जालना : जिल्ह्यातील भोकरदन, बदनापूर आणि परतूर या विधानसभेच्या जागांवर सध्या भाजपचे आमदार आहेत. महायुती मध्ये जिल्ह्यातील पाचपैकी या तीन जागांच्या व्यक्तीरिक्त उर्वरित घनसांगवी आणि जालना या दोन जागांवरही भाजपचे पदाधिकारी तसेच कार्यकर्तेही दावा सांगत आहेत. ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनीही या दोन्ही जागा, महायुतीत भाजपसाठी सोडवून घेण्याच्या कार्यकर्त्यांच्या भावना पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहचविण्याचे आश्वासन दिले.

हेही वाचा >>> अकोल्यात निवडणुकीच्या तोंडावर जातीय तणावाचे समीकरण

रावसाहेब दानवे म्हणाले, गेल्या काही वर्षांत घनसावंगी आणि जालना तालुक्यात पक्षाची शक्ती वाढलेली असून त्यामुळे या जागांसाठी आग्रह करीत आहेत. एखाद्या निवडणुकीत पराभव झाल्यावर उमेदवार अलिप्त होतो आणि चार-सहा महिने जनतेला तोंड दाखवत नाही. आपण पराभवाने खचून न जाता पुन्हा कामाला लागलो. संपूर्ण लोकसभा मतदार संघात दौरा केला.

हेही वाचा >>> भोसरीत आमदार महेश लांडगेंची उमेदवारी निश्चित

भोकरदनचे आमदार संतोष दानवे या वेळी म्हणाले की, रावसाहेब दानवे यांच्या माध्यमातून जिल्ह्यात अनेक विकासकामे झाली. पूर्वी घनसावंगी विधानसभा मतदारसंघात पक्षाची फारशी ताकद नव्हती. परंतु मागील तीन-चार वर्षातील विकासकामांमुळे तेथील कार्यकर्त्यांत आता विजयाची आशा निर्माण झालेली आहे. त्यामुळेच घनसावंगी आणि जालना हे दोन्हीही मतदारसंघ भाजपसाठी सोडण्यात यावेत अशी कार्यकर्त्यांची मागणी असून पक्षश्रेष्ठी नक्कीच याचा विचार करतील. पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष आणि भास्कर दानवे यांनी मागील दहा वर्षांत जालना शहरात झालेल्या अनेक विकासकामांचा तपशील देऊन त्यामुळे जालना शहराचा चेहरा-मोहरा बदलल्याचे सांगितले. या विकासकामांमुळे जालना शहरात भाजपची शक्ती वाढली असल्याने हा मतदार संघ महायुतीत आपल्या पक्षासाठी सोडवून घेण्यासाठी रावसाहेब दानवे काहीतरी सुकर मार्ग काढतील. जालना शहरात भाजपचा आमदार असावा ही कार्यकर्त्यांची भावना आहे.