काँग्रेस नेते राहुल गांधी वायनाडबरोबरच रायबरेली मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघामध्ये राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपाच्या दिनेश प्रताप सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, त्यांच्या उमेदवारीवरून पक्षाअंतर्गतच बरीच नाराजी असल्याकारणाने त्यांचे आव्हान डळमळीत होताना दिसत आहे. त्यांच्याविरोधात त्यांच्याच पक्षातील नेत्यांमध्ये असंतोषाची भावना आहे. यामुळे दिनेश प्रताप सिंह यांच्यासमोर राहुल गांधींचे नव्हे तर स्वपक्षीयांचेच आव्हान उभे राहिले आहे. अशा परिस्थितीत गृहमंत्री अमित शाह यांनी मध्यस्थी करुन या प्रकरणावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपा आमदाराची नाराजी काँग्रेसच्या पथ्यावर

रायबरेली मतदारसंघामध्ये विधानसभेच्या पाच मतदारसंघांचा समावेश होतो. त्यापैकी रायबरेली मतदारसंघातील आमदार अदिती सिंह आणि उंचाहर मतदारसंघातील आमदार मनोज कुमार पांडे यांच्यामध्ये दिनेश प्रताप सिंह यांच्याबद्दल नाराजीची भावना आहे. अदिती सिंह या काँग्रेसमधून भाजपामध्ये आलेल्या आहेत. मनोज कुमार पांडे हे समाजवादी पार्टीचे आमदार आहेत. या मतदारसंघातून आपल्यालाच लोकसभेची उमेदवारी मिळेल, अशी आशा त्यांना होती. त्यांनी अधिकृतपणे अद्याप भाजपामध्ये प्रवेश केलेला नसला तरीही त्यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चा जोरदार आहेत. रायबरेली हा नेहरु-गांधी घराण्याचा बालेकिल्ला राहिलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये या दोघांचीही नाराजी काँग्रेसच्या पथ्यावर पडताना दिसते आहे. पक्षाअंतर्गत असलेली नाराजी दूर करण्यासाठी गृहमंत्री अमित शाह यांनी स्वत: या प्रकरणामध्ये लक्ष घातले आहे.

हेही वाचा : पंजाबमधील शेतकऱ्यांचा भाजपाला विरोध; प्रचारफेरी विरोधात निदर्शने आणि काळे झेंडे!

अमित शाह यांचा मध्यस्थीचा प्रयत्न

रायबरेलीला दिलेल्या भेटीदरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दोघांनाही शांत करण्याचा प्रयत्न केला असल्याचे भाजपाच्या सूत्रांनी सांगितले आहे. रायबरेलीमधील विधानसभेच्या पाच मतदारसंघांमधील चार मतदारसंघांमध्ये समाजवादी पार्टीचे प्राबल्य आहे. २०२२ च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये समाजवादी पार्टीने उंचाहार, बचरावन, हरचंदपूर आणि सरेणी या चार जागांवर विजय मिळवला होता. फक्त रायबरेली जागेवर भाजपाच्या अदिती सिंह यांचा विजय झाला होता. अमित शाह यांनी गेल्या रविवारी (१२ मे) रायबरेलीतील प्रचारादरम्यान मनोज कुमार पांडे यांच्या घरी दिनेश प्रताप सिंह यांच्यासमवेत भेट दिली. समाजवादी पार्टीमध्ये असूनही मनोज कुमार पांडे यांनी फेब्रुवारीतील राज्यसभा निवडणुकीमध्ये भाजपाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता; पण लोकसभा निवडणुकीत तिकीट मिळण्याची अपेक्षा असलेल्या पांडे यांनी दिनेश प्रताप सिंह यांना पाठिंबा देण्यास नकार दिला आहे. मनोज पांडे हे रायबरेलीमधील एक प्रमुख ब्राह्मण नेते आहेत. ते उंचाहार मतदारसंघातून समाजवादी पार्टीच्या तिकिटावर तीनवेळा आमदार राहिलेले आहेत. रायबरेलीमध्ये ११ टक्के ठाकूर आणि २५ टक्के दलितांच्या तुलनेत ब्राह्मण समाजाची लोकसंख्या सुमारे १८ टक्के आहे.

