Maharashtra Assembly Polls: नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राप्रमाणेच उत्तर प्रदेशमध्येही भाजपाला धक्का देणारा निकाल समोर आला. तेथील ८० पैकी तब्बल ३७ जागा जिंकून समाजवादी पक्षाने भाजपाच्या ४०० पार घोषणेची हवा काढली. खासदारांच्या संख्येनुसार समाजवादी पक्ष हा देशातील आता तिसरा सर्वात मोठा पक्ष आहे. यूपीमधील या यशानंतर आता समाजवादी पक्षाने महाराष्ट्राच्या विधानसभेवर लक्ष केंद्रित केले आहे. महाराष्ट्रात सपा महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे, त्यामुळे आगामी निवडणुकीत किमान १२ जागांवर निवडणूक लढविण्याचा विचार समाजवादी पक्षाकडून सुरू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मानखुर्द शिवाजी नगरचे तीन वेळा प्रतिनिधित्व करणारे आमदार अबू आझमी यांनी सांगितले की, सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आम्हाला हव्या असलेल्या मतदारसंघाची यादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडे सुपूर्द केलेली आहे. मतविभाजन टाळण्यासाठी आणि समाजवादीला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळविण्यासाठी आघाडीने सहकार्य करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

हे वाचा >> ‘राम केवळ तुमचा नाही, आमचाही!’समाजवादी पक्षाचे शक्तिप्रदर्शन

या मतदारसघावर सपाचा डोळा

विशेष म्हणजे, समाजवादी पक्षाने रावेर आणि अमरावती विधानसभेवर दावा केला आहे. या दोन्ही ठिकाणी काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत. वरील मतदारसंघात अल्पसंख्याकांची संख्या अधिक असल्याचे आणि विद्यमान आमदारांविरोधात नाराजीचे वातावरण असल्याचे कारण सपाने पुढे केले आहे. तसेच मानखुर्द शिवाजी नगर, भिवंडी पूर्व, भिवंडी मध्य, मालेगाव मध्य, भायखळा, वर्सोवा, धुळे शहर, औरंगाबाद पूर्व, अणुशक्तीनगर आणि कारंजा या मतदारसंघाची मागणी करण्यात आली आहे.

यंदा समाजवादी पक्षाला अधिक जागांची अपेक्षा असली तरी गतकाळात आघाडीकडून निराशा झाल्याची भीतीही पक्षाला वाटत आहे. मागच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने जागावाटपाची चर्चा सुरू केली होती, मात्र अखेरच्या क्षणी पाठीत खंजीर खुपसला अशी नाराजी महाराष्ट्रातील नेत्यांनी पत्राद्वारे राष्ट्रीय नेत्यांना कळवली आहे. त्यामुळे यंदा उमेदवार निवडीची प्रक्रिया लवकर पूर्ण करावी, असेही या पत्रात म्हटले आहे.

२०१९ सारखा दगाफटका टाळण्याचा प्रयत्न

या पत्रात पुढे म्हटले की, मागच्या निवडणुकीत आघाडीने दगाफटका करूनही आपण २०१९ साली स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा दिला होता. तसेच यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीतही समाजवादी पक्षाला राज्यात एकही जागा मिळाली नसली तरी आपल्या पक्षाने महाविकास आघाडीला सर्व ४८ लोकसभा मतदारसंघात मदत केली.

हे ही वाचा >> Muhammad Yunus : बांगलादेशच्या मुख्य सल्लागारांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन, म्हणाले, “बांगलादेशातील अल्पसंख्यांक हिंदू…”

तसेच २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाने सात जागांची मागणी केली होती. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने त्यांना फक्त मानखुर्द शिवाजी नगर, भिवंडी आणि औरंगाबाद पूर्व या तीनच जागा देऊ केल्या होत्या. मात्र, समाजवादी पक्षाने आघाडीत न सामील होता, सर्व सात जागांवर निवडणूक लढविली आणि दोन जागांवर विजय मिळविला. भिवंडी पूर्व मतदारसंघात काँग्रेसने उमेदवारी प्रक्रिया बंद होण्याच्या अर्धा तास अगोदर उमेदवार दिला होता, तरीही या ठिकाणी सपाने विजय मिळवला, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

उत्तर प्रदेश में हुई जीत, अब महाराष्ट्र

दरम्यान, समाजवादी पक्षाने महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. भिवंडी पूर्व विधानसभेत दोन जनसंपर्क कार्यालय उघडण्यात आले आहेत. मागच्या महिन्यात मुंबईत विजयी सभा घेण्यात आली. “उत्तर प्रदेश में हुई जीत हमारी, अब है महाराष्ट्र की बारी”, असा नारा या सभेत देण्यात आला. या सभेत उत्तर प्रदेशमध्ये विजय मिळविलेल्या ३७ खासदारांचा सत्कार करण्यात आला. या महिन्याच्या सुरुवातीला राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही मुंबईचा दौरा करून राज्यातील नेत्यांची बैठक घेतली होती.

ताजी अपडेट

दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी सांगितले की, समाजवादी पक्ष, सीपीआय (एम) आणि सीपीआय या पक्षांशी अद्याप जागावाटपाची चर्चा सुरू झालेली नाही. आधी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उबाठा पक्षाशी जागावाटपावर चर्चा होईल. त्यानंतर आम्ही समाजवादी पक्ष आणि इतर पक्षांशी नक्कीच चर्चा करू.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After uttar pradesh poll success samajwadi party eyes on maharashtra assembly polls wants 12 seats from mva kvg
Show comments