Sudhir Mungantiwar on Assembly Election 2024: नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला महाराष्ट्रात हाराकिरी सहन करावी लागली. भाजपाच्या खासदारांची संख्या २३ वरून नऊवर आली. यानंतर भाजपाने आपल्या रणनीतीमध्ये बराच बदल केला असल्याची माहिती महाराष्ट्राचे मंत्री, भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि भाजपाच्या निवडणूक जाहीरनामा समितीचे अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. सुधीर मुनगंटीवार यांनाही चंद्रपूर लोकसभेतून पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. यावेळी ते पुन्हा एकदा बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून उभे राहिले आहेत. लोकसभेच्या पराभवानंतर भाजपाने आता विधानसभेला कशी तयारी केली जात आहे, याबद्दलची माहिती द इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी दिली. प्रश्नोत्तराच्या स्वरुपात मुलाखत खालील प्रमाणे…

प्र. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपामध्ये काय बदल झाला?

मुनगंटीवार : लोकसभा निवडणुकीत आम्हाला महाविकास आघाडीच्या अपप्रचाराचा फटका बसला, हे अगदी उघड आहे. दलितांचा विरोध, संविधानात बदल होण्याच्या अपप्रचारामुळे महाविकास आघाडीला यश मिळाले. आम्ही या अपप्रचाराला प्रभावी उत्तर देण्यात कुठेतरी कमी पडलो. मात्र, आता विधानसभा निवडणुकीत आम्ही सर्व खबरदारी घेतली आहे.

प्र. तुम्ही खबरदारी घेतलेल्या काही उपाययोजना सांगू शकता?

मुनगंटीवार : आम्ही संघटनात्मक पातळीवर सूक्ष्म नियोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. आता विरोधकांच्या अपप्रचाराला तात्काळ प्रत्युत्तर दिले जाते. केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हे दोघेही महाराष्ट्र निवडणुकीचे बारकाईने विश्लेषण करत असून वेळोवेळी त्यांच्याकडून मार्गदर्शन करण्यात येते. भाजपाच्या काही महत्त्वाच्या नेत्यांना जिल्हानिहाय जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. प्रत्येक दिवसाचा अहवाल तयार करून तो वरिष्ठ नेत्यांना पाठवला जातो.

हे वाचा >> Political Nepotism: राष्ट्रवादी काँग्रेसच्या यादीतही घराणेशाहीची झलक; सर्वपक्षीय ‘पॉलिटिकल नेपोटिझम’ला उत

प्र. हरियाणा निवडणुकीनंतर काय परिणाम झाला?

मुनगंटीवार : देशाची किंवा कोणत्याही राज्याची निवडणूक महत्त्वाची असते. त्यामध्ये साधर्म्य नसते. पण, जेव्हा एका राज्यात विजय होतो तेव्हा त्याचा निश्चितच सकारात्मक परिणाम इतर राज्यांवर पाहायला मिळतो. कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्यासाठी हे निकाल महत्त्वाचे ठरतात.

प्र. पण लोकसभेला लोकांनी जो निर्णय घेतला, त्याबद्दल काय?

मुनगंटीवार : लोकसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीच्या मतदानात केवळ दोन लाखांचा फरक होता. आमच्या जागा घटल्या असल्या तरी आमची मतदानाची टक्केवारी कायम राहिली आहे. मुंबईमध्ये तर आम्ही मविआपेक्षा दोन लाख अधिक मते घेतली होती. लोक आमच्या विरोधात नव्हते. एक गोष्ट ध्यानात घ्या, पांडवांनाही एकदा पराभवाचा सामना करावा लागला होता. याचा अर्थ ते युद्ध हरले असा नाही.

प्र. ही निवडणूक भाजपासाठी महत्त्वाची का?

