सतीश कामत

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रत्नागिरी: शासनातर्फे चालू असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेत सरकारी योजनांबाबत नागरिकांच्या प्रश्नांना योग्य उत्तरे देणारे अधिकारी नसतील तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आम्ही या यात्रेच्या मागे फिरून सवाल उपस्थित करु, अशी तंबी देत उद्धव ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी प्रसंगी ही यात्रा रोखण्याचा इशारा दिला आहे.

ही यात्रा जात असलेल्या विविध ठिकाणी उपस्थित नागरिकांनी अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले. कुडाळच्या लोकप्रतिनिधींनी इंदिरा आवास व इतर योजनांबाबत शंका विचारण्याचा प्रयत्न केला. यावेळी भाजपच्या झुंडशाहीने आमच्या स्थानिक नगरसेवकांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुडाळ नगरपंचायत मुख्याधिकारी अरविंद नातू यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये आमच्याच लोकांची नावे आहेत. आडकाठी आणणारे लोक व्हिडिओमध्ये दिसत आहेत, पण त्यांची नावे नाहीत. त्यापैकी काही लोक बाहेरचेसुध्दा होते. ते झुंडशाही करत होते. तरीसुद्धा त्यांची या तक्रारीत नावे नाहीत.

आणखी वाचा-‘साखर-डाळी’ वाटपातून खासदार सुजय विखे यांची मतपेरणी सुरू

या प्रकरणी पोलिसांना नि:पक्षपातीपणे चौकशी करण्यास सांगितले आहे.विरोधी गटावरसुध्दा गुन्हे दाखल होणे आवश्यक आहेत. अन्यथा आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा देऊन नाईक म्हणाले की, मुख्याधिकारी तक्रार द्यायला तयार नव्हते, तरीही त्यांच्यावर दबाव आणून तक्रार दाखल करायला लावली असेल, तर या झुंडशाहीला लोकांचा विरोध आहे. पोलिसांना माझे आवाहन आहे की, आता यापुढे ज्या – ज्या ठिकाणी हा मोदी रथ जाईल त्या – त्या ठिकाणी संरक्षणासाठी पोलिसांची एक व्हॅन घेऊन जा. कारण या विषयावर गावागावात उद्रेक होणार आहे.

दरम्यान कुडाळ नगरपंचायतीत महाविकास आघाडीच्या सदस्यांचा विरोध डावलून भाजपच्या कार्यकर्त्यांनी विकसित भारत संकल्प यात्रेचा जोरदार शक्ती प्रदर्शनाने शुभारंभ केला. पण पटांगणावर शासनाच्या वतीने आयोजित केलेल्या संकल्प रथयात्रेच्या कुडाळ शहरी भागाच्या उद्घाटन कार्यक्रमावेळी ‘मोदी सरकार’ या नावास आक्षेप घेत कुडाळ नगरपंचायतीचे ठाकरे गटाचे उपनगराध्यक्ष किरण शिंदे, मंदार शिरसाट, उदय मांजरेकर, सचिन काळप आणि संतोष शिरसाट या महाविकास आघाडीतील ५ नगरसेवकांसह इतर १० ते १२ लोकांनी जमाव करून घोषणाबाजी केली. माजी खासदार नीलेश राणे यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा आग्रह धरला. कुडाळ नगरपंचायतीचे मुख्याधिकारी नातू यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. त्यानंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांविरुद्व रात्री उशिरा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

आणखी वाचा-एकीकडे मुख्यमंत्री सोरेन यांना ईडीची नोटीस, दुसरीकडे आमदार अहमद यांचा राजीनामा; झारखंडमध्ये काय घडतंय?

या वादामध्ये भाजप व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आमने-सामने भिडले. त्यांना नियंत्रित करण्यासाठी पोलीस आणि दंगल नियंत्रक पथक मागवण्यात आले होते. कुडाळ नगरपंचायत कार्यालय येथे विकसित भारत संकल्प यात्रा आली तेव्हा भाजपा समर्थकांनी मोदी सरकारच्या बाजूने घोषणा दिल्या. यावरून दोन्ही गटांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली दोन्ही कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. त्यांना रोखण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला.हा कार्यक्रम सुरू होत असतानाच सत्ताधारी गटाच्या नगराध्यक्षा अक्षता खटावकर, उपनगराध्यक्ष किरण शिंदे, नगरसेवक तथा गटनेते श्रेया गवंडे, अतुल बंगे इत्यादींनी पुढे येत, या यात्रेचे आम्ही स्वागत करतो, मात्र यात्रेतील रथावर ‘मोदी सरकार’ असा उल्लेख आहे.त्याला आमचा आक्षेप असल्याचे सांगत विरोध केला. याच दरम्यान भाजपा गटाच्या नगरसेविका संध्या तेरसे यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. त्यामुळे सत्ताधारी महाविकास आघाडीच्या गटाचे नगरसेवक आक्रमक झाले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Argument between bjp and maha vikas aghadi activists in sindhudurga over the development bharat sankalp yatra print politics news mrj