नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना राष्ट्रवादीने (शरद पवार) काटोल विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. पण, देशमुख यांनी प्रमुख कार्यकर्त्यांशी विचारविनियम करूनच मी किंवा माझा मुलगा काटोलमधून लढेल, असा पवित्रा घेतला आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असताना देशमुख यांची बदलेली भूमिका गृहकलहाचे संकेत आहे की, प्रतिस्पर्धी पक्षाला संभ्रमात टाकण्याची खेळी, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

अनिल देशमुख हे १९९५ पासून काटोल विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहे. यादरम्यान केवळ २०१४ मध्ये परातभूत झाले. ते राष्ट्रवादीचा (शरद पवार) विदर्भातील प्रमुख चेहरा आहेत. पक्षाने त्यांना अपेक्षेप्रमाणे काटोलची उमेदवारी दिली. त्यांचे नाव जाहीर होताच त्यांनी निवडक कार्यकर्त्यांची बैठक बोलावली. पक्षाने मला उमेदवारी दिली असली तरी ही निवडणूक मी लढावी की, सलीलने (मुलगा) लढावे हे मी कार्यकर्त्यांसोबत चर्चा केल्यानंतर ठरवेन, असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.

हेही वाचा – परभणी जिल्ह्यात मविआ आणि महायुतीच्या उमेदवारांची डोकेदुखी वाढली

देशमुख पुत्र सलील जिल्हा परिषद सदस्य आहेत. त्यांनी यापूर्वी दोनदा विधानसभा निवडणूक लढण्याचा आग्रह वडिलाकडे केला होता. परंतु अनिल देशमुख यांनी त्यांना थांबण्यास सांगितले आणि सलीलने ते मान्यही केले होते. आता मात्र सलील विधानसभा लढण्यावर ठाम आहेत. विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच मतदारसंघातून अनिल देशमुख यांनी संवाद यात्रा काढली होती. या यात्रेत सलील देशमुख पूर्णवेळ सहभागी झाले होते. शिवाय वडील कारागृहात असताना सलील यांनीच मतदारसंघ सांभाळला. या भागातील अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकार दरबारी सातत्याने पाठपुरावा केला. यातून मतदारसंघात त्यांचा जनसंपर्क वाढला.

सलील निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असताना पक्षाने पुन्हा अनिल देशमुख यांना उमेदवारी दिली. त्यामुळे अनिल देशमुख यांना तातडीने प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावून भूमिका मांडावी लागली असावी, असे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा – ‘अकोला पूर्व’मध्ये जातीय राजकारण निर्णायक, भाजपपुढे शिवसेना ठाकरे गट व वंचितचे आव्हान; तिरंगी लढत कुणाच्या पथ्यावर?

अनिल देशमुख हे तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अधिक आक्रमक झाले आहेत. सत्ताधाऱ्यांनी षडयंत्र रचून तुरुंगात टाकण्यात आले, असा त्यांचा आरोप आहे. त्यामुळे प्रतिस्पर्धी भाजपने अनिल देशमुख यांचा पराभव करण्याची रणनीती आखली आहे. हे समजल्यावर देशमुख सतर्क झाले आहेत. ते भाजपचा उमेदवार कोण असेल याचा अंदाज घेत आहेत. त्यासाठी अधिक वेळ मिळावा म्हणून कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगत आहेत, असेही जाणकारांचे म्हणणे आहे. दरम्यान, अनिल देशमुख यांनी सर्व प्रमुख सहकाऱ्यांशी चर्चा करून मी किंवा सलील यांनी काटोल येथून निवडणूक लढण्याचा अंतिम निर्णय घेण्यात येईल. २८ नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येईल, असे पत्रकार परिषदेत सांगितले. या मतदारसंघात अद्याप भाजपने त्यांचा उमेदवार जाहीर केला नाही हे येथे उल्लेखनीय.