अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघात भाजप, वंचित व काँग्रेसमध्ये काट्याची लढत आहे. गेल्या दोन निवडणुकांमध्ये धार्मिक रंग चढल्याने भाजपने एकतर्फी वर्चस्व राखले होते. यावेळेस मात्र प्रमुख तीन उमेदवारांमधील मतविभाजनाचे गणित निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत. वंचित व काँग्रेसपुढे इतिसास बदलण्याचे, तर भाजपपुढे वर्चस्व राखण्याचे आव्हान आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अकोला लोकसभा मतदारसंघ १५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. १९९८ व १९९९ च्या निवडणुकांचा अपवाद सोडल्यास अकोला लोकसभा मतदारसंघात गत साडेतीन दशकांपासून तिरंगी लढत झाली. विविध प्रयोग करूनही स्वबळावर अ‍ॅड. आंबेडकर व काँग्रेसला अद्याप यश मिळवता आलेले नाही. तिरंगी लढत नेहमीच भाजपच्या पथ्यावर पडल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. काँग्रेसने २०१४ व २०१९ मध्ये अल्पसंख्याक उमेदवार दिल्याने धर्माच्या आधारावर लढतीचे समीकरण रंगले होते. त्यात भाजपने विक्रमी मताधिक्याने विजय प्राप्त केले. आता राजकीय व जातीय समीकरणात मोठा बदल झाला आहे.

हेही वाचा – मुस्लीम-यादवांच्या पलीकडे जाण्याचा लालूंच्या पक्षाचा प्रयत्न; राष्ट्रीय जनता दलाने कुणाला दिली उमेदवारी?

काँग्रेसने अकोल्यात मराठा ‘कार्ड’ टाकून डॉ. अभय पाटील यांना रिंगणात उतरवले आहे. भाजपचे अनुप धोत्रे, काँग्रेसचे डॉ. अभय पाटील व वंचितचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यात तुल्यबळ लढत होत आहे. मतदारसंघात मराठा मतदारांचे प्राबल्य आहे. दोन प्रमुख उमेदवार मराठा समाजाचे असल्याने मोठ्या प्रमाणावर मतविभाजन होणे अटळ आहे. जातीय राजकारण वरचढ होण्याची चिन्हे आहेत. काँग्रेसच्या प्रयोगामुळे यावेळेस मतदारसंघातील निवडणुकीत रंगत आली. २०१४ मध्ये भाजपला ४६.६४ टक्के, काँग्रेसला २५.८९ टक्के, तर वंचितला २४.४० टक्के मते पडली होती. २०१९ मध्ये भाजपच्या मतांमध्ये वाढ होऊन ४९.५० टक्के, वंचितला किंचित वाढीसह २४.८९ टक्के, तर काँग्रेसच्या मतांमध्ये ३.१८ टक्क्यांने घट होऊन २२.७१ टक्के मते मिळाली. या दोन निवडणुकांमध्ये हिंदू, दलित व मुस्लीम अशी थेट मतांची विभागणी झाल्याने भाजपला लाभ झाला. आता मात्र हिंदू मतांचे ध्रुवीकरण होणार आहे. दलित, मुस्लीम, ओबीसी, माळी, धनगर, आदिवासी आदी बहुसंख्य मतांची मतपेढी कुणाकडे वळते? हे देखील निर्णायक ठरू शकेल. विविध समाजाची गठ्ठा मते आपल्याकडे वळण्यासाठी उमेदवारांकडून अतोनात प्रयत्न सुरू असून त्यांच्याकडून समाज मेळावे घेण्यावर भर दिला जात आहे. विविध समाजाची गठ्ठा मते कुणाच्या पारड्यात पडतात, हे निकालाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

काँग्रेसकडून तिसऱ्यांदा मराठा उमेदवार

अकोला लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने यापूर्वी १९९६ व २००९ मध्ये अनुक्रमे डॉ. संतोष कोरपे व बाबासाहेब धाबेकर हे मराठा उमेदवार दिले होते. त्यावेळी काँग्रेसला २३.५० टक्के आणि २४.७३ टक्के मते मिळाली होती. आता तिसऱ्यांदा मराठा उमेदवार काँग्रेसने मैदानात उतरवला आहे.

हेही वाचा – “यंदा मोदी लाट नाही, आमचा विजय निश्चित”, काँग्रेसच्या उमेदवाराचा दावा

विभाजनाचा पक्षांच्या मतांवर परिणाम?

गेल्या चार निवडणुकांमध्ये विजय प्राप्त करणाऱ्या भाजपचे खासदार संजय धोत्रे यांना ३९ ते ४९.५० टक्क्यांमध्ये मते पडली आहेत. या निवडणुकांमध्ये दुसऱ्या क्रमांकासाठी वंचित व काँग्रेसमध्ये चढाओढ राहिली. वंचितला २४.४० ते ३०.१३ टक्के मते मिळाली, तर काँग्रेसला २२.७१ ते २८.१४ टक्के मते मिळाली. २०१९ मध्ये वंचित व काँग्रेस उमेदवारांच्या मतांची बेरीज करून देखील भाजपला २१ हजार २२६ मते अधिक होती. संजय धो़त्रेंनी विदर्भात सर्वाधिक दोन लाख ७५ हजार ५९६ मतांनी विजय मिळवला होता. यावेळेस विभाजनाचा पक्षांच्या मतांवर मोठा परिणाम होणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akola lok sabha constituency who will benefit from vote division in akola print politics news ssb