देशात २०२४ साली होणाऱ्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षाकडून तयारी सुरु झाली आहे. पश्चिम बंगामध्येही तृणमूल काँग्रेसने पक्षाने ( टीएमसी ) कंबर कसली आहे. मात्र, त्यापूर्वी पश्चिम बंगालमध्ये फेब्रुवारी महिन्यात पार पडणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत टीएमसी, भाजपा, काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा ( माकप ) कस लागणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीतही भाजपाला पश्चिम बंगालमध्ये सपाटून मार खावा लागला होता. तर, दोन्ही निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने समाधानकारक कामगिरी केली. होती. मात्र, मागील काही दिवसांपासून राज्यातील भ्रष्टाचाराची प्रकरणे, ईडी आणि सीबीआयचा मागे असलेला ससोमिरा यामुळे टीएमसीची डोकेदुखी वाढली आहे. त्याचाच फायदा घेत भाजपाने टीएमसीविरोधात मोर्चा उघडला आहे. त्यात आता लोकसभेपूर्वी फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष मैदानात उतरले आहेत.

हेही वाचा : राहुल गांधींसोबत पदयात्रेसाठी नागपूर, चंद्रपुरात काँग्रेस नेत्यांचा मॉर्निंग वॉक सुरू

त्याच पार्श्वभूमीवर 1 नोव्हेंबरपासून टीएमसीच्या महिला विभागाकडून गावातील प्रत्येक नागरिपर्यंत पोहचण्यासाठी “चलो ग्राम जय” ( चला गावांना भेट देऊया ) या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. १२ नोव्हेंबरपर्यंत हा कार्यक्रम सुरु असेल. यामाध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात आणि बूथवर बैठका आयोजित करण्यात येणार आहे. तसेच, सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ दुर्गम भागातील महिलांना मिळतो की नाही, यासाठी मंगळवारपासून महिला विभागाकडून घरोघरी जाण्याचा संकल्प केला आहे. त्यानंतर याचा अहवाल २५ नोव्हेंबरपर्यंत पक्ष नेतृत्वाला सादर करण्यात येईल.

याबाबत बोलताना टीएमसीच्या मंत्री चंद्रिमा भट्टाचार्य म्हणाल्या, “दोन महिने ही मोहिम सुरु राहणार आहे. पहिल्याच दिवशी आम्हाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. भाजपा, काँग्रेस आणि माकपकडून टीएमसीच्या सरकारला बदनाम करण्याचा डाव रचला जात आहे. यामध्ये ते यशस्वी होणार नाही,” असेही भट्टाचार्य यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा : भारत जोडो यात्रेसाठी उत्तर महाराष्ट्रातूनही रसद, पण काँग्रेसला लाभ कितपत ?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपा ब्लू प्रिंट तयार करत आहे. यामध्ये भ्रष्टाचाराचा मुद्दा प्रमुख असणार आहे. “भाजपा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक मुद्द्यांव्यतिरिक्त भ्रष्टाचाराचा मुद्दा उचलला जाऊ शकतो. त्यामध्ये मनरेगाच्या कामात, केंद्रीय योजनांत, नोकर भरतीत झालेल्या भ्रष्टाचारांचा मुद्दा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उपस्थित केला जाऊ शकतो,” असे एका भाजपा नेत्याने सांगितलं.

तर, माकपने राज्यात “ग्राम जगाओ, बांगला बचाओ” या कार्यक्रमाची घोषणा केली आहे. याबाबत माकपच्या एका नेत्याने म्हटलं की, “दिवाळीपासून आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी काम करत आहे. बूथ स्तरावरील संघटना मजबूत करण्यासाठी आम्ही पंचायत परिसरातील प्रत्येक ठिकाणी भेट देणार आहोत. त्यासाठी बूथनिहाय गटही करण्यात येतील,” असेही या नेत्याने स्पष्ट केलं.

हेही वाचा : आधी हार्दिक पटेल यांचे सहकारी, आता अरविंद केजरीवालांना साथ; गुजरातमधील पाटीदार नेत्यांचा ‘आप’मध्ये प्रवेश

दरम्यान, बूथ स्तरावर कोणत्याही प्रकारे कार्यकर्त्याचे जाळं नसणाऱ्या काँग्रेस पक्षाकडून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी अद्याप कोणतीही तयारी करण्यात आली नाही. मात्र, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी मुर्शिदाबाद या बालेकिल्ल्यावर लक्ष केंद्रित केलं आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Before 2024 loksabha election west bengal parties ready for february panchayat elections ssa