नवी दिल्ली : काश्मीर खोऱ्यात भाजपचे ‘ब’ चमू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पक्षांना आणि नेत्यांना पराभूत करण्याच्या उद्देशाने मतदान झाल्याचे नॅशनल कॉन्फरन्स (एनसी)-काँग्रेसच्या आघाडीच्या विजयातून स्पष्ट झाले आहे. खोऱ्यात ‘एनसी’च्या जागा कमी करण्याचे भाजपचे सर्व डावपेच अपयशी ठरले आहेत. जम्मू विभागात मात्र भाजपने २९ जागा जिंकून बाजी मारली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काश्मीर खोऱ्यातील ४७ जागांपैकी एनसीने ३५ जागा जिंकल्या असून काँग्रेसने ५ जागांवर विजय मिळवला. कुलगाममध्ये ‘माकप’चे युसूफ तारिगामीही विजयी झाले आहेत. जम्मू विभागातही एनसीने ७ जागा जिंकून भाजपला दणका दिला आहे. काँग्रेसला फक्त १ जागा जिंकता आली. त्यामुळे जम्मू आणि काश्मीरमध्ये ‘इंडिया’ आघाडीला ४९ जागा मिळाल्या आहेत. नायब राज्यपालांनी भाजपच्या पसंतीचे ५ सदस्य नियुक्त केले तरी भाजपला जम्मू-काश्मीर सरकार बनवता येणार नाही. ९५ जागांच्या विधानसभेमध्ये बहुमतासाठी ४८ जागांची गरज असेल.

काश्मीर खोऱ्यामधील इंजिनीअर रशीद, सज्जाद लोन, अल्ताफ बुखारी असे नेते भाजपचे पाठीराखे मानले गेले. त्यामुळे मतदारांनी त्यांना धुडकावून लावत नॅशनल कॉन्फरन्सला मते दिली. जमात, इंजिनीअर, बुखारी यांचा एकही उमेदवार जिंकू शकला नाही. भाजपने उभे केलेले सर्व नेते व पक्ष निष्प्रभ ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा : “मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करावा”; ‘मी पुन्हा येईन’ असे म्हटलेले नाही, उद्धव ठाकरे यांचा पुनरुच्चार

२०१४ मध्ये भाजपशी युती करून सत्ता स्थापन करणाऱ्या मेहबुबा मुफ्ती यांच्या ‘पीडीपी’ला केवळ ३ जागा मिळवता आल्या. मेहबुबा यांची मुलगी इल्तिजा मुफ्तीचाही पराभव झाला आहे. ‘पीडीपी’ची झालेली दुरवस्था पाहता खोऱ्यातील मतदारांनी पूर्णपणे भाजपविरोधात असंतोष व्यक्त केल्याचे दिसते.

मतदारसंघांच्या फेररचनेनंतर पुंछ व राजौरीमध्ये भाजपला लाभ मिळेल असे मानले जात होते. पण, राजौरीतील ५ पैकी २ जागा एनसी तर १ जागा काँग्रेसने जिंकली आहे. पुंछमधील ३ पैकी २ जागा एनसीने जिंकल्या. इतकेच नव्हे तर भाजपचा प्रभाव असलेल्या रामबनमधील दोन्ही जागांवर एनसीने विजय मिळवला आहे. जम्मू विभागात एनसीने ७ जागा जिंकण्याची करामत केली आहे.

जम्मू विभागामध्ये काँग्रेसने भाजपला आव्हान देणे अपेक्षित असताना फक्त एक जागा जिंकली. एनसी-काँग्रेस आघाडीमध्ये काँग्रेस अत्यंत कमकुवत ठरली आहे. याउलट, भाजपने ४३ पैकी २९ जागा जिंकून आश्चर्याचा धक्का दिला! काँग्रेसने जम्मू विभागाकडे दुर्लक्ष केल्यामुळे मतदारांना भाजपला मतदान करण्याशिवाय पर्याय उरला नसल्याचे दिसते. काश्मीर खोऱ्यात अनुच्छेद ३७० रद्द करण्याच्या केंद्राच्या निर्णयाविरोधात मतदान झाले असले तरी जम्मूमध्ये हा मुद्दा प्रभावी ठरला नसल्याचेही भाजपच्या यशातून स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा : गडकरींच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजपपुढे पेच, प्रचारात सहभागी करून घेण्याच्या प्रयत्नात अडचणी

त्रिशंकू विधानसभेचे मनसुबे धुळीला

काश्मीर खोऱ्यामध्ये इंजिनीअर रशीद यांची अवामी इत्तेहाद पार्टी, सज्जाद लोन यांची पीपल्स पार्टी, अल्ताफ बुखारी यांची अपना पार्टी, जमात-ए- इस्लामीचे अपक्ष, अन्य पक्षांचे उमेदवार व काही अपक्ष असा सगळा उमेदवारांचा गोतावळा उतरवूनही भाजपचे त्रिशंकू विधानसभेचे मनसुबे तिथल्या मतदारांनी धुळीला मिळवल्याचे स्पष्ट झाले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp s strategy of vote division in kashmir failed print politics news css