ठाणे : गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत भिवंडीत, मतदानाचा वाढलेला टक्का हा कुणाच्या पथ्यावर पडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर भाजपचा प्राबल्य असलेल्या मुरबाड, बदलापूर आणि शहापूर भागातील कुणबी मतदार कुणाची साथ देतात, यावर मतदार संघाचा निकाल अवलंबून आहे. भिवंडी लोकसभा मतदार संघाची २०१९ मध्ये निवडणुक झाली. त्यावेळेस मतदार संख्या १८ लाख ५८ हजार २४७ इतकी होती. या निवडणुकीत मोदी लाटेत भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी १ लाख ५१ हजार मताधिक्याने विजय झाले होते. यंदाच्या निवडणुकीत मतदार संख्येत वाढ होऊन ती २० लाख ८७ हजार ६०४ झाली. २ लाख २५ हजार मतदार संख्येत वाढ झाली. यामध्ये भाजपचा प्राबल्य असलेल्या मुरबाड विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक म्हणजेच ४ लाख ४३ हजार ५ तर, कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्रात ४ लाख २७८ मतदारांचा समावेश आहे. शहापूर विधानसभा क्षेत्रात २ लाख ७९ हजार १७६ मतदार आहेत. यातील मुरबाड, शहापूर आणि बदलापूर पट्टयात कुणबी समाज मोठ्याप्रमाणात वास्तव्यास आहे. मुरबाड भागात भाजपचे आमदार किसन कथोरे यांचे वर्चस्व असून याच भागातून कपील पाटील यांना मुरबाडमध्ये ६४ हजार ३५४ इतके मताधिक्य मिळाले होते. त्याचबरोबर शहापूरमधून १४ हजार ३८७ इतके मताधिक्य मिळाले होते. यंदाच्या निवडणुकीत कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी पाटिल यांना पाठिंबा दिला असला तरी जिजाऊ संघटनेचे अपक्ष उमेदवार निलेश सांबरे हे कुणबी समाजाचे आहेत. कपिल पाटिल आणि सुरेश म्हात्रे हे दोन्ही उमेदवार आगरी समाजाचे आहेत. सांबरे हे जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासुन वैद्यकीय मदत, शैक्षणिक, महिला रोजगार निर्मीती अशी कामे करीत आहेत. याच कामांचा त्यांनी प्रभावीपणे प्रचार करत समाजासह इतर मतदारांना प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला. यामुळे मुरबाड, शहापूर आणि बदलापूर पट्ट्यात सांबरे यांच्यामुळे कुणबी मतविभाजन होऊन त्याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मुरबाडमध्ये ५९.२० टक्के, शहापूरमध्ये ६३.५७ टक्के मतदान झाले असून येथील कुणबी समाजाने कुणाची साथ दिली, हे निकालानंतरच स्पष्ट होईल
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा