BJP to Face Strong Challenge in J&K Election 2024: लोकसभा निवडणुकांच्या काही महिने आधी म्हणजेच जानेवारी २०२४ मध्ये अयोध्येतील बहुप्रतिक्षित राम मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडला. यासाठी देशभरातून मान्यवरांना आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यात उपस्थित लावण्यावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये काही काळ राजकीय कलगीतुराही रंगल्याचं पाहायला मिळालं. एकंदरीतच अयोध्येमध्ये राम मंदिराच्या उभारणी व उद्घाटन सोहळ्याचा भारतीय जनता पक्षाला लोकसभा निवडणुकीत फायदा होईल असं मानलं जाऊ लागलं. पण निकाल मात्र याच्या उलट लागले. प्रत्यक्ष अयोध्येचा समावेश असणाऱ्या फैझाबाद मतदारसंघात भाजपाचा पराभव झाला.

या पार्श्वभूमीवर आता जम्मू-काश्मीर विधनसभा निवडणुकीतही असाच एक मतदारसंघ चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे, तो म्हणजे श्री माता वैष्णो देवी विधानसभा मतदारसंघ! निवडणुकांपूर्वी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जम्मू-काश्मीरमधील ज्या मतदारसंघांचा दौरा केला, त्यातील एक रईसी जिल्ह्यातील याच श्री माता वैष्णो देवी मतदारसंघातील कटरा या शहराला दिलेली भेट होती. इथेच वैष्णोदेवी मंदिर यात्रेच्या यात्रेकरूंसाठी बेसकॅम्प लावला जातो. १९ सप्टेंबर रोजी पंतप्रधानांनी कटरामध्ये केलेल्या भाषणात “इथे अशा सरकारची गरज आहे जे आपल्या श्रद्धा व संस्कृतीचा आदर करेल”, अशी भूमिका मांडली होती.

नव्याने निर्माण झालेला मतदारसंघ!

वैष्णो देवी मंदिर पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्षासाठी कायमच महत्त्वाचं राहिलं आहे. २०१४ साली पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून आपल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करण्यापूर्वी नरेंद्र मोदींनी याच मंदिरात पूजा केली होती. यावेळी हे महत्त्व दुप्पट झालं आहे. कारण २०२२ साली जम्मू-काश्मीरमधील मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर रईसी व उधमपूर मतदारसंघांमधून श्री माता वैष्णो देवी विधानसभा मतदारसंघ स्वतंत्रपणे नव्याने अस्तित्वात आला आहे. या मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यामध्ये मतदान पार पडलं आहे. पण भाजपासाठी धाकधूक कमी झालेली नाही.

अयोध्येतील पराभवानंतर पक्षानं माता वैष्णो देवी मतदारसंघात एकही कसर सोडली नसल्याचं पक्षातील नेत्यांकडून सांगितलं जात आहे. मात्र, त्यानंतरही भाजपाला या मतदारसंघात विजय मिळणं कठीण दिसत आहे. याआधी रईसी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणारे भाजपाचे उमेदवार बलदेव राज शर्मा यांच्यासमोर तगड्या उमेदवारांचं आव्हान आहे.

बारीदारांचं सर्वात मोठं आव्हान!

शर्मा यांच्यासमोर सगळ्यात मोठं आव्हान असेल ते बारीदार अर्थात वैष्णो देवी मंदिराच्या रखवालदार समुदायाचं. आधी हा समुदाय भारतीय जनता पक्षाच्या पाठिशी उभा राहिला होता. पण यंदा या समुदायानं शाम सिंह यांच्या रुपात त्यांचा स्वत:चा उमेदवार उभा केला आहे. जर शाम सिंह यांना या समुदायाची १४ हजार मतं मिळाली, तर ते माता वैष्णो देवी मतदारसंघातले जायंट किलर ठरू शकतात!

बारीदार समुदायाकडून गेल्या अनेक पिढ्यांपासून माता वैष्णो देवी मंदिरात आरती केली जाते. मात्र, आपल्याला मंदिरात संपूर्ण पूजाविधी करण्याचा अधिकार मिळावा, तसेच मंदिराच्या ट्रस्टमध्ये आपल्या कुटुंबियांना नोकरीचं आरक्षण असावं अशी मागणी या समुदायाकडून सातत्याने केली जात आहे. २०१४ साली नरेंद्र मोदींनी या मुद्द्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र ते पूर्ण न झाल्यामुळे या समुदायामध्ये फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाली आहे.

UP Bypoll Election : भाजपा पोटनिवडणुकीतून अयोध्येतील पराभवाचा बदला घेणार? सपाविरोधात मोठी खेळी, अखिलेश यादवांची रणनिती ठरली!

भाजपाकडून सारवासारव…

दरम्यान, बारीदार समुदायाच्या या भूमिकेवर भाजपाकडून मात्र वेगळी भूमिका मांडली जात आहे. “माता वैष्णो देवी मंदिर कायदा १९८६च्या अंमलबजावणीनंतर बारीदार समुदायाकडून काही आक्षेप घेण्यात आले. मात्र, त्यावर योग्य त्या पद्धतीने लक्ष दिलं गेलं नाही. २०१४ साली नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतरच कटरा शहर व माता वैष्णो देवी मंदिराकडे योग्य त्या पद्धतीने लक्ष दिलं गेलं आहे. भाजपाच्या २०२४ साठीच्या जाहीरनाम्यात बारीदार समुदायाचे मुद्दे समाविष्ट केले आहेत”, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री व उधमपूरचे खासदार जितेंद्र सिंह यांनी सोशल मीडियावर दिली आहे.

काँग्रेसकडूनही तगडं आव्हान!

दरम्यान, बारीदार समुदायाप्रमाणेच भाजपा उमेदवार शर्मा यांना काँग्रेसचे भूपिंदर सिंह यांच्याकडूनही तगडं आव्हान मिळण्याची शक्यता आहे. भूपिंदर सिंह हे कटरा ते वैष्णो देवी मंदिर या मार्गावरील पोनीवाला व पिठुस सदस्यांच्या संघटनेचे अध्यक्ष होते. या भागात शर्मा यांची सारी भिस्त ९ हजार मुस्लीम मतांवर असणार आहे.

त्याशिवाय, नुकतेच काँग्रेस पक्षाला रामराम करून गुलाम नबी आझाद यांच्या डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पक्षात दाखल झालेले जुगल किशोर हेही अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्या पाठिशीही या मतदारसंघातील मोठा मतदारवर्ग असल्याचं बोललं जात आहे.