मुनगंटीवार : महाराष्ट्राची निवडणूक ही सत्ता मिळविण्यासाठी नाही. अर्थव्यवस्थेसाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. देशाच्या जीडीपीमध्ये महाराष्ट्राचा वाटा १४ टक्के इतका आहे. अनेक क्षेत्रांत महाराष्ट्र देशाचे नेतृत्व करत आहे. पंतप्रधान मोदींनी २०४७ रोजी विकसित भारताचे जे स्वप्न डोळ्यासमोर ठेवले आहे, त्यात महाराष्ट्राचा महत्त्वाचा वाटा असणार आहे; त्या दृष्टीने महाराष्ट्राची निवडणूक महत्त्वाची आहे.

प्र. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या निवडणुकीत महत्त्वाच्या भूमिकेत आहे? लोकसभा निवडणुकीत संघाने अंतर राखले होते..

मुनगंटीवार : हे सत्य नाही. मी संघ परिवारातूनच आलो आहे. राजकीय पक्षासाठी मोर्चे काढायचे ही संघाची कार्यपद्धती नाही. ते लोकांना राष्ट्रहिताच्या विषयासंदर्भात आवाहन करतात. लोकसभा निवडणुकीत संघ सक्रिय नव्हता, हा आरोप चुकीचा आहे. त्यांनी लोकसभेतही मदत केली होती आणि आताही ते आमच्या पाठीशी आहेत. यावेळी ते विशिष्ट गटांकडे पोहोचण्याऐवजी घरोघरी जात आहेत. संघ व्यक्तीपूजेवर विश्वास ठेवत नाही, मातृभूमीची सेवा हेच त्यांचे ध्येय आहे.

प्र. महायुतीमध्ये वर्चस्ववादाची लढाई आहे का?

मुनगंटीवार : महायुतीमध्ये वर्चस्ववादाची कोणतीही लढाई नाही. महायुतीमधील तीन घटक पक्ष तीन नद्यांप्रमाणे वाहत असून त्यांचा पुढे मोठा संगम होतो. तीनही पक्षाचे नेते एकदिलाने काम करत आहेत. एकनाथ शिंदेंसारखे एक चांगले मुख्यमंत्री आम्हाला लाभले आहेत.

प्र. महिलांची मते मिळविण्यात लाडकी बहीण योनजेचा लाभ होईल?

मुनगंटीवार : सरकारने महिलांना प्रतिमहिना दीड हजार रुपये दिले, यात आक्षेप घेण्यासारखे काय आहे? सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सहावा आणि सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी ४४ हजार कोटींचा निधी राखून ठेवला जातो. हा कर्मचाऱ्यांचा अधिकार आहे आणि याबद्दल कुणीही प्रश्न उपस्थित करत नाही. पण, विरोधक लाडकी बहीण योजनेवर आक्षेप घेतात हे धक्कादायक आहे. ही फक्त एक योजना आहे. याशिवाय आम्ही शेतकऱ्यांना मोफत वीज दिली. मुलींना उच्च शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण मोफत उपलब्ध करून दिले. महायुती आणि मविआ सरकारला जवळपास सारखाच सत्तेतला काळ मिळाला. आमच्या काळात आम्ही विकासावर भर दिला, तर मविआने त्यांच्या काळात फक्त भ्रष्टाचार केला.

हे वाचा >> शरद पवारांना फोडाफोडीचे नोबेल पारितोषिकच दिले जावे, खासदार उदयनराजेंचा टोला

प्र. सरकार पाडणे आणि पक्ष फोडण्याच्या आरोपाबाबत काय वाटते, याचे तुम्ही समर्थन करता?

मुनगंटीवार : महाराष्ट्रात याची सुरुवात कुणी केली? १९७८ साली शरद पवारांनी ४० आमदार बरोबर घेऊन वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडले होते. त्यांनी इतर पक्षांशी हातमिळविणी करत आघाडीचे सरकार स्थापन केले आणि मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर त्यांनी उद्धव ठाकरेंना बरोबर घेऊन युतीतून बाहेर पाडण्यास भाग पाडले. कोण चूक आणि कोण बरोबर, हे लोकांच्या सर्व लक्षात आहे.