यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी व उमरखेड या दोन्ही मतदारसंघात भाजपने अखेर भाकरी फिरवली. विद्यमान आमदारांना डच्चू देवून आर्णी येथे माजी आमदार तर उमरखेडमध्ये नवीन चेहऱ्यास संधी दिली. महायुतीत उमरखेडची जागा रिपाईं (आ)ने मागितली होती. मात्र रिपाईंचेही स्वप्न भंगले.

आर्णी हा अनुसूचित जमाती तर उमरखेड हा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव मतदारसंघ आहे. येथे भाजपचे अनुक्रमे डॉ. संदीप धुर्वे व नामदेव ससाणे हे आमदार होते. या दोन्ही मतदारसंघात विद्यमान आमदरांबद्दल जनतेत नाराजी होती. संघटनात्मक पातळीवरही हे आमदार विशेष कामगिरी करू शकले नाही. डॉ. संदीप धुर्वे यांनी अलिकडेच नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्यासोबत सार्वजनिक कार्यक्रमात ठेका धरल्याने त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या होत्या. पक्षाने ही बाब गांभीर्याने घेतली. तसेच भाजपने केलेल्या सर्वेक्षणात आर्णी व उमरखेड येथील विद्यमान आमदारांबद्दल नकारात्मक अहवाल पक्षाकडे गेल्याचे सांगण्यात येते. या अनुषंगाने या दोन्ही मतदारसंघात विद्यमान आमदारांना यावेळी उमेदवारी दिली जाणार नाही, अशी चर्चा सुरू होती.

भाजपने आज सोमवारी जाहीर केलेल्या यादीत दोन्ही मतदारसंघातील उमेदवार घोषित करण्यात आले. आर्णी मतदारसंघात राजू तोडसाम यांना उमेदवारी देण्यात आली. राजू तोडसाम हे २०१४ मध्ये भाजपकडून निवडून आले होते. मात्र २०१९ मध्ये त्यांना भाजपने उमेदवारी न दिल्याने ते अपक्ष लढले व त्यांनी २६ हजार ९४९ मते घेतली. भाजपला सोडचिठ्ठी देवून त्यांनी काही काळ बीआरएसमध्येही प्रवेश घेतला होता. आमदार संदीप धुर्वे यांना उमेदवारी मिळणार नसल्याचे स्पष्ट होताच दोन दिवसांपूर्वी राजू तोडसाम यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करून उमदेवारी मिळविली. आता आर्णी मतदारसंघात महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे जितेंद्र मोघे तर भाजपचे राजू तोडसाम यांच्यात थेट लढत होईल. महायुतीतील डॉ. विष्णू उकंडे हे येथे अपक्ष म्हणून निवडणूक लढणार आहेत.

हेही वाचा >>>Warora Vidhan Sabha Constituency: वरोऱ्यात काँग्रेस, भाजपमध्ये बंडाचे वारे

उमरखेड विधानसभा मतदारसंघातही भाजपने विद्यमान आमदार नामदेव ससाणे यांच्याऐवजी किसन वानखेडे यांना उमेदवारी दिली. किसन वानखेडे हे उमरखेड तालुक्यातील मरसूळ येथील रहिवासी आहेत. उर्ध्व पैनगंगा प्रकल्प नांदेड विभागात ते अभियंता म्हणून शासकीय नोकरीवर होते. २००९ मध्ये उमरखेड मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्यानंतर वानखेडे यांनी शासकीय नोकरीचा राजीनामा देवून काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. काँग्रेसमध्ये दखल घेतली जात नसल्याचे बघून त्यांनी २०१९ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपने त्यांना आज उमदेवारी दिल्याने महाविकास आघाडीसमोर आव्हान निर्माण झाले आहे. महाविकास आघाडीने काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांना उमेदवारी दिली आहे. कांबळे हेसुद्धा शासकीय सेवेतून राजकारणात आले आहे. मात्र ते नांदेडचे असल्याने बाहेरचा उमेदवार दिला म्हणून उमरखेड काँग्रेसमध्ये नाराजी आहे. काँग्रेसचे माजी आमदार विजय खडसे यांनी पक्षाच्या धोरणावर नाराजी व्यक्त करत पैसे देवून उमेदवारी दिल्याचा गंभीर आरोप केला होता. आता भाजपने स्थानिक उमेदवार दिल्याने मतदारसंघात बाहेरचा विरूद्ध स्थानिक उमेदवार अशी लढत रंगणार आहे.