एकेकाळी शिवसेनेचा प्रभाव असलेला हा भाग. शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण या भागात अधिक आहे. प्रामुख्याने कापूस तसेच सोयाबीन उत्पादकांच्या समस्या तशाच आहेत. योग्य भाव न मिळणे, सरकारकडून अपेक्षित मदत मिळत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. हे मुद्दे पश्चिम विदर्भात महत्त्वाचे ठरतील.

पूर्व विदर्भाच्या तुलनेत या भागात विकास कमी झाला. पश्चिम विदर्भात ३० मतदारसंघ येतात. यात अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, अकोला व वाशिम हे पाच जिल्हे यामध्ये येतात. यातील पाच ते सहा जागा सोडल्या तर बहुसंख्य मतदारसंघ ग्रामीण भागात मोडतात. लोकसभेला यंदा येथील चारपैकी महायुतीला दोन तर महाविकास आघाडीला दोन जागा जिंकता आल्या. अर्थात महायुतीला विरोधकांच्या मतविभाजनाने अकोला तसेच बुलढाण्यात हात दिला. विधानसभेच्या गेल्या वेळच्या निवडणुकीचा विचार करता, एकूण ३० जागांपैकी भाजपला येथून १५ तर शिवसेनेला चार, काँग्रेसला पाच, राष्ट्रवादी काँग्रेस दोन तर इतरांना चार जागा जिंकता आल्या. भाजप विरुद्ध काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांमध्येच विदर्भात लढाई आहे. गेल्या वेळी येथील निम्म्या जागा भाजपने जिंकल्या होत्या. मात्र अमरावती जिल्ह्यात भाजपला फटका बसला होता. ८ पैकी केवळ एका जागेवर यश मिळाले होते. लोकसभा निकाल पाहता भाजप जिल्ह्यात मोठी मजल मारेल असे चित्र नाही. यंदा काँग्रेसला संख्याबळ वाढविण्याची संधी आहे. त्यांना गेल्या वेळी या विभागात केवळ पाचच जागा मिळाल्या. अकोला व यवतमाळ जिल्ह्यात त्यांना एकही जागा जिंकता आली नाही.

हेही वाचा >>>UP Bypoll 2024 : समाजवादी पक्षाकडून काँग्रेसला दोन जागांचा प्रस्ताव; काँग्रेस पाचवर ठाम; जागावाटपावरून दोन्ही पक्षांत मतभेद?

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचे प्रभावक्षेत्र असलेल्या अकोला जिल्ह्यात एकूण पाच जागा आहेत. त्यात भाजपकडे चार, तर शिवसेनेकडे सध्या एक जागा आहे. यंदा प्रकाश आंबेडकर यांचा पक्ष येथून खाते उघडणार काय? हा प्रश्न आहे. याखेरीज प्रहार संघटनेचे बच्चू कडू सातत्याने विधानसभेवर विजयी झाले आहेत. अमरावतीमधील अचलपूर हा त्यांचा मतदारसंघ. यंदा ते तिसरी आघाडी उभारण्याच्या प्रयत्नात आहेत. महायुतीला त्यांचा पाठिंबा असला तरी ते नाराज असल्याची चर्चा आहे. सध्या बच्चू कडू यांचे दोन आमदार आहेत. बच्चू कडू यांच्याकडे तिसऱ्या आघाडीचे नेतृत्व आल्यास येथील निकालांना महत्त्व असेल. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचे पूर्वीचे सहकारी रविकांत तुपकर यांचे बुलढाणा हे कार्यक्षेत्र. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत तुपकर यांनी अडीच लाख मते मिळवत धक्का दिला होता. लोकसभेतील मते पाहता तुपकर विधानसभेला रिंगणात उतरणार हे निश्चित. युवा स्वाभिमानचे रवी राणा यांचा अमरावतीमधील बडनेरा मतदारसंघ. त्यांच्या पत्नी नवनीत राणा या लोकसभेला भाजपकडून रिंगणात होत्या. त्यामुळे राणा यांच्या मतदारसंघाबाबत उत्सुकता आहे.

ओबीसी केंद्रित राजकारण

या पट्ट्यात बऱ्यापैकी इतर मागासवर्गीय समाजाच्या मतांभोवती केंद्रित राजकारण होते. अमरावतीत प्रामुख्याने कुणबी मतदार निर्णायक ठरतात. यातील मोठ्या घटकाने लोकसभेला काँग्रेसला साथ दिली. तर दोन ते तीन मतदारसंघांत तेली आणि माळी समाज बऱ्यापैकी आहे. हा काही प्रमाणात भाजपचा पाठीराखा मानला जातो. तसेच अमरावती शहरातील काही भाग व अकोला जिल्ह्यातील दोन मतदारसंघांत अल्पसंख्याक समाजाची बऱ्यापैकी मते आहेत. उमेदवारी देताना राजकीय पक्षांना हे सारे घटक विचारात घ्यावे लागतात. एकूणच पश्चिम विदर्भात काँग्रेसचा हात तूर्तास थोडा पुढे आहे.

शिवसेनेचा प्रभाव कमी

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पूर्वी येथे शिवसेनेचा प्रभाव होता. मात्र पक्षातील फुटीनंतर तितकी ताकद या भागात राहिली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही दोन्ही गटात वैयक्तिक करिष्म्यावर राजेंद्र शिंगणे किंवा खोडके यांची ताकद आहे. मात्र पक्ष म्हणून तितके संघटन राष्ट्रवादी काँग्रेसचे नाही. हिंदुत्वाचा मुद्दा या भागात काही प्रमाणात प्रभावी आहे. आता भाजपला त्याचा कितपत लाभ मिळतो ते पाहावे लागेल.

बहुतांश ग्रामीण भाग असलेल्या या पट्ट्यात लोकसभा निवडणुकीत महायुती आणि मविआचे संख्याबळ समान राहिले. मात्र, मतविभाजनाचा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे.