लातूर- लातूर जिल्ह्यातील अहमदपूर विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रत्येक निवडणुकीत दोन मराठा उमेदवारातचं प्रमुख लढत होते व मराठा उमेदवारच आमदार म्हणून निवडून येतो. हा मतदारसंघ ‘ओबीसी’ बहुल आहे त्यामुळे या मतदारसंघात यापुढे ओबीसीचाच उमेदवार निवडून आला पाहिजे यासाठी सर्वपक्षीय ओबीसींची एकजूट झाली आहे. पंधरा दिवसांपूर्वी अहमदपूर मतदार संघातील सर्वपक्षीय ओबीसींचा मेळावा झाला ,या मेळाव्यास लक्ष्मण हाके मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते.

हेही वाचा >>> Maharashtra Election 2024 : तुमसर विधानसभा मतदारसंघात ‘राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी’?

सुमारे दहा हजार लोक या मेळाव्यास उपस्थित होते. काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेस ,भाजपा ,शिवसेना शिंदे ,उबाठा सर्वच पक्षातील प्रमुख कार्यकर्ते या बैठकीस उपस्थित होते. सर्वांनीच ओबीसी समाजाचा आमदार व्हायला हवा अशी भूमिका मांडली .कोणी कोणत्याही पक्षाकडून उमेदवारी मिळवली तरी सर्वांनी त्यांच्या पाठीमागे उभे राहिले पाहिजे असा निर्णय घेतला. अहमदपूर विधानसभा मतदारसंघात बाबासाहेब पाटील व विनायकराव पाटील या दोघातच पारंपारिक लढत होते. हे दोघे कुठल्याही पक्षात असले तरी लढत दोघातच होते आणि दोघांपैकी एक आलटून -पालटून निवडून येतात एकदाच भाजपचे बब्रुवान खंदाडे निवडून आले होते. मात्र, त्यानंतर पुन्हा या दोघातच लढत झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाकडून आमदार बाबासाहेब पाटील तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून विनायकराव पाटील यांची प्रमुख लढत होणार आहे.

हेही वाचा >>> टोलमाफीच्या निर्णयाद्वारे शिंदेंचा दोन्ही ठाकरेंना शह; तीन जिल्ह्यांतील मतदारांना आकर्षित करण्यात किती यशस्वी होणार?

या दोघांना शह देण्यासाठी ओबीसी समाजातून एकाने निवडणूक लढवावी अशी भूमिका मेळाव्यात ठरली आहे. त्यानुसार भाजपा हा प्रमुख पक्ष आहे व या पक्षाला या ना त्या कारणाने उमेदवारीची संधी मिळत नाही. महायुतीत हा मतदारसंघ अजित पवार यांच्याकडे असल्यामुळे भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके व माजी आमदार बब्रुवान खंदाडे ही दोन नावे प्रामुख्याने चर्चेत आहेत. यापूर्वी खंदाडे एकदा आमदार म्हणून निवडून आले होते म्हणून त्यांनी आपणच पुन्हा उमेदवार असू अशी भूमिका घेत प्रचाराला सुरुवात केली आहे .गणेश हाके यांनाही कार्यकर्त्यांचा आग्रह असल्यामुळे तेही निवडणूक लढवण्याच्या भूमिकेत आहेत. मात्र, एका ऐवजी दोन उमेदवार रिंगणात राहिले तर त्याचा लाभ ओबीसीला होण्याऐवजी तो या दोन पैकी एका आमदाराला होऊ शकतो. ओबीसीतील एकजूट किती टिकते यावर अहमदपूर मध्ये पुन्हा दोन पाटलात निवडणूक होणार व त्याचा लाभ पाटलांपैकी कोणाला होणार की तिसऱ्याला होणार हे ठरणार आहे.