सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसचा वाळव्याचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करण्यासाठी भाजपकडून निशीकांत भोसले पाटील हेच उमेदवार असतील असा निर्वाळा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी इस्लामपूर भेटीवेळी दिला. यामुळे भाजप महायुतीतील मित्रपक्षांच्या साथीने आमदार जयंत पाटील यांना राज्यभर दौरे न करता मतदारसंघातच अडकवून ठेवण्याची रणनीती अवलंबत असल्याचे दिसून येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाळवा मतदारसंघ म्हणजे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असे म्हणण्याऐवजी आमदार जयंत पाटील यांचा पारंपारिक मतदारसंघ असे म्हणणे उचित ठरेल. कारण गेल्या तीन दशकांपासून या मतदारसंघावर आमदार जयंत पाटील यांचे वर्चस्व राहिले आहे. विविध सहकारी संस्थांच्या माध्यमातून आमदार पाटील या संघावर वर्चस्व राखून आहेत. राजारामबापू उद्योग समुहाच्या माध्यमातून आपले वर्चस्व कायम ठेवत राज्याच्या राजकारणातही अग्रेसर राहिले आहेत. राष्ट्रवादीच्या माध्यमातून सरकारमध्येही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली असून सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे राज्य पातळीवर नेतृत्व करीत आहेत. राज्यात युतीची सत्ता आल्यानंतर झालेल्या नगरपालिका निवडणुकीवेळी थेट नगराध्यक्ष निवडीमध्ये निशीकांत पाटील यांनी विजय मिळवत राज्याचे लक्ष वेधून घेतले. इस्लामपूरमध्ये आमदार पाटील यांच्या उमेदवाराचा पराभव होऊ शकतो हे सिद्ध करण्यात त्यावेळी भाजपला यश आले. यामुळे आमदार जयंत पाटील यांचा समर्थपणे लढत देऊ शकेल असा चेहरा म्हणून माजी नगराध्यक्ष पाटील यांचा चेहरा पुढे आला. मात्र, गत निवडणुकीवेळी ही जागा युतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला गेली. भाजपकडून पाटील यांनी तयारीही केली होती. मात्र, युतीच्या जागावाटपात शिवसेनेला जागा सोडावी लागल्याने पाटील यांनी अपक्ष लढत दिली. तिरंगी लढतीत आमदार पाटील विजयी झाले. आता मात्र, ही चूक टाळण्याचा प्रयत्न भाजपकडून आतापासूनच सुरू आहे.

हेही वाचा – रायगडमध्ये राष्‍ट्रवादी – शिवसेना शिंदे गटात दिलजमाई?

हेही वाचा – पप्पू कलानींचे वजन अजित पवारांच्या पारड्यात?

आमदार पाटील यांचे विरोधक एकत्र येत नाहीत हेच त्यांच्या वर्चस्वाचे मूळ गणित आहे. कारण नगरपालिका निवडणुकीत विकास आघाडीच्या झेंड्याखाली भाजप, काँग्रेस, शिवसेना, महाडिक ग्रुप स्वाभिमानी शेतकरी संघटना एकत्र आले होते. यावेळची परिस्थिती वेगळी आहे. माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा सध्या तरी एकला चलोचा नारा सुरू आहे. भाजपमध्येही महाडिक गट आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे. जिल्हा बँकेचे संचालक राहूल महाडिक यांनी तयारीही सुरू केली असून ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत काही गावामध्ये थेट सरपंच निवडीमध्ये त्यांना यशही मिळाले आहे. निशीकांत पाटील यांच्यासाठी पक्षानेच पुढाकार घेऊन मतभेद दूर करण्याचा प्रयत्न केला आणि एकास एक लढत देण्यासाठी नियोजन केले तर अर्धी लढाई यशस्वी ठरणार आहे. केवळ आगामी निवडणुकीत भाजपचाच आमदार मतदारसंघात असेल अशी घोषणा टाळ्या मिळविण्यासाठी ठीक आहे, मात्र, गावपातळीवर त्याचे नियोजन करण्याची आवश्यकता भाजपला भासणार आहे. गत निवडणुकीवेळचे संदर्भ आता बदलले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या गटाची सांगली जिल्ह्यातील जबाबदारी स्वत:कडे घेतली आहे. त्यांच्यात आणि आमदार पाटील यांच्यातील पक्षअंतर्गत असलेल्या सुप्त संघर्षाला आता नवा आयाम मिळाला आहे. यामुळे ते उघडपणे आमदार पाटील यांच्या विरोधासाठी पुढे आले तर आश्‍चर्य नाही. त्यांच्या कोल्हापूर दौर्‍यावेळी वाळवा तालुक्यात झालेले उत्साही स्वागत म्हणजे आमदार पाटील यांच्या विरोधाची पायाभरणीच मानली जात आहे. त्यात माजी मंत्री अण्णा डांगे यांची भूमिका गुलदस्त्यात असली तरी त्यांची अलिकडच्या काळात राष्ट्रवादी विरोधकांच्या बाबतीत येत असलेली वक्तव्ये निश्‍चितच आमदार पाटील यांच्यासाठी डोकेदुखी ठरण्याची चिन्हे आहेत. त्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी डांगे यांच्या संस्थेला वाट वाकडी करून दिलेली भेटही मतदारसंघात चर्चेचा विषय ठरली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp plan to keep ncp state president jayant patil stuck in the constituency print politics news ssb
Show comments