“भाजपाचा प्रचार केल्यास योग्यवेळी बक्षीस”

रायबरेली मतदारसंघातून आपल्याला लोकसभा निवडणुकीचे तिकीट मिळेल, या आशेवर मनोज कुमार पांडे यांनी भाजपाला पाठिंबा दिला होता. तिकीट मिळाले असते तर त्यांनी भाजपामध्ये अधिकृतपणे प्रवेश केला असता. युती असो वा नसो, या आधीच्या निवडणुकांमध्येही समाजवादी पार्टीने अमेठी आणि रायबरेलीची जागा काँग्रेससाठी सोडलेली आहे. त्यामुळे रायबरेलीतून समाजवादी पार्टीकडून लोकसभेची उमेदवारी मिळणार नाही, याची खात्री मनोज कुमार पांडे यांना होती. म्हणूनच त्यांनी भाजपाकडून असलेली शक्यता तपासून पाहिली होती. २७ फेब्रुवारी रोजी झालेल्या राज्यसभा निवडणुकीमध्ये त्यांनी भाजपाच्या बाजूने मतदान केले होते. मात्र, तिकीट न मिळाल्याने त्यांची घोर निराशा झाली. या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि समाजवादी पार्टी एकत्रितपणे निवडणूक लढवत असून काँग्रेसला १७ जागा मिळाल्या आहेत.

रायबरेली मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आलेले दिनेश प्रताप सिंह हेदेखील आधी काँग्रेसमध्येच होते. ते तीनवेळा विधान परिषदेचे आमदार राहिलेले आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सोनिया गांधींकडून त्यांचा १.६७ लाखांनी पराभव झाला होता. त्या निवडणुकीमध्ये सोनिया गांधी या उत्तर प्रदेशमधून काँग्रेसकडून निवडून येणाऱ्या एकमेव उमेदवार ठरल्या होत्या. मनोज कुमार पांडे यांनी भाजपामध्ये अधिकृतपणे प्रवेश केलेला नाही. कारण दिनेश प्रताप सिंह यांचा उघडपणे प्रचार केला तर आहे ते विधानसभेचे सदस्यत्वदेखील गमवावे लागेल अशी भीती त्यांना आहे, असे भाजपाच्या अनेक नेत्यांचे म्हणणे आहे. भाजपाकडून लोकसभा उमेदवारीची अपेक्षा आणि दिनेश प्रताप सिंह यांच्याशी असलेले जुने वैर ही त्यांच्या सध्याच्या भूमिकेमागील खरी कारणे आहेत.

दिनेश प्रताप सिंह यांचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशीही त्यांची गोची झाली होती. भाजपाच्या अनेक स्थानिक नेत्यांनी मनोज पांडे यांना अर्ज भरताना उपस्थित राहण्याची विनंती केली होती. मात्र, ते त्यांच्याबरोबर गेले नाहीत. विशेष म्हणजे त्याच दिवशी त्यांच्या भावाने आणि मुलाने भाजपामध्ये प्रवेश केला होता. मनोज कुमार पांडे यांनी भाजपाच्या उमेदवारास उघडपणे पाठिंबा देऊन प्रचार केल्यास त्यांना योग्यवेळी पक्षाकडून बक्षीस दिले जाईल, असे आश्वासन अमित शाह यांनी दिले असल्याचे भाजपाच्या सूत्रांनी सांगितले आहे.

हेही वाचा : संपत्ती हिसकावून घेऊन ती घुसखोरांमध्ये वाटण्याचा काँग्रेसचा कट; मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा दावा

“तत्त्वांशी तडजोड करणे कठीण”

दुसऱ्या बाजूला अदिती सिंह या तब्बल सातवेळा रायबरेलीचे आमदार असलेले दिवंगत नेते अखिलेश सिंह यांच्या कन्या आहेत. मात्र, त्यादेखील दिनेश प्रताप सिंह यांचा प्रचार करताना दिसत नाहीत. रायबरेलीमधील अमित शाह यांच्या जाहीर सभेत अदिती व्यासपीठावर उपस्थित राहिल्या होत्या; परंतु त्यांनी सभेला संबोधित करणे टाळले. अदिती सिंह यांनी गेल्या शनिवारी ‘X’ वर वडिलांबरोबरचा त्यांचा एक जुना फोटोही पोस्ट केला होता. त्यात त्यांनी तत्त्वांशी तडजोड करणे आपल्याला कठीण जात असल्याचे म्हटले होते. दिनेश प्रताप सिंह यांचे भाऊ अवधेश सिंह यांनी त्यांच्या कारवर हल्ला केला होता, असा आरोप अदिती सिंह यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान केला होता. त्यावेळी त्या काँग्रेसच्या आमदार होत्या. त्यानंतर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश करून २०२२ च्या विधानसभेची निवडणूक जिंकली. असे असले तरीही अदिती सिंह यांचे दिनेश प्रताप सिंह आणि त्यांच्या भावाबरोबरचे मतभेद अद्याप दूर होऊ शकलेले नाहीत. उमेदवाराचा विचार न करता पक्षासाठी प्रचार करावा, असा सल्ला मनोज कुमार पांडे आणि अदिती सिंह या दोघांनाही शाह यांनी दिला असल्याचे भाजपाच्या सूत्रांनी सांगितले आहे. रायबरेली आणि अमेठी या दोन्ही मतदारसंघासाठी पाचव्या टप्प्यात २० मे रोजी मतदान होणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp in rae bareli amit shah rahul gandhi in rae bareli lok sabha seat vsh
Show comments