BJP Delhi Vidhan Sabha Election Results History : देशाची राजधानी दिल्लीत जनेतेने सत्तांतर निवडलं आहे. भाजपाने बहुमत मिळवलं असून गेल्या १२ वर्षांपासून सत्तेत असलेल्या आपला त्यांनी नाकारलं आहे. भाजपाने ४८ जागांवर विजय मिळवला असून आपने २२ जागा आपल्या ताब्यात घेतल्या आहेत. दरम्यान, २०१५ च्या निवडणुकीत अवघ्या ३ जागा मिळवणाऱ्या भाजपाने दहा वर्षांत मुसंडी मारून सर्वाधिक जागा राजधानीत कमावल्या आहेत. त्यामुळे २००८ पासून भाजपाची दिल्लीत काय स्थिती राहिली यावर एक नजर मारुया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताची राजधानी आणि सत्तेचा केंद्रबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिल्लीत १९५२ मध्ये पहिल्यांदा विधानसभेची स्थापना झाली. त्यानंतर राजधानीला फक्त आठ विधानसभा आणि मुख्यमंत्री मिळाले आहेत. कारण १९५६ ते १९९३ या ३७ वर्षांच्या कालावधीत दिल्ली विधानसभा बरखास्त करण्यात आली आणि राज्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला. 

नव्या विधानसभेत भाजपाने तख्त राखला होता

नोव्हेंबर १९९३ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने ७० पैकी तब्बल ४९ जागा जिंकून दिल्लीचा तख्त राखला. मदन लाल खुराणा, ओ. पी. कोहली आणि व्ही. के. मल्होत्रा ​​यांसारख्या नेत्यांनी भाजपाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. काँग्रेसला केवळ १४ जागांवरच विजय मिळवता आला. याचे मुख्य कारण म्हणजे, १९८४ मध्ये राजधानीत झालेल्या शीखविरोधी दंगलीत पक्षावर गंभीर आरोप झाले होते, ज्याचा थेट परिणाम निवडणूक निकालावर झाला. दरम्यान, भाजपाने बहुमत मिळवल्यानंतर २ डिसेंबर रोजी मदन लाल खुराना यांनी दिल्लीचे तिसरे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

मात्र, १९९५ मध्ये खुराना यांच्यावर एका घोटाळ्याचा आरोप झाला, परिणामी एका वर्षापेक्षा कमी कालावधीत त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर जाट नेते साहिब सिंग वर्मा यांनी २७ फेब्रुवारी रोजी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. परंतु, अंतर्गत कलह आणि नेतृत्वामुळे राजधानीत भाजपाची स्थिती खराब होत गेली. १९९८ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी दक्षिण दिल्लीच्या तत्कालीन खासदार सुषमा स्वराज यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पण २००३ मध्ये भाजपाचा पराभव झाला अन् काँग्रेसची सत्ता आली. पुढील १५ वर्षे म्हणजेच २०१३ पर्यंत काँग्रेसने दिल्लीवर राज्य केलं.

२००८ नंतर भाजपाची स्थिती काय राहिली?

दरम्यान, २००८ ला झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला ४३ जागा मिळाल्या, भारतीय जनता पक्षाने २३ जागा कमावल्या तर बहुजन समाज पार्टीचा २ जागेवर विजय झाला. तसंच लोक जनशक्ती पार्टीने १ जागा तर अपक्ष १ उमेदवार निवडून आले होते.

२०१३ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपाने ३१ जागा मिळवून सर्वाधिक जागा मिळवणारा मोठा पक्ष ठरला होता. फक्त बहुमताचा आकडा त्यांना गाठता आला नाही. त्यामुळे या निवडणुकीत आपला २८ जागा तर काँग्रेसला ८ जागा मिळाल्याने या दोन्ही पक्षाने एकत्र येत सत्ता स्थापन केली. पण हे सरकार अल्पावधित म्हणजेच ४९ दिवसांत कोसळलं अन् दिल्लीत राष्टपती राजवट लागू झाली.

२०१५ मध्ये आपने जादू केली. आपने या निवडणुकीत ७० पैकी ६७ जागा मिळवल्या. तर भाजपाला तीन जागा मिळाल्या. तर काँग्रेसला एकही जागा मिळवता आली नाही. २०२० मध्ये आपने पुन्हा त्यांचा जलवा दाखवला अन् ६२ जागा मिळवून पुन्हा एकहाती सत्ता स्थापन केली. तर काँग्रेसला याहीवेळेला एकही जागा मिळवता आली नाही.