नांदेड : ‘अब की बार किसान सरकार’चा नारा देत भारत राष्ट्र समिती या आपल्या पक्षाचा देशभर विस्तार करण्याची घोषणा तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी पूर्वीच केली आहे. राज्यातील निवडणुका पूर्ण ताकदीने लढण्याचा निर्णय पक्षाने घेतला असून, राव यांनी राज्यातील घडामोडीमध्ये स्वत: लक्ष घातले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बीआरएसने आपल्या विस्ताराची सुरुवात नांदेड जिल्ह्यापासून केली असून मागील चार महिन्यांत मुख्यमंत्र्यांनी नांदेड आणि लोहा येथे दोन जाहीर सभा घेतल्यानंतर महाराष्ट्रातील प्रमुख कार्यकर्त्यांचे दोन दिवसांचे प्रशिक्षण शिबीर नांदेडमध्ये घेण्यात आले. या शिबिराला महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदारसंघापैकी २७८ मतदारसंघातले प्रतिनिधी हजर होते, अशी माहिती या पक्षात महत्त्वाची जबाबदारी पार पाडणारे नांदेड जिल्ह्यातील माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांनी दिली.

हेही वाचा – विरोधकांच्या गाठीभेटीनंतर नितीश कुमार, तेजस्वी यादव यांची आज काँग्रेससोबत बैठक; विरोधक पाटण्यात शक्तिप्रदर्शन करणार

महाराष्ट्र विधानसभेच्या आधी इतर कोणत्याही म्हणजे मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ या राज्यांतील विधानसभा निवडणूक हा पक्ष लढविणार नाही, असे धोंडगे यांनी स्पष्ट केले. नुकत्याच पार पडलेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत राव यांच्या पक्षाने सहभाग घेतला नाही. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे या पक्षाने आधीच जाहीर केले होते, पण या निवडणुकांबाबतची अनिश्चितता अद्याप कायम असल्यामुळे भारत राष्ट्र समितीने महाराष्ट्रात आता पक्षविस्ताराचा कार्यक्रम आखला असून यासंदर्भात मार्गदर्शक सूचना आणि इतर माहिती नांदेडच्या शिबिरामध्ये पक्षातर्फे देण्यात आली.

या शिबिराच्या उद्घाटन सत्राला पक्षप्रमुख व मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव उपस्थित होते. शिबिरार्थींना त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. पक्षातर्फे सर्व मतदारसंघातील प्रतिनिधींना ‘टॅब’चे वितरण करण्यात आले, तसेच आपापल्या मतदारसंघात गेल्यानंतर पक्षाच्या व पक्षातील इतर आघाड्यांच्या (युवा, महिला, किसान इत्यादी) शाखा स्थापन करण्याचा कार्यक्रम देण्यात आला. या शिबिरामध्ये पक्षाने बाहेरील कोणत्याही तज्ज्ञाला निमंत्रित केले नव्हते. पक्षातील जुन्या व काही नव्या नेत्यांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन केले. दुसऱ्या दिवशी सायंकाळपूर्वीच शिबीर संपले.

हेही वाचा – वर्ध्यात काँग्रेस-राष्ट्रवादीत सभापतीपदावरून बिनसले

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी लोकसभा निवडणूक आहे. ही निवडणूक वरील पक्ष स्वबळावर लढणार काय, ते स्पष्ट झालेले नाही. महाराष्ट्रात भाजप व शिंदे गटाविरुद्ध विरोधी पक्षांची आघाडी मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू असताना, भारत राष्ट्र समितीच्या महाराष्ट्रातील पदार्पणाने नवे प्रश्न निर्माण केले आहेत.

भाजपबाबत काय भूमिका ?

भारत राष्ट्र समितीच्या राजकीय हालचालींवर काँग्रेस पक्ष लक्ष ठेवून आहे. या समितीने भोकर बाजार समितीमध्ये सर्व जागा लढविल्या, पण तेथे पक्षप्रमुख नागनाथ घिसेवाड यांच्यासह सर्व उमेदवार पराभूत झाले. देशात भाजपविरोधी प्रमुख पक्षांमध्ये ऐक्य निर्माण होत असताना, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची भाजपसंदर्भात नेमकी काय भूमिका आहे, ते स्पष्ट झाले पाहिजे, असे मत काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी येथे व्यक्त केले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bharat rashtra samiti focus is on maharashtra print politics news ssb