अयोध्येतील हनुमान गढी मंदिराचे मुख्य पुजारी महंत राजू दास हे अनेकदा त्यांच्या धार्मिक आणि राजकीय घटनांवरील वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. शुक्रवारी (२१ जून) रात्री अयोध्येचे महंत राजू दास यांचा जिल्हाधिकारी नितीश कुमार यांच्याशी वाद झाला. फैजाबाद लोकसभा मतदारसंघातील भाजपाच्या लोकसभा निवडणुकीतील कामगिरीवरून कुमार यांच्याशी झालेल्या वादानंतर दास यांना दिलेली पोलिस सुरक्षा हटविण्यात आली. उत्तर प्रदेश कॅबिनेट मंत्री सूर्य प्रताप शाही आणि जयवीर सिंह यांनी बोलावलेल्या आढावा बैठकीत महंत राजू दासदेखील उपस्थित होते. या बैठकीत त्यांनी भाजपाच्या पराभवासाठी जिल्हा प्रशासनाच्या अलीकडील कृतींना जबाबदार धरले.

महंत दास म्हणाले की, त्यांनी शनिवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊन चर्चा केली. “मी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि शुक्रवारी घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. माझा योगी आदित्यनाथ आणि त्यांच्या न्यायावर पूर्ण विश्वास आहे,” असे त्यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले. महंत दास यांना वारंवार होणाऱ्या वादांबद्दल विचारले असता ते म्हणाले, “मी केवळ विधाने करत नाही तर त्यांचा संदर्भही घेतो. मी सनातन धर्म आणि हिंदू धर्माचा योद्धा आहे आणि त्याचे रक्षण करण्याची जबाबदारीही माझ्यावर आहे. जर कोणी आमच्या धर्मावर हल्ला केला तर मी गप्प बसणार नाही आणि नक्कीच प्रत्युत्तर देईन. जसे की, रामचरितमानसवर स्वामी प्रसाद मौर्य यांच्या आक्षेपार्ह टिप्पण्या. त्यांच्या या कृतीवर मी आक्षेप घेतला आणि माझी भूमिका स्पष्ट केली.

हेही वाचा : राहुल गांधींची नवीन ‘व्हाईट टी-शर्ट’ मोहीम काय आहे? या मोहिमेचा उद्देश काय?

महंत राजू दास सतत वादाच्या भोवर्‍यात

महंत राजू दास यांनी जानेवारी २०२३ मधील वादाचा संदर्भ दिला. स्वामी प्रसाद मौर्य यांनी केलेल्या टिप्पण्यांसाठी त्यांच्यावर २१ लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. त्यानंतर महंत दास यांचे दोन्ही समर्थक लखनौच्या एका हॉटेलमधील भांडणात सामील होते. तत्पूर्वी महंत दास अभिनेत्री स्वरा भास्कर आणि माजी टेनिसपटू सानिया मिर्झा यांच्यावरील टिप्पणी आणि शाहरुख खान मुख्य भूमिकेत असलेल्या पठाण चित्रपटातील गाण्याला केलेल्या विरोधामुळेही चर्चेत आले होते.

महंतांना देण्यात आलेली पोलिस सुरक्षा हटवताना जिल्हाधिकार्‍यांनी त्यांच्यावर नोंदवलेल्या तीन गुन्ह्यांचे कारण पुढे केले. त्यांनी शनिवारी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले की, पुजार्‍यांवर तीन फौजदारी गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाल्यापासून त्यांना देण्यात आलेली पोलिस सुरक्षा हटविण्याची प्रक्रिया सुरू झाली होती.” यावर उत्तर देताना महंत दास म्हणाले, “माझ्याविरुद्ध २०१३ आणि २०१७ मध्ये नोंदवलेले पहिले दोन गुन्हे धार्मिक आणि राजकीय मुद्द्यांवर आंदोलने, धरणे आणि पुतळे जाळण्याशी संबंधित आहेत. २०२३ मध्ये दाखल करण्यात आलेला हा खटला हनुमान गढीच्या एका साधूच्या तक्रारीवर आधारित होता. तक्रारदाराला इतर साधूंचे नाव द्यायचे होते, मात्र त्याने चुकून माझे नाव दिले आणि हे नंतर स्पष्ट झाले.”

महंत राजू दास हनुमान गढीवर कसे आले?

महंत दास यांचे जन्मस्थान आणि बालपण याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. परंतु ते असा दावा करतात की, त्यांच्या पालकांनी ते साडेचार वर्षांचे असताना त्यांना हनुमान मंदिरात देवाला अर्पण केले. त्यांची जबाबदारी त्यांचे गुरु महंत संत रामदास यांनी घेतली. मंदिरात सेवा करत त्यांनी शालेय शिक्षण आणि उच्च शिक्षण पूर्ण केले.

महंत दास म्हणाले की, अयोध्येतील के. एस. साकेत पीजी कॉलेजमध्ये असताना ते २००१ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारती विद्यार्थी परिषद (एबीव्हीपी) या विद्यार्थी संघटनेत सामील झाले. पुजारी म्हणाले की त्यांनी राज्यशास्त्र, प्राचीन भारतीय इतिहास आणि हिंदी साहित्यात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. कॉलेजमध्ये असताना त्यांनी एलएलबीची पदवीदेखील मिळवली. २०१८ पर्यंत त्यांनी एबीव्हीपीचे कार्य केले. त्यानंतर त्यांनी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद यांसारख्या संघटनांचे निमंत्रक म्हणून काम केले.

हेही वाचा : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसच्या अडचणीत वाढ; माजी मुख्यमंत्र्यांच्या सुनेचाच भाजपात प्रवेश

महंत दास यांना नागा साधू म्हणूनही ओळखले जाते. महंत दास म्हणाले की, जेव्हा ते हनुमान गढी मंदिरात आले तेव्हा तेथे १,५०० साधू होते, जे निर्वाणी आखाड्याचे सदस्य होते. मंदिरातील साधू उज्जयनीया, बसंतीया, हरद्वारी आणि सागरिया या नावाने ओळखल्या जाणार्‍या चार पट्यांचे किंवा शाळांचे असतात. महंत दास उज्जयनीया पट्टीचे आहेत. महंत दास म्हणाले की, या चार शाळांचे साधू केवळ मंदिराचे व्यवस्थापनच नाही तर संपूर्ण भारतातील निर्वाणी आखाड्याचे उपक्रमही पाहतात.