पिंपरी : पवना बंदिस्त जलवाहिनीच्या विरोधात झालेल्या आंदोलकांवरील गोळीबारात तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धारेवर धरणाऱ्या भाजपची अजित पवार हे सोबत आल्याने अडचण झाली होती. त्यामुळे दीड वर्षे शांत राहिल्यानंतर भाजपने छुप्या पद्धतीने यावरून रान उठविण्यास सुरुवात केली. मावळ भाजप आणि आमदार सुनील शेळके असा राजकीय संघर्ष असला तरी त्याला निमित्त पवना बंदिस्त जलवाहिनी ठरताना दिसत आहे. त्यामुळे भाजपसोबत असूनही राष्ट्रवादीसाठी गोळीबाराचा मुद्दा डोकेदुखी आणि अडचणीचा करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पिंपरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेता अतिरिक्त पाणी उपलब्ध करण्यासाठी केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण (जेएनएनयूआरएम) योजनेअंतर्गत महापालिकेने पवना धरणातून बंद जलवाहिनीद्वारे निगडी येथील सेक्टर २३ मधील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत थेट पाणी आणण्याची योजना आखली. पवना जलवाहिनीच्या बाबतीत मावळवासीयांनी विरोधाची भूमिका घेतली असताना पोलीस बंदोबस्तात ९ ऑगस्ट २०११ रोजी भुसंपादन सुरु केले. त्याविरोधात भाजप-शिवसेनेसह शेतकर्यांनी आंदोलन केले. दगडफेक झाली. त्याला प्रत्युत्तर देताना पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. प्रकल्पाच्या विरोधातील वातावरण चिघळल्याने राज्य शासनाने १० ऑगस्ट २०११ रोजी या प्रकल्पाच्या कामाला स्थगिती दिली होती. तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसारच गोळीबार झाल्याचे आरोप भाजप-शिवसेनेच्या नेत्यांनी केले. पुढे यावरुन राजकारण रंगले. राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात नाराजी पसरली. ज्या पिंपरी- चिंचवडसाठी अजित पवार यांनी पवना बंदिस्त जलवाहिनीचा आग्रह धरला. या शहरातूनही त्यांना साथ मिळाली नाही. महापालिकेतील सत्ता गेली. पुत्राचा मावळमधून पराभव झाला. चिंचवड मतदारसंघ गमवावा लागला. २०१४ मध्ये पिंपरी मतदारसंघही हातचा गेला होता.

आणखी वाचा-Udhayanidhi Stalin : ‘सनातन’ला डेंग्यू, मलेरिया म्हणणार्‍या उदयनिधींना उपमुख्यमंत्रीपद, द्रमुकची धुरा? स्टॅलिन यांनी उत्तराधिकारी नेमला?

जलवाहिनी प्रकल्प २०११ पासून बंद होता. महायुती सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर अजित पवार यांच्या पुढाकाराने या प्रकल्पाच्या कामाची स्थगिती ८ सप्टेंबर २०२३ रोजी राज्य शासनाने उठविली. त्याला वर्ष झाले. परंतु, अद्यापही काम सुरू झालेले नाही. या प्रकल्पाला सर्वपक्षीयांचा विरोध आहे. आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा गोळीबाराचा मुद्दा चर्चेत आला आहे. राष्ट्रवादीचे आमदार असलेले सुनील शेळके त्यावेळी भाजपात होते. शेळके आणि मावळ भाजपमध्ये कमालीचे वितुष्ट आहे. शेळके यांचा प्रचार न करण्याचा ठरावही मावळ भाजपने केला आहे. भाजपचे पदाधिकारी मावळमधील गावा-गावांमध्ये जाऊन अजित पवारांनी गोळीबार करायला लावला, शेतकऱ्यांना शहीद व्हावे लागले, त्या पक्षाला मदत करू नका, असा अपप्रचार करत आहेत. भाजपमधील कार्यकर्त्यांना भडकून दिले जात आहे. त्यांच्या मनात संभ्रम निर्माण केला जात असल्याचा आरोप शेळके यांनी केला. त्याला भाजपने अद्याप कोणतेही उत्तर दिले नाही. त्यामुळे भाजप सोबत असतानाही राष्ट्रवादीला पर्यायाने आमदार शेळके यांना गोळीबाराचा मुद्दा अडचणीचा ठरताना दिसत आहे.

आणखी वाचा-One Nation One Election: १९६७..इंदिरा गांधींची पहिली तर ‘वन नेशन, वन इलेक्शन’ची शेवटची निवडणूक; ५७ वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं?

शेळके यांना भाजपसह स्वपक्षांचे आव्हान?

भाजपचे माजी आमदार बाळा भेगडे हे निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. ‘आजपर्यंत पक्ष सांगेल तसे ऐकले, पण आता माघार नाही’ असे फलक लावत भाजपचे मावळ निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे यांनीही माघार घेणार नसल्याचे संकेत दिले. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बापूसाहेब भेगडे यांनी देखील निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. मतदारसंघात त्यांचे दौरे सुरु आहेत. त्यामुळे भाजपसह राष्ट्रवादीतूनही शेळके यांच्यासमोर आव्हान उभे राहणार असल्याचे दिसते.