लोकसभा निवडणूक जाहीर झाल्याच्या २४ तासांनंतर मुंबईत ‘भारत जोडो न्याय यात्रे’ची सांगता झाली. यावेळी आयोजित सभेत इंडिया आघाडीतील जवळपास सर्वच पक्षांच्या नेत्यांची उपस्थिती होती. काही दिवसांपासून जागावाटपावरून सुरू असलेल्या नाराजी नाट्यानंतर हे नेते एकत्र व्यासपीठावर आल्याने आता विविध चर्चांना उधाण आले आहे. नाराजी नाट्यानंतर इंडिया आघाडीतील नेते एकत्र दिसत असले, तरी हे ऐक्य निवडणुकीपर्यंत टिकून राहणार का, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, रविवारी मुंबईतील शिवाजी पार्क येथे ‘भारत जोडो न्याय यात्रे’च्या सांगता सभेने इंडिया आघडीच्या प्रचाराचे बिगूल वाजले. तत्पूर्वी सकाळी राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ महात्मा गांधींचे निवासस्थान राहिलेल्या मणिभवन येथून सुरू झाली. तसेच सायंकाळी चैत्यभूमी येथे या यात्रेची सांगता झाली. यावेळी राहुल गांधी यांनी तिथून हाकेच्या अंतरावर असलेल्या विनायक सावरकर यांच्या स्मारकाला भेट देण्याचे टाळले; पण शेजारीच असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे दर्शन घेतले.

हेही वाचा – CAA वर प्रश्न उपस्थित करणाऱ्या पाश्चात्य देशांना परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी दाखवला आरसा, म्हणाले…

राहुल गांधी यांच्या निर्णयानंतर विरोधकांनीही इंडिया आघाडीतील सदस्य असलेल्या उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून ताशेरे ओढले. उद्धव ठाकरे सावरकरांना मानतात; मग ते राहुल गांधींना सावरकरांच्या स्मारकस्थळी का घेऊन जाऊ शकले नाहीत, असा एकंदरीत सूर या नेत्यांचा होता.

त्याबरोबरच सायंकाळी मुंबईतील शिवाजी पार्कवर या यात्रेची सांगता सभा पार पडली. या सभेला उद्धव ठाकरे यांच्यासह इंडिया आघाडीतील सर्वच पक्षांतील नेत्यांची उपस्थिती होती. तसेच समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी पत्र पाठवून या सभेला पाठिंबा दिला. यावेळी इंडिया आघाडीतील नेत्यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपावर जोरदार टीका केली. तसेच एनडीएविरोधात लढण्यासाठी किमान समान कार्यक्रम तयार करण्याचा संकल्पही या नेत्यांकडून करण्यात आला. महत्त्वाचे म्हणजे काँग्रेस इंडिया आघाडीतील आपल्या सहकाऱ्यांना दूर ठेवत असल्याच्या आरोपांना उत्तर देण्याचा प्रयत्न काँग्रेसने या सभेच्या माध्यमातून केला.

इंडिया आघाडीच्या या सभेवर भाजपाकडून टीका करण्यात आली. महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा एक जुना व्हिडीओ पोस्ट करीत उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. तसेच काँग्रेसबरोबरच्या युतीबाबत बाळासाहेब काय म्हणाले होते, याची आठवण आम्ही उद्धव ठाकरेंना करून देत आहोत, असे ते म्हणाले. तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी करीत त्यांनी हिंदुत्वाच्या विचारांशी तडजोड केली, आता ते सावरकरांबाबतच्या भूमिकेबाबतही तडजोड करण्यास तयार आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

महत्त्वाचे म्हणजे जागावाटपावरून सुरू असलेल्या वादानंतर रविवारच्या सभेने इंडिया आघाडीचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण बघायला मिळाले. राहुल गांधी यांच्या यात्रेलाही जनतेने भरभरून पाठिंबा दिला. त्याशिवाय राहुल गांधी यांच्या यात्रेने मुस्लीम आणि दलित मतदारांना काँग्रेसच्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना लेखक अर्जुन डांगाळे म्हणाले, “भाजपा पुन्हा सत्तेत आल्यास राज्यघटना बदलण्याचा प्रयत्न करील, असा आंबेडकरी जनतेचा समज आहे. त्यामुळे यावेळी मोठ्या संख्येने दलित मतदार भाजपापासून दूर जातील, अशी शक्यता आहे.”

हेही वाचा – तामिळनाडू आणि गुजरातमध्ये एका टप्प्यात निवडणूक होते, मग आमच्याकडे का नाही? तृणमूल नेत्यांचा सवाल

त्याशिवाय एनडीएच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले, की आगामी निवडणुकीत महाराष्ट्रातील जागा जिंकणं एनडीएसाठी नक्कीच आव्हानात्मक असेल. आम्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडण्यात यशस्वी झालो असलो तरी त्याचा कितपत फायदा होईल, हे सांगणे कठीण आहे. कारण- उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबाबत सध्या जनतेमध्ये सहानुभूतीचे वातावरण आहे. तसेच मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे महाराष्ट्रातील वातावरण तापले आहे.

एकंदरीतच रविवारी शिवाजी पार्कवर दिसलेले ऐक्य टिकून राहिल्यास त्याचा फायदा इंडिया आघाडीला होण्याची शक्यता आहे. मात्र, हे ऐक्य टिकून राहणार का, असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जात आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After dispute over seatsharing india alliance is finally united but all eyes on what next spb
Show comments