Delhi Assembly Elections 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. सत्ताधारी आम आदमी पार्टी आणि काँग्रेसने आपापल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजपाने देखील पहिल्या यादीत २९ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. मात्र, मुख्यमंत्रीपदाचा चेहरा त्यांनी अद्याप गुलदस्त्यात ठेवला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दिल्लीच्या रामलीला मैदानावर जाहीर सभा घेतली. यावेळी अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन करताना पंतप्रधानांनी निवडणुकीचं रणशिंग फुंकलं.

पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू केला असून ते सातत्याने भाजपाला लक्ष्य करत आहेत. भाजपाने दिल्ली विधानसभेसाठी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करावा, असं आव्हान केजरीवाल यांनी दिलं आहे. त्यांच्या या आव्हानाला पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणातून प्रत्युत्तर देत जनतेसमोर ‘केजरीवाल मॉडेल’ विरुद्ध ‘मोदी मॉडेल’ ठेवलं आहे. आम आदमी पक्ष दिल्लीसाठी ‘आपत्ती’ आहे, अशी टीका मोदींनी केली. इतकंच नाही तर पंतप्रधानांनी ‘आप’ सरकारच्या कथित घोटाळ्यांची यादी देखील वाचून दाखवली. “ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना पुढे करून काही कट्टर विश्‍वासघातकी लोकांनी दिल्लीत आपत्ती आणली”, असा टोलाही पंतप्रधानांनी लगावला.

AAP Delhi Election Results 2025 Live Updates in Marathi
AAP Delhi Election Results 2025 Highlights : केजरीवाल, सिसोदियांपाठोपाठ सत्येंद्र जैनही पराभूत
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
BJP Delhi Election Results 2025 Live Updates in Marathi
BJP Delhi Election Results 2025 Highlights: भाजपाने दिल्लीत बहुमताचा आकडा केला पार, ‘आप’ दारून पराभव
राजधानी दिल्लीत कुणाची सत्ता येणार? आकडेवारीने वाढवलं केजरीवालांचं टेन्शन (फोटो सौजन्य पीटीआय)
Political News : राजधानी दिल्लीत कुणाची सत्ता येणार? आकडेवारीने वाढवलं केजरीवालांचं टेन्शन
Delhi assembly elections 2025
Delhi assembly elections 2025: केजरीवाल, सिसोदिया, आतिशींवर पराभवाची टांगती तलवार?
Delhi Assembly Election 2025
मविआचा ईव्हीएमविरोधी आंदोलनाचा चेहरा केजरीवालांच्या मदतीला, दिल्लीच्या निवडणुकीत ‘आप’ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार
Shatrughan Sinha Campaign for AAP
शत्रुघ्न सिन्हा दिल्लीत ‘आप’चा प्रचार करणार; तृणमूलकडून काँग्रेसला ‘खामोश’ करण्याची रणनीती
Delhi Assembly Election 2025 AAP Manifesto
Delhi Assembly Election 2025 : ‘आप’चा जाहीरनामा प्रसिद्ध; दिल्लीकरांसाठी अरविंद केजरीवालांच्या १५ मोठ्या घोषणा

हेही वाचा : Money Schemes For Women : ‘लाडकी बहीण’ सारख्या योजना कोणकोणत्या राज्यांनी सुरू केल्या आहेत?

दिल्लीची निवडणूक भाजपासाठी का महत्वाची?

गेल्या २५ वर्षांपासून दिल्लीत भाजपाला सत्ता स्थापन करता आलेली नाही. मागील दोन विधानसभा निवडणुकांमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने भाजपाचा धुव्वा उडवला आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि हरियाणासारख्या शेजारच्या राज्यांमध्ये भाजपाच्या जागा कमी झाल्या होत्या. मात्र, राजधानी दिल्लीतील सर्व ७ जागांवर विजय मिळवून भाजपाने विधानसभा निवडणूक जिंकण्याचा आत्मविश्वास प्राप्त केला आहे.

शुक्रवारी झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत केंद्र सरकारने केलेल्या विकासकामांचे कौतुक केले. ते म्हणाले की, “भाजपाने दिल्लीतील जनतेसाठी अनेक पायाभूत सुविधा तसेच प्रकल्प आणले आहेत. गरिबांना हक्काची घरंही बांधून देण्यात आली आहे. मात्र, ‘आप’ सरकार दिल्लीतील जनतेवर अन्याय करत आहे.” दरम्यान, पंतप्रधानांनी केंद्र सरकारच्या विकासकामाची तुलना दिल्ली सरकारच्या प्रकल्पांशी केली.

