नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘पंचाहत्तरी’चा यॉर्कर टाकून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपची दाणादाण उडवली आहे. पुढील वर्षी मोदी ७५ वर्षांचे होत असून त्यांच्याजागी अमित शहा नवे पंतप्रधान बनतील असा दावा करत केजरीवाल यांनी दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, हिमाचल प्रदेश अशा उत्तरेतील महत्त्वाच्या राज्यांतील मतदारांमध्ये गोंधळ निर्माण केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आधी खरगे-राहुल गांधींनी तर आता केजरीवालांनी भाजपविरोधात अजेंडा निश्चित केल्यामुळे खुलासे करता करता भाजपनेत्यांची दमछाक होत असल्याचे दिसते. केजरीवालांच्या दाव्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना हैदराबादमध्ये तातडीने खंडन करावे लागले. ‘पंचाहत्तरी पार केल्यानंतरही मोदीच पंतप्रधानपदी कायम राहतील’, असे स्पष्टीकरण शहांनी दिले. मोदींच्या पंचाहत्तरीवर भाजपमधील कोणी बोलण्याचे धाडस करू शकत नाही. तरीही, ‘मोदी पंतप्रधान होणार हे तरी केजरीवालांनी मान्य केले’, अशी मोजकी प्रतिक्रिया देत राज्यसभेतील खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी भाजपची सुटका करण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा – इंदूरमध्ये काँग्रेसचा ‘NOTA’साठी प्रचार; भाजपा अडचणीत?

२०१४ मध्ये मोदी पंतप्रधान झाल्यानंतर, भाजपने ७५ वर्षे पूर्ण झालेल्या नेत्यांना राजकारणातून निवृत्त करण्याचा नियम केला. त्यामुळे लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासह अनेक नेते ‘मार्गदर्शक मंडळा’त गेले. पुढील वर्षी सप्टेंबरमध्ये मोदींना ७५ वर्षे पूर्ण होत असून भाजपच्या नियमाप्रमाणे मोदींनी राजकीय निवृत्ती घेऊन भाजपच्या मार्गदर्शक मंडळात गेले पाहिजे, असे केजरीवाल सुचवत आहेत. तसे झाले तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेच नवे पंतप्रधान बनतील. त्यामुळे मतदारांनी मोदींकडे बघून भाजपला मते दिली तरी, ती अमित शहांचे हात बळकट करणारी ठरतील. त्यापेक्षा मतदारांनी भाजपला मते देऊ नये, असे आवाहन केजरीवाल यांनी केले आहे.

तिहार तुरुंगातून बाहेर येताच ‘आप’चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी मोदींविरोधात जरबदस्त तलवारबाजी सुरू केली आहे. त्यांच्या प्रत्येक शाब्दिक वारावर भाजपला प्रतिक्रिया द्यावी लागत आहे. २०१४ व २०१९ या दोन्ही लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने राजकीय अजेंडा निश्चित केला होता, त्यावर काँग्रेससह इतर विरोधी पक्षांना प्रतिक्रिया द्यावी लागत होती. त्यावेळी भाजपने नवनवे मुद्दे मांडून विरोधकांना नाकेनऊ आणले होते. यावेळी विरोधकांच्या मुद्द्यांवर भाजपची फरफट होताना दिसते. काँग्रेसने जातनिहाय जनगणना, ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षणाची तरतूद, लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण, निवडणूक रोख्यांतील घोटाळा, संविधान बदलाचा धोका असे भाजपसाठी अडचण ठरणारे अनेक मुद्दे अधिक उपस्थित केले आहेत. राहुल गांधींनी मोदींना जाहीर चर्चेचे आव्हान दिल्यावर, ‘आव्हान देणारे राहुल गांधी कोण’, असा प्रतिप्रश्न करून भाजपच्या स्मृति इराणींना मोदींचा बचाव करावा लागला आहे.

हेही वाचा – ना बालाकोट, ना राम मंदिराचा प्रभाव; मोदींनी विरोधकांसमोर गुडघे टेकल्याचा अधीर रंजन चौधरींचा दावा

केजरीवालांनी मोदींच्या पंचाहत्तरीचा मुद्दा ऐरणीवर आणून भाजपमधील पक्षांतर्गत स्पर्धेला खतपाणी घातल्याचे मानले जात आहे. २०२४च्या निकालाची आतुरतेने वाट पाहणारे राजनाथ सिंह, नितीन गडकरी, योगी आदित्यनाथ अशा अनेक मोदी विरोधकांच्या महत्त्वाकांक्षेला केजरीवालांनी चुचकारले आहे. त्यातून मोदीविरुद्ध शहा आणि शहा विरुद्ध इतर नेते असा संघर्ष तीव्र होण्याची शक्यता केजरीवालांनी अप्रत्यक्षपणे सूचित केली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arvind kejriwal comments on pm modi bjp confused by his statement that modi will be 75 years old and he will retire and amit shah will get power print politics news ssb