गडचिरोली : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सर्वच पक्षांनी उमेदवारीसंदर्भात चाचपणी सुरू केली आहे. त्याअनुषंगाने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीदेखील पार पडत आहेत. दुसरीकडे, भाजपकडून गडचिरोली आणि आरमोरी विधानसभेत उमेदवार बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्याने विद्यमान आमदारांच्या गोटात अस्वस्थता पाहायला मिळत आहे. त्यामुळे पक्षांतर्गत गटबाजीला ऊत आल्याचे चित्र आहे.

गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या नागपूर दौऱ्यादरम्यान महाराष्ट्रातही ‘गुजरात पॅटर्न’ राबवण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे विद्यमान आमदारांच्या मनात धडकी भरली. यानंतर गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी आणि गडचिरोली विधानसभा मतदारसंघांत भाजप नवा चेहरा देणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे. त्यामुळे गडचिरोलीचे विद्यमान आमदार डॉ. देवराव होळी आणि आरमोरीचे आमदार कृष्णा गजबे यांच्या समर्थकांत अस्वस्थता दिसून येत आहे.

हेही वाचा >>>अकोला पूर्ववरून महाविकास आघाडीत पेच

आमदार होळी यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत स्वपक्षातील नेतेच आपल्या विरोधात स्वाक्षरी मोहीम राबवीत असल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर भाजपमधील गटबाजी समोर आली. भाजपमधील एक मोठा गट आमदार होळी यांच्या विरोधात आहे. गडचिरोली विधानसभेत भाजपकडून संघ परिवाराच्या जवळचे डॉ. मिलिंद नरोटे, नुकतेच काँग्रेसमधून भाजपावासी झालेले माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी आणि माजी खासदार अशोक नेते इच्छुक आहेत. या तिघांनीही आपापल्या स्तरावर निवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे. नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत पक्षातील पदाधिकाऱ्यांनी उमेदवारीकरिता पसंती क्रमांक बंद लिफाफ्यात भरून दिला आहे. यात डॉ. नरोटे यांचे नाव आघाडीवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा >>>रस्ते विकास मंडळाचे गायकवाड यांचे पुत्र आमदारकीसाठी प्रयत्नशील

आरमोरी विधानसभेत तूर्त तरी आमदार गजबे वगळता भाजपकडून मोठा चेहरा समोर आलेला नाही. परंतु अंतर्गत गोटातील हालचाली लक्षात घेता भाजप या ठिकाणी ऐनवेळी नवा चेहरा समोर करून धक्कातंत्र वापरू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

अहेरी विधानसभा मतदारसंघातदेखील उमेदवारीवरून खडाजंगी सुरू आहे. येथे महायुतीकडून राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची उमेदवारी जवळपास निश्चित असल्यामुळे भाजपचे माजी आमदार अम्ब्रीशराव आत्राम अस्वस्थ आहेत. त्यामुळे लोकसभेत सत्ताविरोधी वातावरणाचा फटका बसलेल्या भाजपकडून उमेदवारीसंदर्भात सावध भूमिका घेतली जात आहे.

निवडणूक लढवण्यासाठी सर्वच पक्षांत अनेक इच्छुक असतात. भाजपमध्येही आहेत. त्यांनी आपली भूमिका पक्ष नेतृत्वाकडे मांडली आहे. त्यामुळे नेतृत्व जो निर्णय घेईल तो सर्वांना मान्य असेल. पक्षात कोणतीही गटबाजी नाही.- प्रशांत वाघरे, भाजप जिल्हाध्यक्ष