मोहन अटाळकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमरावती : गेल्‍या काही दिवसांपासून हिंदुत्‍ववादी संघटनांच्‍या झेंड्याखाली पश्चिम विदर्भात काढण्‍यात येत असलेल्‍या हिंदू जनआक्रोश मोर्चात भाजपाचे पहिल्‍या फळीतले नेते सहभागी होताना दिसत नसले, तरी या निमित्‍ताने पडद्याआड राहून मतांच्‍या धृवीकरणाचा प्रयोग राबवण्‍याचा हा प्रयत्‍न असल्‍याचे स्‍पष्‍टपणे दिसून आले आहे.

जातीयदृष्‍ट्या संवेदनशील असलेली शहरे तसेच युतीमुळे भाजपाला आजवर ज्‍या मतदार संघांमध्‍ये लढतीची संधी मिळू शकली नाही, अशा ठिकाणी शक्‍तीप्रदर्शन करण्‍याची संधी म्‍हणून अशा आयोजनांसाठी भाजपाकडून रसद पुरवली जात असल्‍याचे चित्र आहे. या कामी हिंदुत्‍ववादी संघटनांची मदत घेतली जात आहे.

हेही वाचा >>> भाजपमध्ये पंकजा मुंडेच्या विरोधात नवनव्या खेळी

शासनाने लव्‍ह जिहाद आणि धर्मांतराच्‍या विरोधात कायदा करावा या मागणीसाठी हे मोर्चे काढले जात आहेत. गेल्‍या महिन्‍यात अमरावतीत हिंदू धर्मरक्षण मूक मोर्चाचे आयोजन करण्‍यात आले. सकल हिंदू समाज, विश्‍व हिंदू परिषद, बजरंग दल, शिव प्रतिष्‍ठान, हिंदू हुंकार संघटना, श्रीराम सेना, हिंदू महासभा, हिंदू जनजागृती समिती, राजपूत करणी सेना या हिंदुत्‍ववादी संघटनांसह भाजपा आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. इतर ठिकाणी काढण्‍यात आलेल्‍या मोर्चातही अशा अनेक संघटनांचा सहभाग दिसून आला.

हेही वाचा >>> महाविकास आघाडीतील जागावाटपासाठी अजित पवारांचा तोडगा

अमरावतीच्‍या खासदार नवनीत राणा यांनी भाजप सरकारला पाठिंबा दिला आहे. आक्रमक हिंदूत्‍ववादी चेहरा म्‍हणून त्‍यांची ओळख प्रस्‍थापित होऊ लागली आहे. त्‍यांच्‍यासह भाजपाच्‍या जिल्‍हाध्‍यक्ष निवेदिता चौधरी या अमरावतीतील मोर्चाच्‍या अग्रस्‍थानी होत्‍या. बुलढाणा येथे काल-परवा काढण्‍यात आलेल्‍या हिंदू जनआक्रोश मोर्चात शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड, भाजप नेते विजयराज शिंदे, महिला आघाडी प्रमुख सिंधूताई खेडेकर आदी सहभागी झाले होते. यवतमाळ जिल्‍ह्यातील उमरखेड येथे काढण्‍यात आलेल्‍या मोर्चातही भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष नितीन भूतडा यांचा स‍क्रीय सहभाग होता.

हेही वाचा >>> सोलापूर आणि बारामतीच्या पाणी प्रश्नावर भाजपची संदिग्ध भूमिका

दुसरीकडे, बजरंग दल, विश्‍व हिंदू परिषदेसह हिंदुत्‍ववादी संघटनांनी ठिकठिकाणी तालुका पातळीवर शौर्ययात्रा आणि धर्मसभांचे आयोजन सुरू केले आहे. आपल्‍या वक्‍तव्‍यांमुळे वादग्रस्‍त ठरत आलेल्‍या कालीचरण महाराजांना या ठिकाणी भाषणासाठी आमंत्रित केले जात आहे. त्‍यांच्‍या ज्‍वालाग्राही वक्‍तव्‍यांमुळे या सभा गाजत आहेत. यातून आपले हेतू साध्‍य करून घेण्‍याचा भाजपाचा प्रयत्‍न लपून राहिलेला नाही.  देशात आणि राज्‍यात हिंदूत्‍ववादी विचारांचे सरकार आहे, त्‍यामुळे हिंदूंनी घाबरू नये, असा संदेश वक्‍ते देतात, त्‍यामुळेच केंद्रात आणि राज्‍यात भाजपाचे सरकार असताना मोर्चे काढण्‍याचे औचित्‍य काय, असा सवाल आता केला जात आहे.

अशा आयोजनांमधून जातीयवादी राजकारण केले जात असल्‍याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. भाजपाने मात्र आगामी निवडणुकांसाठी वातावरण निर्मिती सुरू केल्‍याचे स्‍पष्‍टपणे दिसून आले आहे. जातीयवादी राजकारणातून सत्‍ताप्राप्‍तीसाठी बहुजनांचा पाठिंबा मिळवण्‍याचा हा अंतस्‍थ हेतू असल्‍याचे बोलले जात आहे. दलित, आदिवासी, स्त्रिया, कष्टकरी समाज आणि धार्मिक अल्पसंख्यांक समाज अशा विकासापासून विन्मुख असणाऱ्या समाजघटकांचे भवितव्य या साऱ्या राजकारणात दुर्लक्षित केले जात असल्याची प्रतिक्रिया देखील उमटली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp emphasis on polarization of votes through hindu janakrosh march print politics news ysh
Show comments