अलिबाग : मुस्लीम आणि बहुजन समाजात भाजपबद्दल करण्यात आलेल्या अपप्रचाराचा भाजपला लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसला. या विरोधकांकडून राबविण्यात आलेल्या अपप्रचाराची भाजपने मोठी धास्ती घेतली आहे. त्यामुळे जिल्हा पातळीवर कार्यकर्ता संमेलने घेऊन विरोधकांच्या अपप्रचाराविरोधात व्यापक मोहीम राबविण्याचे निर्देश कार्यकर्त्यांना देण्यात आले आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान विरोधकांनी मुस्लीम मतांचे ध्रुवीकरण करण्याची खेळी खेळली. याचा परिणाम रायगड जिल्ह्यातील मुस्लीमबहुल मतदारसंघात मोठ्या प्रमाणात दिसून आला. दुसरीकडे नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आले तर देशाची राज्यघटना बदलली जाईल अशी भीती बहुजन समाजात पसरली गेली. याचा भाजपला मोठा फटका बसला.

हेही वाचा >>> राजकीय खटले मागे; मराठा आंदोलनाचा फटका बसल्याने राज्य सरकारची खबरदारी

त्यामुळे जिल्हा पातळीवर कार्यकर्ता संमेलने घेऊन विरोधकांच्या अपप्रचारांना जोरदार प्रतिउत्तर देण्याचे निर्देश भाजपने कार्यकर्त्यांना देण्यास सुरुवात केली आहे. अलिबाग येथील सहाण येथे रायगड जिल्हा भाजप कार्यकर्ता संमेलन शुक्रवारी पार पडले. या संमेलनात भाजपचे कोकण प्रभारी आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना खोट्या प्रचाराला खऱ्या प्रचाराने उत्तर देण्याचा सल्ला दिला. शासनाची ध्येयधोरणे, विविध योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवा, विरोधकांचे अपप्रचार मोडून काढा, साडेतीन महिने सतत क्रियाशील राहा, असे निर्देशही त्यांनी दिले.

प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांनी जनतेशी संपर्क वाढवा आणि सतर्क राहा असा सल्ला या वेळी कार्यकर्त्यांना दिला. आमदार संजय केळकर यांनीही विरोधकांकडून पसरविण्यात येणारे संभ्रम दूर करण्यासाठी व्यापक प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे सांगितले.