महाराष्ट्रात विरोधी पक्षात असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपासोबत सत्तेत जाऊन बसल्यानंतर अशी अफवा निर्माण झाली आहे की, आता जयंत चौधरी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोक दल (RLD) हा पक्ष भाजपाशी युती करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरएलडी पक्षाच्या प्रमुखांनी रविवारी दिल्लीत जाऊन भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली. एनडीएमध्ये सामील होण्यासाठी दोन तास चर्चा झाल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. रिपाईचे प्रमुख आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उत्तर प्रदेश येथे पत्रकारांशी बोलत असताना सांगितले की, जयंत चौधरी लवकरच राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएचे घटकपक्ष होतील. “जयंत चौधरी हे पाटणा येथील विरोधकांच्या बैठकीला गेले नाहीत. अखिलेश यादव यांच्यावर ते नाराज असून लवकरच ते आमच्यासोबत जोडले जातील”, अशी प्रतिक्रिया आठवले यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जर जयंत चौधरी यांनी एनडीएत सामील होण्याचा निर्णय घेतला तर विरोधकांसाठी हा दुसरा झटका असेल. कारण महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांनी सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यामुळे एकप्रकारे राष्ट्रवादी एनडीएत सहभागी झाल्याचे चित्र दिसत आहे. राष्ट्रीय लोक दलाचे राष्ट्रीय सरचिटणीस कुलदीप उज्ज्वल यांनी मात्र या शक्यता फेटाळून लावल्या आहेत. आरएलडीचे नेते चौधरी आणि केंद्रीय मंत्री यांची बैठक झालेली नाही. जयंत चौधरी हे विचारधारेसाठी लढणारे नेते आहेत. त्यांनी भाजपासोबत बैठक केलेली नाही, अशी प्रतिक्रिया कुलदीप उज्ज्वल यांनी दिली.

हे वाचा >> VIDEO: राष्ट्रवादीतील बंडानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, पक्षावर दावा करत म्हणाले, “अनेक दिवस याबाबत…”

समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि जयंत चौधरी यांच्यात कुरबुर असल्याच्या बातम्या काही काळापूर्वी आल्या होत्या. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांपासून आरएलडी आणि सपा यांच्यात आघाडी आहे. मागच्यावर्षी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकाही त्यांनी एकत्र लढविल्या होत्या. दोन्ही युवा नेत्यांनी आपापसातील सौहार्द या निवडणुकांच्या माध्यमातून दाखविले होते. पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये या आघाडीला चांगले यश मिळाले होते. मात्र दोन्ही पक्षांमध्ये मिठाचा खडा पडल्यामुळे संबंध बिघडले आहेत. पाटणा येथे होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहणार नाही, असे अगदी शेवटच्या क्षणाला जयंत चौधरी यांनी जाहीर केले. पूर्वनियोजित घरगुती कार्यक्रम असल्यामुळे २३ जून रोजी झालेल्या बैठकीला उपस्थित राहता येणार नाही, अशी प्रतिक्रिया पक्षाच्यावतीने देण्यात आली होती.

१ जुलै रोजी समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांचा वाढदिवस होता. त्यानिमित्त उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. मात्र चौधरी यांनी अखिलेश यादव यांना शुभेच्छा दिल्या नाहीत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यसभेच्या जागेवरून दोन्ही पक्षात खटके उडायला सुरुवात झाली. आरएलडीच्या नेत्याने सांगितल्यानुसार, दोन्ही पक्षांमध्ये राज्यसभेवरून बरेच वाद झाले त्यानंतर सपाने ही जागा आरएलडीला दिली. त्यानंतर इतरही विषय घडले, ज्यामुळे जयंत चौधरी आणि अखिलेश यादव यांनी एकमेकांपासून अंतर ठेवले.

हे ही वाचा >> विरोधकांची ऐक्याची घोषणा; पण उत्तर प्रदेश लोकसभेचे अंकगणित भाजपाच्या बाजूने

मे २०२३ मध्ये झालेल्या स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीत दोन्ही पक्षातील दरी आणखी वाढली. जेव्हा सपा आणि आरएलडीने एकमेकांच्या विरोधात उमेदवार उभे केले. महापौरपदाची एकही जागा विशेषकरून मेरठची जागा न दिल्यामुळे आरएलडी पक्षाने उघड नाराजी व्यक्त केली. आरएलडी पक्षाशी चर्चा न करता सपाने मेरठमध्ये आपला उमेदवार उभा केला. स्थानिक स्वराज संस्थाच्या प्रचारादरम्यान पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव यांच्या सभांना जयंत चौधरी उपस्थित राहिले नाहीत.

याचकाळात आरएलडी पक्षाच्या नेत्यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी इतर पर्यायांचा शोध घेण्याची गरज बोलून दाखविली. आरएलडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार समाजवादी पक्ष दादागिरी करत असल्यामुळे काँग्रेस पक्षासोबत आघाडी करण्याचा एक मतप्रवाह पक्षात सुरू होता. याबद्दल आरएलडीच्या नेत्याला विचारले असता त्यांनी सांगितले की, आमच्यासमोर काही प्रस्ताव आहेत. पण आमच्यासाठी योग्य काय राहिल, याचा निर्णय झाल्यानंतर आम्ही ते जाहीर करू.

भाजपाशी आघाडी करणे आरएलडीसाठी त्रासदायक ठरू शकते. पश्चिम उत्तर प्रदेशमधील जाट समुदायाचा आरएलडीला चांगला पाठिंबा आहे. काही दिवसांपूर्वी आरएलडीने मुस्लीम आणि दलितांसाठी महामंडळे स्थापन व्हावीत, या मागणीसाठी आंदोलन केले होते. भाजपाशी आघाडी केली तर पक्षाकडे असलेला मुस्लीम आणि दलित मतदारवर्ग दुरावण्याची शक्यता आहे. आरएलडीच्या नेत्याने सांगितले, पक्ष कदाचित विचारधारा बदलू शकतो, पण नेते विचारधारा बदलू शकणार नाहीत. विशेषतः दलित आणि मुस्लीम नेते भाजपाशी आघाडी करण्यास फारसे उत्सुक नसल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे ते दुरावण्याची शक्यता आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकीय नाट्यावर अखिलेश यादव यांनीदेखील भाष्य केले. “राजकारणाचे गणित वेगळे असते. इथे कुणाचा तरी पाठिंबा मिळणे म्हणजे नेहमीच ताकद वाढते, असे होत नाही. उलट जी ताकद आहे, तिच्यात आणखी एक भागीदार वाढण्यासारखे आहे. हे कमकुवत होत असल्याचे प्रतीक आहे.”, असे खोचक ट्वीट अखिलेश यादव यांनी केले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After ajit pawar is rld leader jayant chaudhary next for bjp rumours rife about a his delhi meeting with union minister kvg