प्रदीप नणंदकर ,लातूर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उदगीर या आरक्षित विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय बनसोडे यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून ही जागा खेचून घेतली. भाजपचे सलग दोन वेळा निवडून आलेले आमदार सुधाकर भालेराव यांना पक्षाने तिकीट दिले नाही व त्याच्या ऐवजी परभणीचे डॉक्टर अनिल कांबळे यांना उमेदवारी दिली. मात्र, तो निर्णय भाजपला महागात पडला व तेलही गेले आणि तूपही गेले अशी भाजपची अवस्था झाली. आता राष्ट्रवादीची पकड ढिली करण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू झाले आहेत.

हेही वाचा >>> नांदेडमधील दोन ‘राज’कन्या कोण ?

२०१९ च्या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्रित निवडणूक लढवली. २०१४ साली निसटता पराभव स्वीकारलेले संजय बनसोडे यांनी चिवटपणे पुढील पाच वर्ष उदगीर विधानसभा मतदारसंघात आपला संपर्क ठेवला. त्यातून ते कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय झाले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या कार्यकर्त्यातील ऐक्य फारच उपयोगी झाले व दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे काम केल्यामुळे त्याचा लाभ संजय बनसोडे यांना झाला. या उलट भाजपात वाद हाेते. दोन वेळा निवडून आलेले सुधाकर भालेराव यांच्या विरोधात स्थानिकचे भाजपचे कार्यकर्ते असल्यामुळे पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारली व ऐनवेळी परभणीचे डॉ. अनिल कांबळे यांना उमेदवारी देऊ केली. मात्र, मतदारसंघात त्यांचा कसलाच संपर्क नसल्याने ते पराभूत झाले. पराभवानंतर गेल्या साडेतीन वर्षांमध्ये ते उदगीरमध्ये एकदाही फिरकले नाहीत. सुधाकर भालेराव यांच्या उमेदवारीला भाजपच्या स्थानिक नेत्यांनी तीव्र विरोध केला होता. 

हेही वाचा >>> महाविकास आघाडीत दबावतंत्राचा खेळ!

सुधाकर भालेराव यांनी बंडखोरी करण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यांना पुन्हा नव्याने पक्षांतर्गत अनुसूचित जाती मोर्चाची जबाबदारी दिली व  भालेराव हे पुन्हा मतदार संघातील लोकांशी संपर्कात आहेत. मात्र २०१९ च्या निवडणुकीमध्ये जे मनभेद झालेले आहेत ते  दूर कसे करणार, हा भालेराव यांच्या समोरील मोठा प्रश्न आहे .पक्षाची गरज म्हणून सर्वांनी एकत्र आले तरच विजय मिळतो, हे माहीत असूनही भाजपमधील अंतर्गत मतभेद संपलेले नाहीत. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्रितपणे निवडणूक लढवून संजय बनसोडे हे विजयी झाले असले तरी बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने उदगीर बाजार समितीत काँग्रेसचेच प्राबल्य अधिक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद बाजार समितीच्या निवडणुकीत दिसून आली नाही. त्यामुळे उदगीर बाजार समितीत सभापती व उपसभापती दोन्ही पदे काँग्रेसकडेच आहेत. जळकोट बाजार समितीत राष्ट्रवादी काँग्रेसला सभापती पद तर उपसभापती पद काँग्रेसला मिळाले आहे. या मतदारसंघातील दोन्हीही बाजार समित्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहेत .भाजपचा दोन्ही ठिकाणी दारुण पराभव झाला. त्यामुळे आरक्षित मतदारसंघात ताकद असूनही भाजप मागच्या बाकावर आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp started strong efforts to make comeback in udgir assembly constituency print politics news zws
Show comments