Bishnois : निवडणूक आयोगाने शनिवारी एक महत्त्वाची घोषणा केली. ही घोषणा अशी होती की हरियाणा विधानसभेची निवडणूक १ ऑक्टोबरऐवजी ५ ऑक्टोबरला होईल. हे जाहीर करण्यामागे एक खास कारण आहे. भारतीय बिश्नोई महासभा यांनी असोज उत्सवाबाबत निवेदन दिलं होतं. ज्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. हरियाणा येथील निवडणुकीची तारीख बदलली. मात्र जम्मू काश्मीर येथे १८ सप्टेंबर, २५ सप्टेंबर आणि १ ऑग्टोबर अशा तीन टप्प्यात मतदान होणार आहे. हरियाणा आणि जम्मू काश्मीरची मतमोजणी ४ ऑक्टोबरला होणार होती. मात्र आता निकालाची तारीख ८ ऑक्टोबर करण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी काय सांगितलं?

निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बिश्नोई (Bishnois) समुदायाच्या असोज अमावस्या या उत्सवाचा विचार करुन हा निर्णय घेण्यात आला आहे. असोज अमावस्येचा उत्सव हा बिकानेरला होतो. सिरसा, फतेहबाद आणि हिसार या तीन जिल्ह्यातले बिश्नोई बांधव या उत्सवात सहभागी होतात. या उत्सवाला थोडी थोडकी नाही तर ३०० वर्षांची परंपरा आहे. या तीन जिल्ह्यात बिश्नोई समाज मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांचा विचार करुन निवडणुकीची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

मोहनलाल बडोही यांचं निवडणूक आयोगाला पत्र

निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर हरियाणा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष मोहनलाल बडोही यांनी २२ ऑगस्टला निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिलं होतं. या पत्रात हरियाणाची निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केली होती. मतदानाच्या तारीख पुढे ढकलली तर रहिवाशांना २ ऑक्टोबरच्या गांधी जयंतीच्या सुट्टीसह सलग सुट्टी मिळेल असंही सांगण्यात आलं होतं. १ ऑक्टोबरला निवडणूक घेऊ नये अशी विनंती करण्यात आली होती. निवडणूक आयोगाने या विनंतीचा विचार करुन ही निवडणूक पुढे ढकलली आहे.

१ ऑक्टोबरची निवडणूक पुढे ढकलण्याची विनंती

१ ऑक्टोबरला निवडणूक घेतली तर अनेक कुटुंबं ही २९ सप्टेंबरचा रविवार धरुन असोज अमावस्येच्या उत्सवासाठी बाहेर जाऊ शकतात. याचा मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तारीख पुढे ढकलावी असंही बडोली यांनी पत्रात म्हटलं होतं. असोज अमावस्येसाठी हरियाणातल्या बिश्नोई (Bishnois) समाजाचे अनेक बांधव बिकानेरला जातात. या उत्सव आणि जत्रेसाठी लोक गेल्यास त्याचा परिणाम मतदानावर होईल असंही स्पष्ट करण्यात आलं होतं. त्यामुळे आता निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. ज्यामुळे आता लोक असोज अमावस्या उत्सवाला (Bishnois) जाऊ शकतील. भाजपासह आम आदमी पार्टी, काँग्रेस यांनीही निवडणूक पुढे ढकलण्याची विनंती केली होती.

कुलदीप बिश्नोईंनी उत्सवाबाबत काय सांगितलं?

भाजपाचे नेते आणि बिश्नोई समाज महासभेचे संरक्षक कुलदीप बिश्नोई (Bishnois) यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं की बिश्नोई समाजाचे लाखो सदस्य असोज अमावस्या साजरी करण्यासाठी प्रवास करतात. परत आल्यानंतर त्यांना आरामाचीही गरज असते. त्यामुळे निवडणूक पुढे ढकलण्याची विनंती आम्ही निवडणूक आयोगाला केली. बिश्नोई समाजासाठी असोज अमावस्या हा अत्यंत शुभ उत्सव मानला जातो. हा उत्सव वर्षातून दोनदा साजरा होतो. पहिल्यांदा फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये त्यानंतर सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये यावर्षी हा उत्सव १ ऑक्टोबर रोजी आला आहे. हिंदू कॅलेंडर नुसार या उत्सवाची तारीख ठरते असंही त्यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं तसंच बिकानेरला ज्या ठिकाणी हा उत्सव साजरा होतो तिथे बिश्नोई (Bishnois) समाजाचे संस्थापक जंबेश्वर यांची समाधीही आहे. अनेक भाविक या समाधीपुढेही नतमस्तक होतात. बिश्नोई समाजाचे सदस्य दोन दिवस एकत्र येतात आणि या उत्सवात सहभागी होतात. या ठिकाणी दिवसभर पूजा, हवन आणि यज्ञ केला जातो अशीही माहिती बिश्नोई यांनी दिली.