अलिबाग: आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभुमीवर भारतीय जनता पार्टीने रायगड जिल्ह्यात मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. महायुतीला बाजूला ठेऊन रायगड मधून लोकसभा निवडणूक लढविण्याचे स्पष्ट संकेत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. त्यामुळे शिवसेना शिंदेगट आणि राष्ट्रावादी काँग्रेस अजित पवार गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुढील वर्षात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर भाजपने तयारी सुरू केली आहे. युत्या आघाड्यांची वाट न पाहता, प्रत्येक लोकसभा मतदारसंघात उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. याची प्रचिती चंद्रशेखर बावनकुळे महाविजय २०२४ मोहीमेच्या निमित्ताने आली. राज्यातील ४८ लोकसभेच्या जागांपैकी ४५ जागा आम्हाला जिंकायच्या आहेत. यापैकी एक रायगडची आहे, त्यामुळे रायगडचा पुढचा खासदार भाजपचाच असेल. धैर्यशील पाटील हे रायगड लोकसभेचे उमेदवार असतील, असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले. तर जनसंवाद रॅली दरम्यान अलिबाग विधानसभा मतदारसंघातून दिलीप भोईर यांना आमदार करायचे आहे की नाही असा सवालही त्यांनी उपस्थितांना केला. बावनकुळेह यांच्या या दौऱ्यानंतर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे रायगडचे विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे आगामी लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून या जागेवर हक्क सांगितला जाणे स्वाभाविक आहे. महायुतीच्या माध्यमातून खासदार सुनील तटकरे यांना पुन्हा एकदा लोकसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते. मात्र तरीही बावनकुळे यांनी आपल्या दौऱ्यात रायगडचा पुढील खासदार हा भाजपचाच असेल असे जाहीर करून टाकले. भाजपच्या दक्षिण रायगडचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील हे भाजपचे उमेदवार असतील असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले. त्यामुळे तटकरे यांना बाजूला ठेऊन भाजपने लोकसभा निवडणूकीची तयारी सुरू केल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा… ऊसदराचे राजकारण पेटले; पश्चिम महाराष्ट्रातील हंगामावर आंदोलनाची पडछाया

दुसरीकडे अलिबाग विधानसभा मतदारसंघासाठीही भाजपने तयारी सुरु केली असल्याचे त्यांनी जाहीर केले. जनसंवाद साधल्यानंतर उपस्थितांना सामोरे जातांना आगामी काळात दिलीप भोईर यांना आमदार करणार की नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ज्याला कार्यकर्त्यांनी एकमुखाने पाठींबा दिला. येवढेच नाही तर कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे त्यांनी निर्देशही दिले. पण, शिवसेना शिंदे गटाचे महेंद्र दळवी हे अलिबागचे विद्यमान आमदार आहेत. असे असूनही दिलीप भोईर यांचे नाव बावनकुळे यांनी पुढे केल्याने शिवसेना शिंदे गटाची अस्वस्थता वाढली आहे.

जिल्ह्यात २१० ग्रामपंचायतीसाठी सध्या सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या निवडणूकीत महायुतीतील घटक पक्षांची युती व्हावी यासाठी प्रयत्न सुरू होते. पण भाजपने शिवसेना शिंदे गटाला अंधारात ठेऊन, अनेक ग्रामपंचायतीत स्वताचे पॅनल उभे केले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढविण्याच्या इच्छेला खीळ बसला. शिवसेना आणि भाजप एकमेकांविरोधात निवडणूकीत उतरली असल्याचे चित्र तयार झाले. यामुळे भाजपची वाटचाल नेमकी कुठल्या दिशेने सुरू आहे, असा प्रश्न शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला पडला आहे.

एकूण ग्रामपंचायत निवडणूकीच्या माध्यमातून पक्षाची ताकद आजमावून पाहाण्याचा आणि त्यानंतर पुढील काळातील महायुतीबाबत निर्णय घेण्याचा धोरण स्विकारले असल्याचे दिसून येत आहे. पण भाजपच्या या भुमिकेमुळे महायुतीतील घटकपक्षात मात्र अस्वस्थता निर्माण झाली आहे, यात शंका नाही.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp in action mode in raigad district politics unrest among sunil tatkare print politics news dvr
Show comments