नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, न्हावाशेवा-शिवडी अटल सेतू, जवाहरलाल नेहरु बंदर आणि आसपासच्या परिसरात उभ्या रहाणाऱ्या आणखी एका नव्या शहरामुळे गेल्या दशकभरापासून चर्चेत राहीलेल्या उरण, पनवेल परिसरावर भाजपने लक्ष केंद्रीत केल्याचे पहायला मिळाले. पनवेलमध्ये प्रशांत ठाकूर आणि उरण भागात महेश बालदी या दोन आमदारांच्या बळावर तिसऱ्या मुंबईवर हुकूमत गाजवू पहाणाऱ्या भाजपला नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मात्र उरण मतदारसंघात मोठे आव्हान उभे राहील्याचे चित्र पहायला मिळत आहे.

राज्य सरकारच्या माध्यमातून मोठया प्रमाणावर सुरु असलेले जमिनीचे अधिग्रहण, प्रकल्पग्रस्तांना योग्यवेळेत मिळत नसलेला मोबदला, दगडखाणींपासून कंटेनर यार्डापर्यत दिसेल त्या कामांवर सत्ताधारी नेत्यांचा वाढता प्रभाव यामुळे या भागातील सर्वसामान्य मतदारांमधील अस्वस्थता वाढू लागली असून मावळ लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या उरणमध्ये भाजपची मते वाढली असली तरी येथे महाविकास आघाडीची एकत्रित ताकदीचा सामना या पक्षाला करावा लागणार आहे.

हेही वाचा…हंगामी अध्यक्ष पदाच्या निवडीवरुन विरोधकांना आक्षेप का? संसदीय संकेत अव्हेरण्यात आलेत का?

मावळ लोकसभा निवडणुकीच्या निकालात उरण विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने १३ हजाराचे मताधिक्य मिळविल आहे. या मतदारसंघात अपक्ष म्हणून निवडून आलेले परंतु पहिल्या दिवसापासून भाजपसोबत असलेले महेश बालदी हे विद्यमान आमदार आहेत. उरणमध्ये काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शेतकरी कामगार पक्ष अशी मोठी एकत्रित ताकद आहे. त्यामुळे या मतदारसंघातून महाविकास आघाडीला मोठी आघाडी मिळेल असा तर्क सुरुवातीला बांधला जात होता. बालदी यांनी हे मताधिक्य १३ हजारांपर्यत रोखण्यात यश मिळवले असले तरी विधानसभेचा मार्ग मात्र भाजपला सोपा राहिलेला नाही हेच यातून स्पष्ट होत आहे.

आघाडीला अधिक यशाची अपेक्षा

उरण विधानसभा मतदारसंघात महायुतीचे विजयी उमेदवार श्रीरंग बारणे यांना ९१ हजार २८५ तर महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे यांना १ लाख ४ हजार ५३५ म्हणजे १३ हजार २५० असे मताधिक्य मिळाले आहे. आमदार महेश बालदी यांना २०१९ मध्ये ७५ हजार मते मिळाली होती. यामध्ये १५ हजार मतांची वाढ झाली आहे. उरण विधानसभा मतदारसंघात भाजपा वगळता शिंदे गट आणि अजित पवार गट यांची ताकद अल्प आहे. त्यामुळे भाजपाच्या मतांमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे उरणच्या विधानसभा मतदारसंघात शिवसेना(ठाकरे),शेतकरी कामगार पक्ष,काँग्रेस आणि राष्ट्रवादी(शरद पवार) त्याच बरोबर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व इतर संघटनांची आघाडी होती. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र निवडणूक लढवितानाचा अखंड शिवसेनेला ७० हजार तर शेतकरी कामगार पक्षाला ६० हजार अधिक काँग्रेस अशी जवळपास दीड ते पावणे दोन लाख मत मिळाली होती. लोकसभा निवडणुकीत मात्र महाविकास आघाडीला लाखभर मते मिळाली आहेत. मागील पाच वर्षात शेतकरी कामगार पक्षाचे अनेक कार्यकर्ते भाजपा मध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीची ताकद असूनही येथून फार मोठे मताधिक्य या आघाडीला मिळालेले नाही.

हेही वाचा…मंत्री धर्मरावबाबा आत्राम नाराज का झाले?

महाविकास आघाडीतील इच्छुकांची संख्या वाढली

महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत उरण विधानसभेत मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या आशा वाढल्या आहेत. निवडणूकीत विजयाची खात्री वाटू लागल्याने शिवसेना(ठाकरे गट) यांच्याकडून माजी आमदार मनोहर भोईर हे पुन्हा निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार विवेक पाटील हे कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी अटकेत आहेत. तरीही त्यांचा या मतदारसंघातील दबदबा कायम आहे. १९ जूनला झालेल्या त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने मतदारसंघात मोठे फलक झळकले होते. त्यामुळे शेकाप या मतदारसंघावर दावा करण्याच्या तयारीत आहेत. दुसरीकडे काँग्रेसने या मतदारसंघावर दावा सांगण्यास सुरुवात केली आहे. महाविकास आघाडीत जागेसाठी सुरु असलेली ही स्पर्धा भाजपच्या पथ्यावर पडू लागली आहे.

हेही वाचा…नांदेडमध्ये काँग्रेसची अशीही मोहिम

शेकापची मनधरणी

शेतकरी कामगार पक्षाने येथून उमेदवारीसाठी हट्ट धरु नये यासाठी उद्धव सेनेतील एक मोठा गट आतापासूनच सक्रिय झाला आहे. याठिकाणी भाजपला रोखायचे असेल तर महाविकास आघाडीत एकजूट असणे अनिवार्य आहे असे शेकाप आणि काँग्रेसला पटवून देण्याचा आमचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया उद्धव सेनेतील एका मोठया नेत्याने लोकसत्ताला दिली. आगामी विधान परिषदेत शेकापचे नेते जयंत पाटील यांचा विचार महाविकास आघाडीकडून केला जात आहे. असे झाल्यास उरणची जागा त्याबदल्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी सोडली जाऊ शकते असा प्रस्ताव महाविकास आघाडीत चर्चेत आहे.