दिल्लीसाठी अरविंद केजरीवाल यांचे ‘मॉडेल’ काय?

दिल्लीत गेल्या १० वर्षांपासून अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वातील आम आदमी पार्टीचे सरकार आहे. मतदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी ‘आप’ सरकारने मोहल्ला क्लिनिक, सरकारी शाळांमध्ये चांगले शिक्षण, २०० युनिटपर्यंत मोफत वीज आणि दररोज मोफत पाणी, अशा कल्याणकारी योजना आणल्या आहेत. याशिवाय महिला सन्मान योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेच्या खात्यात दरमहा १००० रुपये आणि पुन्हा सत्तेत आल्यास २१०० रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले आहे.

पंतप्रधान मोदींनी कोणकोणत्या मुद्द्यांकडे लक्ष वेधलं?

‘आप’ सरकारवर टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “दिल्लीतील शैक्षणिक क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न केलेले आहेत. दुसरीकडे राज्य सरकारचं खोटं बोलणं सुरू आहे. गेल्या १० वर्षांपासून दिल्लीवर राज्य करणाऱ्यांनी (आप) शालेय शिक्षण व्यवस्थेचं मोठं नुकसान केलं आहे. शिक्षणासाठी दिलेल्या निधीपैकी सरकारने निम्मा निधीही खर्च केलेला नाही.”

“दिल्लीत जे काही मोठे प्रकल्प होत आहेत, ते केंद्र सरकारमुळेच होत आहेत. दिल्लीतील रस्ते, मेट्रो, रुग्णालये, महाविद्यालये केंद्र सरकारनेच बांधली आहेत. आम्ही सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या असून ‘आप’ने विकासकामांना ब्रेक लावला आहे, अशी टीका पंतप्रधानांनी केली. “भाजपा सरकारच्या उपक्रमांमुळे गरीब आणि मध्यमवर्गीयांना सुविधा मिळतील आणि पैशांची बचत होईल”, असंही ते म्हणाले.

दिल्ली सरकारच्या योजनांवर टीका

पंतप्रधान मोदींनी ‘आप’ सरकारच्या २०० युनिटपर्यंतच्या मोफत वीज योजनेवरही निशाणा साधला. ते म्हणाले की, “केंद्र सरकारच्या योजनांमुळे लोकांना जवळपास शून्य वीज बिल येत आहे. विजेपासून पैसे कमावण्याच्या संधीही आम्ही निर्माण करत आहोत. पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेमुळे प्रत्येक घरात वीज उत्पादक तयार होत आहेत.”

पंतप्रधानांनी आपल्या भाषणात आरोग्य क्षेत्रातील केंद्र सरकारच्या कामाचाही उल्लेख केला. “दिल्लीत जवळपास ५०० प्रधानमंत्री जन औषधी केंद्र आहेत. जिथे औषधं ८० टक्के सवलतीत उपलब्ध करून दिली जातात. दिल्लीतील लोकांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मला मिळवून द्यायचा आहे. परंतु, विद्यमान ‘आपत्ती’ सरकारने (आप सरकार) त्याची राज्यात अंमलबजावणी होऊ दिलेली नाही. त्यामुळे इच्छा असूनही मला तुमची सेवा करता येत नाही. हे सर्व ‘आप’ सरकारच्या पापांमुळे घडतं आहे.”

दिल्लीत आम आदमी पार्टीचा उदय झाल्यापासून हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे असं अरविंद केजरीवाल वारंवार सांगतात. झाडू हे त्यांच्या पक्षाचे निवडणूक चिन्ह आहे. ‘आप’ने झोपडीत राहणाऱ्या लोकांपासून ते रिक्षाचालकांपर्यंत सर्व मतदारांची मनं जिंकत दिल्ली विधानसभा निवडणुकीत सलग दोनदा बहुमत मिळवलं आहे. गरिबांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवत पक्षाने मजबूत व्होटबँक तयारी केली आहे.

