SP BSP Alliance Rumours Mayawati and Akhilesh Yadav : लोकसभेतील यशानंतर इंडिया आघाडीची देशभरातील ताकद वाढली आहे. तसेच आघाडीमधील पक्षांमधील एकजूट वाढल्याचं चित्र संसदेच्या अधिवेशनात पाहायला मिळालं. आता प्रसारमाध्यमांसमोरही त्यांच्यातली घट्ट मैत्री पाहायला मिळत आहे. इंडिया आघाडीतले पक्ष एकमेकांच्या बरोबरीने विविध मुद्दे मांडत आहेत. एकमेकांवरील टीकेला एकजुटीने उत्तर देत आहेत. अशातच उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीमधील संबंध सुधारू लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. भाजपा आमदाराने बसपा प्रमुख मायावतींवर केलेल्या टीकेनंतर सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी मायावतींचा बचाव केला आहे. त्यामुळे आता सपा व बसपाच्या संभाव्य युतीची चर्चा रंगू लागली आहे.

अखिलेश यादव यांनी बाजू मांडल्यानंतर मायावतींनी देखील लगेच त्यांचे आभार मानले. त्यानंतर अखिलेश यादव यांनी आणखी एक पाऊल टाकलं. ते म्हणाले, “दलित, वंचित आणि अल्पसंख्याकांसाठीच्या (Pichda, Dalit and Alpsankhyak – PDA)) युतीसाठी हे चांगली सुरुवात आहे”. अलीकडच्या काही महिन्यामध्ये सपा व बसपामधील प्रमुख नेते एकमेकांवर टीका-टिप्पणी करताना दिसलेले नाहीत. अखिलेश यादव म्हणाले, “पीडीए ही शोषित आणि वंचितांचं भविष्य आहे. आम्ही एकजूट आहोत आणि राहू”. अखिलेश यादव यांनी या वक्तव्याद्वारे सपा-बसपा युतीचे संकेत दिल्याची चर्चा होत आहे.

आघाडीसाठी बसपाचे दरवाजे खुले?

बसपाच्या प्रमुख मायावती यांनी इंडिया आघाडीत यावं यासाठी सपा व काँग्रेस हे दोन्ही पक्ष उत्सुक आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आधी देखील सपाने व काँग्रेसने मायावतींचं मन वळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तेव्हा मायावतींनी ‘एकला चलो रे’चा नारा दिला. मात्र, या निवडणुकीत उत्तर प्रदेशात मायावतींच्या पक्षाचा एकही उमेदवार निवडून आला नाही. दुसऱ्या बाजूला समाजवादी पार्टीने मात्र जोरदार पुनरागमन केलं. काँग्रेसनेही देशभरातील त्यांच्या खासदारांची संख्या जवळजवळ दुप्पट केली आहे. या गोष्टींचा विचार करता बसपा इंडिया आघाडीत सहभागी होऊ शकते. दरम्यान, एका सपा नेत्याने सांगितलं की “मायावती लोकसभा निवडणुकीच्या वेळी इंडिया आघाडीत येण्यास इच्छूक नव्हत्या. मात्र आता त्यांना कळून चुकलंय की भाजपाने त्यांच्या पक्षाचं किती नुकसान केलंय. त्यामुळे यावेळी आम्हाला वेगळ्या आशा आहेत”.

दरम्यान, युतीच्या चर्चा मायावतींनी नाकारल्या आहेत. यापूर्वी त्यांनी सपा व काँग्रेसला आरक्षणविरोधी पक्ष म्हटलं होतं. त्यामुळे मायावती या युतीचा किती गांभीर्याने विचार करतील याबाबत अनेकांच्या मनात शंका आहे. मात्र राज्यातली परिस्थिती पूर्वीसारखी राहिलेली नाही. भाजपाला टक्कर देण्यासाठी वेगळी पावलं उचलणं आवश्यक आहे.

हे ही वाचा >> Soyabean Price: लोकसभेला कांद्याने रडवले; आता ‘सोयाबीन’चा मुद्दा तापला, दर कोसळल्यामुळे विधानसभेला महायुतीसमोर आव्हान?

…तर भाजपासमोरचं आव्हान वाढेल

दुसऱ्या बाजूला, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील यशामुळे सपाचा आत्मविश्वास दुणावला आहे. सपाने राज्यातील ८० पैकी ३७ जागा जिंकल्या आहेत. सपा हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. सपा प्रामुख्याने राज्यातील यादवांच्या भरवशावर मार्गक्रमण करत होती. मात्र आता त्यांनी पीडीएकडे मोर्चा वळवला आहे. २०२७ मधील उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी दलितांची मतं मिळायला हवीत यासाठी सपा बसपाला त्यांच्याबरोबर घेण्यास उत्सूक आहे. काँग्रेसमुळे दलित व अल्पसंख्याकांची काही प्रमाणात मतं सपाने आपल्या बाजूने वळवली आहेत. त्यात मायावती सहभागी झाल्या तर आगामी निवडणूक भाजपाला जड जाऊ शकते.

हे ही वाचा >> Maharashtra BJP : लोकसभेतील अपयशानंतर भाजपाची महाराष्ट्रात पिछेहाट? आता विधानसभेसाठी ठेवलं फक्त १०० जागांचं लक्ष?

अखिलेश यादवांनी पहिलं पाऊल टाकलं

उत्तर प्रदेशमध्ये सपाचं सरकार असताना राज्यात यादवांचं वर्चस्व वाढलं होतं. यामुळे दलित सपावर नाराज होते. मात्र, मायावतींना देशातील सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री म्हणणाऱ्या भाजपा आमदारावर बदनामीचा खटला चालवण्याची मागणी करत अखिलेश यादव यांनी बसपाबरोबरच्या मैत्रीसाठी पहिलं पाऊल टाकल्याचं बोललं जात आहे. दुसऱ्या बाजूला अखिलेश यादव त्यांच्या पक्षावरील दलितविरोधी हा शिक्का पुसण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसऱ्या बाजूला मायावतींच्या पक्षालाही पुनरागमन करायचं असेल तर त्यांनी एखाद्या पक्षाबरोबर युती, आघाडी करणं आवश्यक आहे. बसपाला बरोबर घेण्यासाठी भाजपा देखील प्रयत्न करू सकते. मात्र, विचारसरणी आणि आजवरच्या राजकारणाचा विचार करता मायावतींसासाठी काँग्रेस व समाजवादी पार्टी हे दोन चांगले पर्याय असतील.