोधणे हे काँग्रेससमोरचे आव्हान आहे. नाव न घेण्याच्या अटीवर काँग्रेसमधील एका नेत्याने म्हटले की, “प्रदेशाध्यक्षपदी अधीर रंजन चौधरी नसल्याने एक पोकळी निर्माण होणार आहे. तृणमूल आणि भाजपा या दोघांच्याही विरोधात ठामपणे उभे ठाकणारे ते शेवटचे नेतृत्व होते. त्यांनी राष्ट्रीय नेतृत्वाचा दबाव स्वीकारला; मात्र तृणमूल विरोधी भूमिकेपासून ते जराही डगमगले नाहीत. आता हायकमांड त्यांच्या जागी योग्य व्यक्ती शोधू शकेल की नाही हे मला माहीत नाही.”

बैठकीमध्ये काय घडले?

सोमवारी रात्री झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पश्चिम बंगालचे प्रभारी गुलाम अहमद मीर यांनी म्हटले की, “तुम्हाला माहितीच आहे की, लोकसभा निवडणुकीनंतर अधीर रंजन चौधरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा हायकमांडकडे सोपवला आहे. पश्चिम बंगालबाबत चर्चा करण्यासाठी आम्ही बैठक बोलावली होती; त्यासाठी २५ जणांना बोलावण्यात आले होते. २०२६ च्या विधानसभा निवडणुकीआधी काय केले जावे, याबाबतच्या चर्चा झाल्या. आता पक्षसंघटनेच्या पुनर्रचनेबाबत तसेच निवडणुकीबाबत एक आराखडा तयार होईल.”

रायगंजचे माजी खासदार प्रिय रंजन दासमुंशी हे ममता बॅनर्जींचे कठोर टीकाकार मानले जातात. त्यांनी म्हटले की, “पश्चिम बंगालमधील पुढील वाटचाल कठीण आहे. तातडीने काहीही घडणार नाही. राज्यात आमच्याकडे एकही आमदार नसून फक्त एकच खासदार आहे. डाव्या आघाडीच्या राजवटीत आम्हाला निवडणुकीत होणाऱ्या हेराफेरीची माहिती होती. पण, आता या प्रकाराला सैद्धांतिक रूप धारण झाले असून दहशतवादाचे स्वरूप आले आहे. आता मतदारांनी बंगालमधील सत्ताधारी पक्षाला मत न दिल्यास त्यांचे जॉब कार्ड (MGNREGS) आणि इतर सरकारी योजना हिसकावून घेतल्या जातील. प्रशासनदेखील सत्ताधारी पक्षासाठी केडर बनले आहे.”

हेही वाचा : तमिळनाडूमध्ये महिनाभरात ५ राजकीय कार्यकर्त्यांची हत्या; काय आहे कारण?

तृणमूलबाबत पक्षाच्या भूमिकेचा पुनर्विचार केला जाईल का, या प्रश्नावर दासमुंशी म्हणाले की, “राष्ट्रीय पातळीवर आम्ही इंडिया आघाडीमध्ये एकत्र असलो तरीही पश्चिम बंगालमध्ये आमचा लढा भाजपाबरोबरच तृणमूल काँग्रेसशीही आहे. यावरून अनेक प्रश्न निर्माण होतात. हे प्रश्न तृणमूललाही विचारले जातात. तृणमूलही राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडीमध्ये असून राज्यात आमच्या विरोधात लढताना दिसतो. आता बंगालमध्ये असे ध्रुवीकरण झाले आहे, जे आपण यापूर्वी कधीही पाहिले नव्हते. हे कठीण आहे, परंतु आम्हाला आमच्या संघटनेची हळूहळू पुनर्बांधणी करावी लागेल.”

काँग्रेसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या वेळी पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी जाहीरपणे सांगितले होते की, ममता बॅनर्जी इंडिया आघाडीचा भाग असतील की नाही याबद्दलचा निर्णय घेणारे ते (अधीर रंजन चौधरी) कुणीही नाहीत. या विधानावरुन अधीर रंजन चौधरी नाराज होते. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान खरगे यांनी हे विधान केले होते. अधीर यांनी ममता बॅनर्जी यांना इंडिया आघाडीमध्ये सहभागी करुन घेण्यास विरोध केला होता. काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्याचे मी स्वागत करणार नाही, असे ते म्हणाले होते. त्या पार्श्वभूमीवर खरगे यांनी वाढलेला तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी अधीर यांना पक्षाचा “लडाकू सिपाही” (लढाऊ सैनिक) असे संबोधले होते. काँग्रेसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अधीर रंजन चौधरी यांनी म्हटले होते की, “निवडणुकीच्या दरम्यान मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले होते की, गरज भासल्यास मला बाजूला केले जाऊ शकते. या विधानामुळे मी नाराज झालो,” पुढे ते म्हणाले की, “पश्चिम बंगालमधील निवडणुकीचे निकाल काँग्रेस पक्षासाठी फार चांगले नव्हते. त्यावेळी मी पश्चिम बंगालमधील काँग्रेसचा तात्पुरते अध्यक्ष होतो; त्यामुळे, या निकालाची जबाबदारी आपली आहे असे मला वाटते. त्यानंतर मी खरगेजींना सांगितले की, शक्य असल्यास माझ्याऐवजी इतर कुणाला तरी हे पद द्या.”

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Adhir ranjan chowdhury officially out congress looks at changes in west bengal vsh
Show comments