PM Modi Mission South यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने ‘अब की बार ४०० पार’ अशी घोषणा दिली आहे. भाजपाला हे माहीत आहे की, दक्षिण भारताच्या मदतीशिवाय भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला ४०० जागा जिंकणे अशक्य आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मिशन दक्षिण’ सुरू केले आहे. दक्षिण भारतात ते एकापाठोपाठ एक रोड शो, रॅली, सभा, हजारो कोटींच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्यात दक्षिणेकडील पाच राज्यांमध्ये सभा घेतल्या. आगामी लोकसभा निवडणुकीत एनडीएला ४०० हून अधिक जागा जिंकता यावा, यासाठी राज्यात भाजपा मैदानात उतरली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या १० दिवसांत, पंतप्रधान मोदींनी दक्षिणेकडील तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या पाचही राज्यांना अनेक वेळा भेटी दिल्या. मंगळवारी पंतप्रधान केरळमधील पलक्कड येथे होते. त्यानंतर त्यांनी तामिळनाडूतील सेलम येथे सभेला संबोधित केले. सोमवारी (१८ मार्च) कर्नाटकातील शिवमोग्गा येथे जाण्यापूर्वी त्यांनी तेलंगणातील जगतियाल येथे जाहीर सभेत भारत राष्ट्र समिती (बीआरएस) वर निंदा केली. त्यांनी तामिळनाडूमधील कोईम्बतूर येथे रोड शो केला. कोईम्बतूरमध्ये त्यांनी १९९८ च्या बॉम्बस्फोटातील बळींना श्रद्धांजली वाहिली.

गेल्या आठवड्यात, पंतप्रधानांनी आंध्र प्रदेशातील पालनाडू येथे एनडीएच्या रॅलीला, तेलंगणातील नागरकुर्नूल, केरळमधील पठाणमथिट्टा आणि तामिळनाडूच्या कन्याकुमारी येथे जाहीर सभांना संबोधित केले.

२०१९ च्या निवडणुकीत भाजपाने किती जागा जिंकल्या?

भाजपाने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पाच राज्यांतील १२९ जागांपैकी २९ जागा जिंकल्या होत्या. कर्नाटकात २८ पैकी २५, तेलंगणात १७ पैकी चार जागा जिंकल्या होत्या, तर केरळ आणि तामिळनाडूमध्ये भाजपाला एकही जागा जिंकता आली नाही. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केरळचे प्रभारी प्रकाश जावडेकर यांनी यंदाच्या निवडणुकीत पक्षाचा विजय होईल, असा आत्मविश्वास व्यक्त केला आहे. दक्षिण भारतात भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येईल, असेही त्यांनी सांगितले आहे. “काँग्रेस अध्यक्ष खरगे म्हणतात की, दक्षिण भारत भाजपा मुक्त आहे. पण मी खात्रीने सांगू शकतो की, लोकसभा निवडणुकीनंतर भाजपा दक्षिणेतील सर्वात मोठा पक्ष असेल, तर एनडीए सर्वाधिक जागा जिंकेल,” असे ते म्हणाले.

पंतप्रधानांचे भाषण समजण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर

दक्षिण भारतात भाषेचा अडथळा दूर करण्यासाठी पंतप्रधानांच्या भाषणांचे स्थानिक भाषेसह दक्षिणेकडील इतर भाषांमध्ये भाषांतर करण्यात येत आहे. यासाठी भाजपा मशीन लर्निंगसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. १६ मार्चला आचारसंहिता लागू होण्याआधी, पंतप्रधान मोदींनी राज्यात अनेक विकासप्रकल्पांचे उद्घाटन केले. विशेष म्हणजे इतर राज्यातील भेटींदरम्यानही व्हर्च्युअल माध्यमातून त्यांनी दक्षिण भारतातील प्रकल्पांचे उद्घाटन केले.

उदाहरणार्थ, १२ मार्चला अहमदाबादमध्ये विकास प्रकल्पांचा शुभारंभ करताना पंतप्रधान मोदींनी दक्षिण-सिकंदराबाद-विशाखापट्टणम, म्हैसूर-चेन्नई, पुरी-विशाखापट्टणम आणि कलबुर्गी-बेंगळुरू या चार नवीन वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. त्याचप्रमाणे, त्यांनी ११ मार्चला गुरुग्राम येथे एका कार्यक्रमादरम्यान आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये ६ हजार कोटी रुपयांच्या महामार्ग प्रकल्पाची घोषणा केली. उत्तर प्रदेशातील आझमगढ येथून पंतप्रधानांनी कडप्पा (आंध्र प्रदेश), हुब्बल्ली आणि बेलगावी (कर्नाटक) येथे विमानतळ टर्मिनल्सची पायाभरणी केली. यासह त्यांनी श्रीनगरमधील विकसित भारत कार्यक्रमादरम्यान दक्षिणेकडील राज्यांमध्ये मंदिर आणि पर्यटन विकास प्रकल्पांची घोषणा केली.

हेही वाचा : माजी राजदूतांच्या भाजपा प्रवेशाने आप-काँग्रेसची डोकेदुखी वाढणार? कोण आहेत तरनजीत सिंग संधू?

फेब्रुवारीमध्ये पंतप्रधान मोदी यांनी दक्षिण भारताच्या पाच राज्यांमधील शैक्षणिक संस्था, रेल्वे प्रकल्प, महामार्ग प्रकल्प, पाइपलाइन इत्यादी अनेक प्रकल्पांचे उद्घाटन केले. मोदी सरकारने ९ फेब्रुवारी रोजी मूळचे तमिळनाडू येथील प्रसिद्ध कृषी शास्त्रज्ञ दिवंगत एम. एस. स्वामिनाथन यांना भारतरत्न देण्याचीही घोषणा केली.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp in south india for loksabha polls rac