सुमित पाकलवार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गडचिरोली : २०१९ विधानसभा निवडणुकीत आश्वासनानंतरही महाविकास आघाडीने जागा न सोडल्यामुळे लहान मित्रपक्षांना मोठे नुकसान झेलावे लागले होते. त्यामुळे यावेळेस जागावाटपात सन्मानजनक वाटा मिळावा यासाठी डाव्यांसह समविचारी १३ पक्षांनी प्रागतिक पक्ष या नावाखाली मोट बांधली असून ते राज्यभरात सभा घेत शक्ती प्रदर्शन करणार आहेत. या सभांच्या माध्यमातून ते जनतेच्या विविध मागण्या मांडणार असून शेवट मंत्रालयावर मोर्चातून होणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांची चिंता वाढली असल्याचे चित्र आहे.

देशासह राज्यात निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. पुढे होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था व त्यांनतर लोकसभा निवडणुकांना केंद्रस्थानी ठेऊन भाजप, काँग्रेससह विविध राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून काँग्रेस आणि भाजप राज्यभरात संपर्क अभियानदेखील राबवित आहेत. अशा स्थितीत महाविकास आघाडीतील मोठ्या पक्षांकडून समविचारी मित्रपक्षांना ऐनवेळेवर मिळणाऱ्या वागणुकीचा भूतकाळ लक्षात घेता यावेळेस प्रागतिक पक्षांनी सुध्दा त्यांचे राजकीय अस्तित्व दाखविण्यासाठी शक्तिप्रदर्शन करण्याचे ठरविले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाची पारंपरिक जागा सांगोला, पनवेल, उरण, पेन, अलिबाग यासह काही जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार दिल्याने मित्रपक्षांना याचा फटका बसला. यातील काही जागांवरील उमेदवार तर फार कमी मताने पडले.

हेही वाचा >>> अजित पवारांचा सावध पवित्रा, भुजबळांचा सारा रोख शरद पवारांवर

महाविकास आघाडीचे मित्रपक्ष असतांनाही अशाप्रकारे कोंडी होत असल्यामुळे या पक्षाच्या नेत्यांनी वेळोवेळी ही खंत बोलून दाखविली आहे. त्यामुळे यावेळेस सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न घेऊन १३ पक्ष ४ सप्टेंबरपासून राज्यातील विविध १३ ठिकाणी या महाराष्ट्र जनजागरण सभा घेणार आहेत. या सभांची सांगता २८ नोव्हेंबररोजी मंत्रालयावर मोर्चा काढून होणार असली तरी यातून येणाऱ्या निवडणुकांत जागावाटपात सन्मानजनक वाटा मिळावा यासाठी महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांना आव्हान देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

हेही वाचा >>> Maharashtra News Live: “सत्तेची हाव नाही तर शपथ का घेतली?” संजय राऊतांचा अजित पवारांना सवाल; यासह महत्त्वाच्या घडामोडी

प्रागतिक पक्षांच्या या आघाडीमध्ये राज्यातील शेतकरी कामगार पक्ष, जनता दल (सेक्युलर) महाराष्ट्र, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, स्वाभिमानी पक्ष व स्वाभिमानी शेतकरी संघटना, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, समाजवादी पार्टी महाराष्ट्र, बहुजन विकास आघाडी, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष, लाल निशाण पक्ष, भाकपा (माले) लिबरेशन पार्टी, रिपाई (सेक्युलर) पार्टी व श्रमिक मुक्ती दल हे तेरा घटक पक्ष सहभागी आहेत. यातील एक सभा गडचिरोली येथेही होणार असून विधानसभेवर शेतकरी कामगार पक्षाने दावा केला आहे. या सभांना प्रागतिक पक्षातील प्रमुख नेत्यांसह शेकापचे नेते आमदार जयंत पाटील, माजी खा. राजू शेट्टी, आ. अबू आझमी, प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा >>> आप पक्ष बिहारमध्ये निवडणूक लढवणार, विरोधकांच्या आघाडीत बिघाडी?

देशात लोकशाही धोक्यात आली आहे. सर्वसामान्य जनता महागाई आणि बेरोजगारीमुळे त्रस्त आहेत. याविषयी आवाज उचलणाऱ्या विरोधी पक्षातील नेत्यांना हे सरकार तुरुंगात टाकत आहे. त्यामुळे सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येऊन लढण्याची आज गरज आहे. त्याच पार्श्वभूमीवर आम्ही प्रागतिक पक्ष एकत्रितपणे महाराष्ट्रातील विविध भागात जनजागरण सभा घेऊन सरकारला जाब विचारणार आहोत. मी दोन दिवसांपूर्वीच ‘इंडिया’च्या बैठकीला उपस्थित होतो. त्यामुळे यंदा मागीलवेळेस झालेल्या चुका दुरुस्त करून आघाडीतील मित्रपक्ष समविचारी पक्षातील योग्य व्यक्तीला संधी देतील ही अपेक्षा आहे. –आमदार जयंत पाटील सरचिटणीस, शेतकरी कामगार पक्ष

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Big losses to smaller allies parties are challenging the mahavikas aghadi print politics news ysh
Show comments