नाशिक : युतीच्या जागावाटपात तत्कालीन शिवसेनेकडून नेहमीच अडवणुकीचे धोरण स्वीकारले जात असे. त्यावेळी काँग्रेसला मजा येत असे. आता शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाकडून त्यांना खेळवले जात आहे, असा आरोप भाजपचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे यांनी केला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपतर्फे येथे स्थापन करण्यात आलेल्या उत्तर महाराष्ट्र विभागीय माध्यम केंद्राचे उद्घाटन सोमवारी तावडे यांच्या हस्ते झाले. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी महाविकास आघाडीतील जागा वाटपातील घडामोडींवर भाष्य केले. आघाडीच्या जागावाटप चर्चेत काँग्रेससाठी चांगली कामगिरी करणाऱ्या नाना पटोलेंसारख्या नेत्याला ठाकरे गटाच्या विरोधामुळे मागे जावे लागले. त्यांच्या जागी बाळासाहेब थोरातांसारख्या सौम्य नेत्याला पुढे करण्यात आले. हीच काँग्रेसची माघार असल्याकडे तावडे यांनी लक्ष वेधले.

हेही वाचा : Mahayuti Politics : पक्ष शिंदे अन् अजित पवारांचे, उमेदवार मात्र भाजपाचे! फडणवीसांच्या ‘या’ पाच शिलेदारांकडून समन्वयाचं राजकारण

महायुती सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजना शरद पवार यांना बंद करायची असल्याचा आरोप त्यांनी केला. या योजनेसाठी इतर योजनांचा पैसा कमी केल्याचे पवार यांनी म्हटले होते. त्यांना इतर योजनांना तो पैसा द्यायचा आहे. म्हणजे त्याचा लाभ मधल्या मंडळींना करून द्यायचा आहे, असे तावडे म्हणाले.

महाविकास आघाडीच्या गद्दारांचा पंचनामा प्रचारावर तावडेंनी टीकास्त्र सोडले. मुळात २०१९ ची निवडणूक भाजप-शिवसेना युती करून लढले होते. निवडणुकीनंतर जागांची संख्या पाहून उद्धव ठाकरे यांच्या मनात गद्दारीचा विचार आला. त्यांनी गद्दारी केल्यामुळे त्यास तोडीस तोड उत्तर २०२२ मध्ये देण्यात आले. नवाब मलिक विधानसभेसाठी अर्ज भरण्याच्या तयारीत असल्याच्या प्रश्नावर त्यांनी भाजपचे म्हणणे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या नेत्यांना सांगितले गेले असून त्या पक्षाकडून योग्य निर्णय घेतला जाईल, असा विश्वास व्यक्त केला.

हेही वाचा : Congress struggle : उमेदवार नाव नोंदणीसाठी उरला अवघा एक दिवस, काँग्रेसचा जागा निश्चितींसाठी संघर्ष, नाराजांची नाराजी घालवण्याचं आव्हान

शरद पवार यांनी मराठा समाजाला आरक्षण का दिले नाही ?

मंडल आयोग लागू झाला, तेव्हा शरद पवार यांना मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देता आले असते. परंतु, त्यांनी कधीही मराठा समाजाला आरक्षण दिले नाही, असा आरोप तावडे यांनी केला. भाजपने मराठा समाजाला आरक्षण दिले होते. महाविकास आघाडी सरकारला सर्वोच्च न्यायालयात ते टिकवता आले नाही. प्रचारात मराठा समाजाला हे वास्तव सांगितले जाणार असल्याचे ते म्हणाले.

Story img Loader