जयेश सामंत-भगवान मंडलिक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डोंबिवली: गणेशोत्सव तोंडावर असताना मुंबई-गोवा महामार्गाच्या दुर्दशेवरुन राजकारण तापू लागताच राज्याचे सार्वजनिक मंत्री रविंद्र चव्हाण यांनी या प्रश्नावर चर्चासत्रांच्या माध्यमातून मुंबई, ठाणे, डोंबिवली पट्टयातील कोकणी चाकरमान्यांना साद घालण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.

श्रावणात सणासुदीला आणि विशेषत: गणेशोत्सवाच्या काळात मुंबई महानगर पट्टयातून कोकणात मुळ गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या गेल्या काही वर्षात लक्षणीयरित्या वाढली आहे. या मंडळींसाठी कोकण रेल्वेचे आरक्षण हा जितका जिव्हाळ्याचा विषय ठरतो असतो तितकाच कोकणातील महामार्गाची स्थिती हे देखील चर्चेचे कारण ठरते. पेण, वडखळ, कोलाड, माणगाव पट्टयातील खड्डे चुकवित आपले मुळ गाव गाठणे हे कोकणवासियांसाठी गणेशोत्सवाच्या काळात आणि विशेषत: पावसाळ्यात नेहमीच दिव्य ठरत आले आहे. हा खड्डे मार्ग चुकविण्यासाठी खोपोली-पालीमार्गे निजामपुरा-माणगाव या मार्गाविषयी देखील अलिकडच्या काळात कोकणवासीयांमध्ये कुतूहुल दिसून येते. विशेषत: गणेशोत्सवाच्या काळात या रस्त्यांवरुन कोकणवासी कमालिचा संवेदशील झालेला दिसतो. नेमका हाच मुद्दा हेरत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनी गेल्या काही दिवसांपासून मुंबई-गोवा महामार्गावर पडलेल्या खड्डयांचा मुद्दा आक्रमकपणे हाती घेत आंदोलनाची राळ उडवून दिली आहे. मध्यंतरी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही या रस्त्यांची पहाणी केली आणि त्यानंतर मुंबई-गोवा महामार्गाचे प्रवेशद्वार असलेले पनवेल भागात एक सभाही घेतली. यानंतर मनसैनिकांनी आक्रमक भूमीका घेत सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाणांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली.

आणखी वाचा-लातूरच्या राजकारणात आता देशमुख विरुद्ध बनसोडे संघर्ष

चव्हाण यांचे मुळ गाव हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत. डोंबिवलीत त्यांच्या राजकीय यशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जसा वाटा आहे तसेच त्यांचे ‘कोकणी’ असणे हे देखील या भागातील एकगठ्ठा कोकणी मतदारांमुळे चव्हाणांच्या पथ्यावर पडत आले आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री पद मिळाल्यापासून रवींद्र चव्हाण यांना रखडलेल्या मुंबई-गोवा रस्ते कामावरुन इतर राजकीय पक्षांबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सर्वाधिक लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. अनेक वर्ष रखडलेला हा रस्ता लवकर पूर्ण करण्यासाठी आपण बांधिल आहोत. ती आपली नैतिक जबाबदारी आहे. हे जाहीरपणे सांगुनही मनसेने या रखडलेल्या रस्त्यावरुन बांधकाम विभाग, ठेकेदारांची कार्यालये तोडफोडीचा मार्ग अवलंबला आहे. या तोडफोडीला मध्यंतरी एका जाहीर पत्राने चव्हाणांनी उत्तर दिले. त्यानंतरही हे राजकारण तापत असल्याचे लक्षात आल्याने चव्हाणांनी ठाणे, डोंबिवली परिसरातील आपल्या जुन्या कोकणी बांधणीचा पुरेपूर वापर करण्याची रणनिती आखली असून कोकणवासियांच्या चर्चासत्रांच्या माध्यमातून सरकार रस्ते सुस्थितीत आणण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांचा लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न सुरु करण्यात आला आहे.

आणखी वाचा-भंडारा-गोंदियाची जबाबदारी रोहित पवारांकडे, प्रफुल्ल पटेल यांना शह

मनसे आंदोलनांना चर्चासत्रांचे उत्तर

गणेशोत्सव सुरु होण्यापुर्वी कोकणच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावरील एक मार्गिका खड्डे विरहीत करुन देण्याचे आश्वासन यापुर्वीच चव्हाणांनी दिले आहे. गेल्या काही काळापासून या रस्त्यांच्या कामाच्या पहाणीसाठी त्यांचे रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील दौरेही वाढले आहेत. या रखडलेल्या महामार्गावरुन मनसेच्या युवा नेत्याची पदयात्रा होत आहे. ही आंदोलने होत असताना मंत्री चव्हाण यांनी आपले बलस्थान असलेल्या ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग परिसरात मुळ गाव असलेल्या ठाणे, डोंबिवलीकर चाकरमान्यांना साद घालण्यासाठी चर्चासत्रांची आखणी सुरु केली आहे. डोंबिवलीतील कोकणवासीयांच्या वेगवेगळ्या संघटनांना एकत्र आणत मुंबई-गोवा महामार्गाचे वास्तव स्पष्ट करण्याची तयारी या चर्चासत्राच्या माध्यमातून केली जात आहे. राजकीय आंदोलनांना संयतपणे चर्चासत्रातून उत्तर देण्याचा हा प्रयत्न असल्याचा दावा चव्हाणांच्या निकटवर्तीयांनी लोकसत्ताशी बोलताना केला. डोंबिवली जिमखान्यात रविवारी सकाळी दहा वाजता अशाच प्रकारचे एक चर्चासत्र आयोजित करण्यात आले असून त्यामध्ये सरकार हा मार्ग पुर्ण करण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांची सखोल माहिती देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठाणे, डोंबिवलीकर कोकणस्थांना वेगवेगळ्या चित्रफिती, नवे लक्ष्य, कामे पुर्ण करण्यासाठी केली जाणारी आखणी, त्यामध्ये येणारे अडथळे अशी माहिती देण्यासाठी विशेष व्यवस्था या चर्चासत्रांच्या माध्यमातून केली जात आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After the plight of mumbai goa highway ravindra chavans apeal konkani people print politics news mrj
Show comments