महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. त्या दृष्टीनं राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. प्रत्येक राजकीय पक्षाकडून युती आणि आघाडीबाबत निर्णय घेतले जात आहेत. यादरम्यानच आता एमआयएमनं महाविकास आघाडीत सहभागी होण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला (शरद पवार) दोन महिन्यांपूर्वीच प्रस्ताव दिल्याचं म्हटलं आहे. मात्र, असा कोणताही प्रस्ताव मिळाला नसल्याचं काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे एमआयएमच्या मविआतील प्रवेशाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. त्यावरून आता विविध राजकीय चर्चांनाही उधाण आलं आहे.

एमआयएमनं नेमकं काय म्हटलं आहे?

या संदर्भात बोलताना एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी खासदार इम्तियाज जलील म्हणाले, “आम्ही महाविकास आघाडीत सहभागी होण्यासाठी दोन महिन्यांपूर्वीच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) अध्यक्ष शरद पवार यांना सविस्तर प्रस्ताव पाठविला होता. मात्र, त्यांच्याकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. आम्ही त्यांच्या प्रतिसादाची वाट बघतो आहोत. येत्या काही दिवसांत ते आमच्याशी संपर्क करतील, अशी आम्हाला अपेक्षा आहे.”

हेही वाचा – अपक्ष आमदार किशोर जोरगेवार तुतारी फुंकणार? पवार गटाकडून चंद्रपुरातून निवडणूक लढण्याचे संकेत

एमआयएमने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला दिलेल्या प्रस्तावात पाच जागांची मागणी केली आहे. त्यामध्ये मालेगाव मध्य, धुळे, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर व वर्सोवा या जागांचा समावेश आहे. या पाच जागांसाठी एमआयएमकडून उमेदवारांची निवड करण्यात आल्याचीही माहिती आहे. “आम्ही महाविकास आघाडीला दिलेल्या प्रस्तावात मालेगाव मध्य, धुळे, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर व वर्सोवा या जागांची मागणी केली आहे. जर आम्ही महाविकास आघाडीत सहभागी झालो, तर जास्त जागांसाठी आग्रह धरणार नाही; पण या जागांवर आमचा दावा कायम असेल. आम्हाला आशा आहे की, भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांना पराभूत करण्यासाठी काँग्रेस आमचा प्रस्ताव मान्य करील,” असं म्हणणं इम्तियाज जलील यांनी मांडलं आहे.

काँग्रेसकडून स्पष्टीकरण

इम्तियाज जलील यांच्या या दाव्यानंतर काँग्रेसकडूनही याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. इम्तियाज जलील म्हणाले त्याप्रमाणे काँग्रेसला अद्याप असा कोणताही प्रस्ताव मिळालेला नाही. त्याशिवाय याबाबत पक्षाच्या अंतर्गत बैठकीत कोणतीही चर्चा झालेली नाही, अशी प्रतिक्रिया राज्य काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिली.

दरम्यान, एमआयएमनं २०१४ मध्ये राज्यात पहिल्यांदा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांना २४ पैकी दोन जागांवर विजय मिळाला होता. मात्र, एमआयएममुळे जवळपास नऊ जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला फटका बसल्याचं दिसून आलं होतं. एमआयएमनं जिंकलेल्या दोन जागांमध्ये औरंगाबाद व भायखळा या मतदारसंघांचा समावेश होता.

हेही वाचा – Maharashtra Assembly Election 2024 : गडचिरोलीत राजकीय पक्षांपुढे बंडखोरी रोखण्याचे आव्हान?

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीतही अशाच प्रकारचं चित्र बघायला मिळालं होतं. या निवडणुकीत एमआयएमनं ४४ जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यापैकी केवळ मालेगाव व धुळे या दोन जागांवर त्यांना यश मिळालं होतं. मात्र, एमआयएममुळे जवळपास १२ जागांवर काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसला फटका बसला होता. त्यापैकी कांदिवली आणि मध्य नागपूरची जागा तत्कालीन भाजपा – शिवसेना युतीने अगदी ४०९ आणि चार हजार मतांच्या फरकाने जिंकली होती; तर एमआयएमच्या उमेदवारांना ११६७ आणि आठ हजार ५६५ इतकी मते मिळाली होती.

महत्त्वाचे म्हणजे पूर्वी काँग्रेस आणि एमआयएम यांच्यात चांगले संबंध होते. २०१४ मध्ये झालेल्या आंध्र प्रदेशच्या विभाजनापूर्वी अनेकदा एमआयएमने काँग्रेसला बाहेरून पाठिंबा दिला होता. मात्र, तेलंगणाच्या निर्मितीनंतर एमआयएम आणि काँग्रेस यांच्यातील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला. अशात एमआयएमने २०१४ नंतर इतर राज्यांतही निवडणूक लढण्यास सुरुवात केल्याने एमआयएम आणि काँग्रेस यांच्यातील दरी आणखी वाढत केली.

काँग्रेस आता एमआयएमवर भाजपाची बी टीम असल्याचा आरोप करते आहे. एमआयएम मतांचे ध्रुवीकरण करून, भाजपाला मदत करीत असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. तर, या आरोपाबाबत बोलताना आम्हाला आमचा पक्ष केवळ मुस्लिमांपर्यंत मर्यादित ठेवायचा नसून राष्ट्रीय पक्ष बनवायचा आहे, असा प्रतिवाद एमआयएमकडून केला जात आहे.