विधानसभा निवडणूक जवळ येऊन ठेपल्याने नेतेमंडळींचे दौरे व मतदारांशी संपर्क अभियान सुरू झाले आहे. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची नवनिर्माण यात्रा सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा येत्या गुरुवारपासून सुरू होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसंकल्प मेळाव्यांच्या माध्यमातून पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निवडणुकीच्या तोंडावर आयोजित करण्यात येणाऱ्या यात्रांचा राजकीय नेत्यांना फायदा होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी दोन टप्प्यांमध्ये काढलेल्या ‘भारत जोडो’ यात्रेमुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आत्मविश्वास बळावला होता. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला या यात्रेचा फायदाही झाला. २००४च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आंध्र प्रदेशमध्ये तत्कालीन काँग्रेस नेते वाय. एस. राजशेखर रेड्डी यांनी काढलेल्या पदयात्रेचे राज्याचे राजकीय चित्रच बदलले होते. राजशेखर रेड्डी यांनी पदयात्रेच्या माध्यमातून सारे राज्य पालथे घातले होते. विधानसभा निवडणुकीत राजशेखर रेड्डी यांना या यात्रेचा चांगलाच फायदा झाला आणि निवडणुकीत सत्ताबदल होऊन राजशेखर रेड्डी हे मुख्यमंत्री झाले होते.

हेही वाचा – नाशिकमध्ये परस्पर उमेदवारी जाहीर करण्याच्या स्पर्धेने महायुती, महाविकास आघाडीत वितुष्ट

२०१९ मध्ये राजशेखर रेड्डी यांचे पुत्र जगनमोहन रेड्डी यांनी राज्यात काढलेल्या यात्रेने त्यांना सत्तेची द्वारे खुली झाली होती. २०१९च्या विधानसभा निवडणुकीपू्र्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यात महाजनादेश यात्रा काढली होती. पण भाजपच्या आमदारांची संख्या तेव्हा घटली होती. तसेच शिवसेनेने महाविकास आघाडीत प्रवेश केल्याने फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदही मिळाले नव्हते. याशिवाय माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्यासह अनेक नेत्यांच्या पदयात्रा गाजल्या होत्या.

विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचे जाहीर केलेले मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची नवनिर्माण यात्रा सोमवारपासून सुरू झाली. ५ ते १३ ऑगस्ट या दरम्यान राज ठाकरे हे सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये भेटी देणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेला येत्या गुरुवारपासून सुरुवात होत आहे. २४ दिवसांत ३९ विधानसभा मतदारसंघांमध्ये पवार हे सर्वसामान्यांशी संवाद साधणार आहेत. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथून सुरू होणारी यात्रा पहिल्या टप्प्यात उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई आणि विदर्भातून जाणार आहे. राजकीय जीवनात अजित पवारांची ही पहिलीच यात्रा आहे.

हेही वाचा – बीडमधील आणखी एक काका-पुतण्या संघर्ष टळला ?

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसंकल्प मेळाव्यांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यावर भर दिला आहे. आतापर्यंत छत्रपती संभाजीनगर आणि पुण्यात शिवसंकल्प मेळावे पार पडले. आणखी काही मेळाव्यांचे लवकरच आयोजन केले जाणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar raj thackeray yatra and uddhav thackeray meeting before maharashtra assembly elections print politics news ssb