कोल्हापूर : सलग दुसऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये अपयश आल्यानंतरही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे लगेचच सक्रिय झाले आहेत. संघटनेची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय त्यांनी व्यक्त केला आहे. त्याची सुरुवात १ जुलैपासून वसंतराव नाईक शेतकरी कर्जमुक्ती आंदोलनाने पुसद (जिल्हा यवतमाळ) येथून केली जाणार आहे. सतत राजकीय भूमिका बदलत जाणाऱ्या शेट्टी यांना शेतकरी, जनतेचे पाठबळ कितपत मिळणार यावर त्यांची राजकीय दिशा अवलंबून असणार आहे.

शेट्टी यांनी शेतकरी संघटनेमध्ये शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली काम केले. त्यांच्याशी मतभेद झाल्यानंतर स्वतःची स्वाभिमानी शेतकरी संघटना स्थापन केली. शेतकऱ्यांचे प्रश्न हाती घेऊन लढा दिल्याने त्यांच्या पदरात जिल्हा परिषद, शिरोळ विधानसभा सलग दोन वेळा हातकणंगले लोकसभा निवडणुकीचे यश पडले. धैर्यशील माने यांनी सलग दोनदा त्यांचा पराभव केला. गेल्या लोकसभा निवडणुकीत शेट्टी हे लाखभर मतांनी पराभूत झाले होते. यावेळी त्यांना अनामत रक्कम वाचवणेही शक्य झाले नाही.

हेही वाचा – मुंबई पदवीधरमध्ये चुरशीची लढत

इतक्या मोठ्या राजकीय पराभवांची कारणे शोधण्याचा प्रयत्न स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शनिवार व रविवारी बारामती येथे प्रदेश कार्यकारिणीत केला. मतमोजणीच्या आदल्या दिवशीही शेट्टी एक लाखाच्या मताधिक्याने विजयी होऊ असा विश्वास व्यक्त करत होते. प्रत्यक्षात त्यांना या निवडणुकीमध्ये अनामत रक्कमही वाचवता आली नाही. विजयी धैर्यशील माने यांनी ५ लाख २० हजार मते घेतली. ठाकरेसेनेचे सत्यजित पाटील सरूडकर यांना ५ लाख ६ हजार मते मिळाली. या निवडणुकीत माने विरुद्ध सरूडकर अशी लढत होणार हे स्पष्ट झाले तेव्हाच शेट्टी हे तिसऱ्या स्थानी जाणार हे निश्चित झाले होते. तरीही शेट्टी हे ३ लाखाच्या आसपास मते घेतील असा अंदाज होता. त्यांना १ लाख ८० हजार इतकीच मते मिळाले. त्यामुळे विजयापर्यंत जाणारी सव्वा पाच लाख मते तर जाऊ देत गेलाबाजार किमान तीन लाख मते गृहीत धरलेली तरी इतक्या मोठ्या प्रमाणातील त्यांची मते गेली कुठे? गणित नेमके कुठे फिरले? की ते कोठे फिरवले गेले याचा बारकाईने शोध स्वाभिमानीने घेण्यात अपेक्षित होते. पराभवानंतर माझं काही चुकले का, अशी समाज माध्यमात भावनिक पोस्ट करणाऱ्या शेट्टी यांना महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सरूडकर यांच्या पराभवासाठीच तुमची उमेदवारी जाणीवपूर्वक होती का, अशी विचारणा करीत आहेत.

हेही वाचा – ‘आम्ही इथे चुकलो’; केरळमध्ये डाव्यांचं लोकसभा निवडणुकीतील पराभवावर मंथन

राज्य परिषदेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेत पुन्हा ऊर्जा भरण्याचा निर्धार करण्यात आला आहे. मरगळलेल्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य आणण्याचे आव्हान शेट्टी यांच्यासमोर असणार आहे. राज्यव्यापी दौरा केल्यानंतर शेतकरी, नागरिक यांची भूमिका समजून घेतल्यानंतर विधानसभा निवडणुकीची भूमिका स्वाभिमानीकडून स्पष्ट केली जाणार आहे. स्वबळावर लढायचे की महायुती – महाविकास आघाडी यांच्यासोबत जायचे याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. कोणासोबत गेल्याने राजकीय लाभ होऊ शकतो याची आखणी या काळामध्ये केली जाणार आहे. फिनिक्स पक्षाप्रमाणे उडी घेण्याचा निर्धार करणाऱ्या राजू शेट्टी यांचा पुढील राजकीय प्रवास आव्हानास्पद असणार आहे. स्वाभिमानीच्या राजकीय वाटचालीचा केंद्रबिंदू शेतकरी राहिला आहे. नागरी मतदारांना त्यांची भूमिका फारसी मानवत नाही. शेतकरी संघटना हा शब्दच शहरवासीयांना भावताना दिसत नाही हे इचलकरंजीत मिळालेल्या १० हजार अल्पमताने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. या परिस्थितीत नवी राजकीय बांधणी करताना नगर व ग्रामीण असा समनव्यय ठेवण्यात शेट्टी कितपत यशस्वी ठरतात त्यावर त्यांची आगामी राजकीय वाटचाल अवलंबून राहील.