“मोदींनी स्वत:साठी कधीही घर बांधलं नाही”

दरम्यान, केंद्र सरकारने आर्थिक दुर्बल घटकांसाठी १ हजार ६७५ घरं नव्याने बांधली आहेत. या घरांचे उद्घाटन करताना पंतप्रधान म्हणाले की, “मोदींनी स्वत:साठी कधीही घर बांधलं नाही याची देशातील प्रत्येक व्यक्तीला कल्पना आहे. परंतु, गेल्या १० वर्षांत आम्ही जवळपास ४ कोटी गरिबांना हक्काची घरं दिली आहेत. मी शीशमहालही बांधू शकलो असतो (केजरीवाल यांनी मुख्यमंत्री असताना त्यांच्या अधिकृत निवासस्थानाच्या नूतनीकरणासाठी खूप पैसा खर्च केल्याच्या भाजपाच्या आरोपाचा हा संदर्भ आहे). पण देशातील लोकांना कायमस्वरूपी घरे मिळावीत हे माझे स्वप्न होते.”

हेही वाचा : भाजपा-संघाचे संबंध ते प्रियांका गांधींचा प्रभाव; २०२५ मध्ये या ‘५’ राजकीय विषयांकडे असेल देशाचे लक्ष

केंद्र सरकारकडून ज्या व्यक्तींना हक्काची घरं मिळाली त्यांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, “तुम्हाला झोपडीत राहणारी लोक भेटतील तर त्यांना माझ्या वतीने एक वचन द्या. त्यांना सांगा आम्हाला हक्काची घरं मिळाली असून आज नाही तर उद्या तुम्हालाही मिळणार आहेत.” वन नेशन, वन रेशनकार्ड या योजनेचा संदर्भ देताना मोदी म्हणाले, दिल्लीकरांसाठी ही योजना फारच उपयुक्त ठरली आहे. काही काळापूर्वी दिल्लीत रेशनकार्ड मिळणे अवघड होते. रेशनकार्ड तयार करण्यासाठी ‘आपत्ती’ सरकारचे (आप सरकार) लोक लाच घेत होते. परंतु, आता सर्वांनाच रेशन मिळत असून पैशांची बचत होत आहे.”

पंतप्रधानांचा काँग्रेसवर अप्रत्यक्ष निशाणा

काँग्रेसचा संविधानाचा मुद्दा खोडून काढण्यासाठी पंतप्रधान मोदींनी उपस्थितांना आणीबाणीची आठवण करून दिली. त्यांनी आपल्या भाषणात काँग्रेसचा उल्लेख केला नसला तरी, दिल्लीतील अशोक विहारबरोबर आपल्या आठवणी असल्याचं सांगितलं. आणीबाणीच्या काळात भूमिगत असताना मी याच वसाहतीत आश्रय घेतला होता, असं पंतप्रधान म्हणाले.

केंद्र सरकार विरुद्ध दिल्ली सरकार संघर्ष

गेल्या १० वर्षांपासून दिल्ली सरकार आणि उपराज्यपालांमध्ये सातत्याने वादाचे खटके उडत आहेत. केंद्र सरकारने कायद्यात बदल करून नायब राज्यपालांच्या अधिकारात आणखी वाढ केली आहे. त्यामुळे सध्याचे नायब राज्यपाल व्ही.के सक्सेना दिल्ली सरकारच्या कामांमध्ये तसेच कल्याणकारी योजनांमध्ये अडथळे निर्माण करत आहेत, असा आरोप मुख्यमंत्री आतिषी आणि अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.

‘केजरीवाल मॉडेल’ विरुद्ध ‘मोदी मॉडेल’

‘आप’ सरकारचा हा मुद्दा खोडून काढताना पंतप्रधान म्हणाले की, “लक्षात ठेवा, जिथे ‘आपत्ती’ सरकारचा सहभाग नाही, तेथील विकासकामे चांगल्या पद्धतीने सुरू आहेत. दिल्ली विकास प्राधिकरण हे त्याचे उदाहरण आहे. यामध्ये राज्य सरकारचा फारसा हस्तक्षेप नाही. गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी घरं बांधणं… पाइपलाईनने घरापर्यंत गॅस पोहोचवणं, यासारख्या योजनांवर आपत्ती सरकारचे मंत्री काहीच बोलत नाहीत. कारण, त्यात दिल्ली सरकारचा कोणताही सहभाग नाही.” दरम्यान, केजरीवाल मॉडेल विरुद्ध मोदी मॉडेलचा उल्लेख करून पंतप्रधानांनी दिल्ली निवडणुकीचे रणशिंग फुंकलं आहे. त्यामुळे दिल्लीतील जनता कोणत्या पक्षाच्या पाठीशी उभी राहणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Story img Loader