नांदेड : १९९०च्या दशकात एकाचवेळी राज्यमंत्री झालेले अशोक चव्हाण आणि डॉ. माधव किन्हाळकर हे बालमित्र गेल्या दशकांतील राजकीय कटुता आणि त्यातून झालेल्या व महाराष्ट्रभर गाजलेल्या कायदेशीर लढाईनंतर तब्बल २५ वर्षांनी ‘राम-राम’ म्हणत एकाच पक्षात एका व्यासपीठावर आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्ह्याच्या राजकारणात बिनीचे शिलेदार ही या दोघांची ठळक ओळख. अशोक चव्हाण १९८७ साली राजकीय पदार्पणातच नांदेडचे खासदार झाले तर डॉ. किन्हाळकर १९९० साली वयाच्या ३२ व्या वर्षी भोकर मतदारसंघातून विधानसभेमध्ये दाखल झाले. त्याआधी १९८९च्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या चव्हाण यांना १९९२ साली राज्य विधानपरिषदेत संधी मिळाली आणि त्यानंतर हे दोघेही १९९३ साली शरद पवारांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री झाले. त्यानंतर सुमारे ६ वर्षे हे दोघेही काँग्रेस पक्षात एकत्र होते. पण १९९९ साली शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यानंतर डॉ. किन्हाळकर त्या पक्षामध्ये गेले. त्यातून वरील दोन राजकीय नेत्यांची जिल्ह्याच्या राजकारणात ताटातूट झाली, तरी दोघांत राजकीय शत्रुत्व निर्माण झालेले नव्हते. २००९ मध्ये भोकर मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर तेव्हा मुख्यमंत्री असलेल्या अशोक चव्हाण यांना डॉक्टरांनी निवडणुकीत आव्हान दिले, पण त्यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला. पुढे ‘पेडन्यूज’ आणि निवडणूक खर्चाच्या प्रकरणातील कायदेशीर लढाईमध्ये
डॉ. किन्हाळकर यांनी चव्हाणांना चांगलेच कोंडीत पकडले होते. त्यातून त्यांच्यात व्यक्तिगत आणि राजकीय या दोन्ही पातळ्यांवर कटुता निर्माण झाली. निवडणूक आयोगासमोरची लढाई डॉ. किन्हाळकरांनी जवळपास जिंकली होती, पण नंतर त्यात काय झाले, ते जनतेला कळालेच नाही.

हेही वाचा – साताऱ्यात उदयनराजे यांना महायुतीतूनच विरोध

आधी काँग्रेस, मग राष्ट्रवादी काँग्रेस असा प्रवास करून डॉ. किन्हाळकर यांनी २०१४ साली भाजपामध्ये प्रवेश केला. त्यानंतर लगेचच या पक्षाकडून त्यांनी भोकर मतदारसंघात निवडणूक लढविली. त्यात ते पुन्हा अपयशी ठरले. २०१९ मध्ये अशोक चव्हाण यांच्याविरुद्ध भाजपाकडून लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा किन्हाळकरांनी व्यक्त केली होती, पण पक्षाने उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांना थांबावे लागले.

२०२४ साल उजाडले तेव्हा अशोक चव्हाण काँग्रेसच्या माध्यमातून सक्रिय झाल्याचे दिसत होते. लोकसभा निवडणूक लढवायची नाही, हे त्यांनी आधीच ठरवले होते. पण नांदेडची जागा काँग्रेसला मिळवून देण्याच्या निर्धाराने ते कामाला लागले होते. पक्षातील इतर पदाधिकारी आणि सहकार्‍यांना त्यांनी जबाबदार्‍या वाटून दिल्या होत्या. बघता-बघता फेब्रुवारी महिना उजाडला होता, पहिल्या आठवड्यात चव्हाणांनी पक्षाच्या स्थानिक व राज्यस्तरीय बैठकांत भाग घेतला; पण १२ तारखेची सकाळ त्यांच्या संदर्भातील एका ठळक बातमीनेच उगवली. चव्हाण यांनी आमदारकी आणि काँग्रेसला सोडचिठ्ठी देत दुसर्‍याच दिवशी भाजपामध्ये प्रवेश करून सर्वांनाच धक्का दिला.

हेही वाचा – मुद्दा महाराष्ट्राचा : मराठवाडा उत्तरांच्या शोधात…

मागील काही वर्षांत नांदेडमधील भाजपा काँग्रेसमय झालेली होतीच. सूर्यकांता पाटील, चिखलीकर, किन्हाळकर, गोजेगावकर, राठोड परिवार असे अनेकजणं भाजपात आधीपासूनच कार्यरत होते. त्यात चव्हाणांची भर पडली. यानिमित्ताने चव्हाण व डॉ. किन्हाळकर तब्बल २५ वर्षांनंतर भाजपाच्या माध्यमातून ‘कमळवीर’ झाले आहेत. या दोघांचे वडील स्थानिक राजकारणात दीर्घकाळ एकत्र होते. दोघेही काँग्रेसनिष्ठ म्हणून ओळखले गेले. भुजंगराव किन्हाळकरांच्या तुलनेत शंकरराव चव्हाणांनी राजकारणात मोठी झेप घेतली. या दोघांनीही भाजपाला आपला राजकीय शत्रूच मानले. पण आता त्या दोघांची मुले ‘राम-राम’ म्हणत मोदीनिष्ठ झाले आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashok chavan dr madhav kinhalkar together after 25 years print politics news ssb
Show comments