देशभरात लव्ह जिहादचा मुद्दा तापला असतानाच आता आसामचे भाजपाचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी एक नवी संज्ञा वापरल्यामुळे आसाममधील राजकारण तापले आहे. सरमा यांनी फर्टिलाइजर जिहाद हा शब्दप्रयोग केल्यामुळे बंगाली मुस्लीम समुदायाला ते लक्ष्य करत असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. गुवाहाटी येथे एका कृषी कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी नैसर्गिक शेतीचा अवलंब आणि विकासासाबत भाष्य केले. यावेळी त्यांनी आसाम सरकार फर्टिलाइजर जिहादच्याविरोधात लढण्यासाठी तयार असल्याचे सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुख्यमंत्री आपल्या भाषणात म्हणाले, “आपल्या माती आणि निसर्गात अपरिमित शक्ती दडलेली आहे. त्या शक्ती वापरण्याची कला आपण शिकले पाहिजे. युरीया, फॉस्फेट, नायट्रेट आदी खंताची कोणतीही गरज नाही. जेव्हा आसाममध्ये भाजपाचे सरकार स्थापन झाले होते, तेव्हा आम्ही सार्वजनिकरित्या रासायनिक खंताच्या अनियंत्रित वापरावर मर्यादा आणणार असल्याचे बोललो होतो. रासायनिक खतांमुळे जी पिके उत्पादित केली जातात, त्यातून किडनी आणि हृदयाशी संबंधित आजार वाढत आहेत.” सरमा यांच्या वक्तव्यानंतर विरोधकांनी हल्लाबोल केला. राज्यातील बंगाली मुस्लीम शेतकरी मोठ्या संख्येने भाजीपाला उत्पादक आहेत, त्यांना लक्ष्य करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सदर वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला.

फर्टिलाइजर जिहाद ही संज्ञा वापरण्याची मुख्यमंत्री सरमा यांची पहिली वेळ नाही. २०२१ रोजी विधानसभेचा प्रचार करत असताना त्यांनी याबाबत इशारा दिला होता. सरबानंद सोनावल यांच्या सरकारमध्ये सरमा आरोग्य मंत्री म्हणून काम करत होते, त्यावेळी त्यांनी सांगितले की, आसामवर रासायनिक आणि जैविक हल्ला चढवला जात आहे. खरुपेटिया आणि दलगाव येथील काही लोक हा हल्ला करत आहेत, असा दावा त्यांनी केला होता. सरमा यांनी उल्लेख केलेली ही दोन क्षेत्रे दारंग या जिल्ह्यातील आहेत. या जिल्ह्यात प्रामुख्याने बंगाली मुस्लीमांची संख्या अधिक आहे. तसेच जिल्ह्यात भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते आणि गुवाहाटीसह राज्यात इतर भागांमध्ये याचठिकाणाहून भाजीपाल्याचा पुरवठा केला जातो.

हे वाचा >> आसाममधील भाजपा सरकार बहुपत्नीकत्वविरोधी कायदा आणणार, समान नागरी कायद्याच्या दिशेने पहिले पाऊल?

जोरहाट, शिवासागर आणि आसामच्या वरच्या पट्ट्यात असलेले अनेक जिल्हे भाजीपाल्याच्या बाबतीत खरुपेटिया आणि दलगावमधून पुरवठ्यावर अवलंबून आहेत. मात्र येथील शेतकरी शेतमाल लवकर पिकवण्यासाठी तसेच दिर्घकाळ टिकावा यासाठी घातक रसायनांचा वापर करत आहेत, असे सरमा म्हणाले होते.

आसाम अल्पसंख्याक विद्यार्थी संघाचे सरचिटणीस मिनातूल इस्लाम यांनी सरमा यांच्या वक्तव्याचा विरोध केला. ते म्हणाले, मुख्यमंत्री कार्यालयाने अशी भाषा वापरणे त्यांना शोभा देत नाही. संपूर्ण राज्याला अन्न पुरविण्याचे काम अल्पसंख्याक समाजाकडून केले जात आहे. विशेषतः मिया मुस्लीम समुदायाचा यात महत्त्वाचा वाटा आहे. शेतकरी आपली पिके वाढविण्यासाठी प्रत्येक हंगामात जीवतोड कष्ट उपसतात. खरुपेटिया हा शेतीच्यादृष्टीने महत्त्वाचा भाग आहे. तर ऑल इंडिया डेमोक्रॅटिक युनायटेड फ्रंटचे सरचिटणीस अमिनूल इस्लाम म्हणाले की, खतांचा अनियंत्रित वापर हा सरकारच्याच अपयशाचे परिणाम होते. सरमा यांच्या वक्तव्यामुळे सरकारचे अपयश झाकले जात आहे.

इस्लाम पुढे म्हणाले, “रासायनिक खते आणि किटकनाशके आरोग्यासाठी घातक आहेत. राज्याच्या अन्न व कृषी विभागाने त्यावर नियंत्रण आणावे आणि त्यावर मर्यादा घालून वैज्ञानिक पद्धतीने त्याचा वापर सुनियंत्रित करावा. पण सरकार हे करत नाही. जेव्हा जिहाद सारखा शब्द वापरला जातो, तेव्हा एका समुदायावर संपूर्ण जबाबदारी ढकलून इतरांना नामानिराळे राहता येते. या गंभीर विषयातले गांभीर्याच काढून टाकण्यात आले आहे.”

हे वाचा >> ‘राज्यातील सर्व मदरसे बंद करणार,’ हिमंता बिस्वा सर्मा यांचे विधान

बरपेटा लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे खासदार अब्दुल खलीके यांनी मुस्लीम समुदायाला लक्ष्य करणाऱ्या सरमा यांच्यावर टीका केली. द्वेषाच्या माध्यमातून मतांची बेगमी करण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी थोडे पुढे जाऊन सर्वप्रकारच्या जिहादला थांबवावे. हे खरे आहे की, रासायनिक खतांचा वापर होत आहे आणि त्यावर मर्यादा आणणे गरजेचे आहे. पण हा काय फर्टिलाइजर जिहाद असू शकतो का? आणि जर मुख्यमंत्र्यांना सेंद्रीय शेती हवी आहे तर फर्टिलाइजर जिहादमध्ये असलेल्या लोकांना त्यांनी वापरू नये.

मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी याआधी अनेकदा लव्ह जिहाद विषयावर भाष्य केलेले आहे. मागच्यावर्षी गुजरात विधानसभेचा प्रचार करत असताना त्यांनी लव्ह जिहादवर कायदा आणणार असल्याचे सांगितले होते. तसेच भाजपाने लँड जिहाद (जमीन जिहाद) असाही शब्द वापरला आहे. अवैध मार्गाने जमीन बळकावणाऱ्यांच्या विरोधात हा शब्द वापरण्यात आला होता. मागच्यावर्षी सरमा म्हणाले होते की, जिहादी कारवाया करण्यासाठी आसाम हे आवडीचे ठिकाण झाले आहे. बाहेरील राज्यातील इमाम आसाममध्ये येऊन येथील मदरश्यांमध्ये मुस्लीम तरुणांना धार्मिक विचारांचे बाळकडू देत आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Assam cm himanta sarmas now talk about fertiliser jihad what is fertilizer jihad kvg
Show comments