Gujarat Naroda Village Massacre : नरोडा पाटिया गावातील हत्याकांडप्रकरणी येथील विशेष न्यायालयाने सर्व ६९ आरोपींची गुरूवारी निर्दोष मुक्तता केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या विशेष तपास पथकामार्फत या प्रकरणाचा तपास करण्यात आला. गुजरात दंगलीच्या खटल्यांचा जलद निपटारा करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयामध्ये ५ एप्रिलला खटल्याची कार्यवाही संपली होती. न्यायाधीश शुभदा बक्षी यांनी गुरुवारी संध्याकाळी निकाल जाहीर केला. यावेळी ६९ आरोपींची विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. भाजपच्या माजी आमदार माया कोदनानी, बजरंग दलाचे नेते बाबू बजरंगी, विश्व हिंदू परिषदेचे नेते जयदीप पटेल हे या खटल्यात प्रमुख आरोपी होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माया कोडनानी यांच्याबद्दल

माया कोडनानी यांनी १९९० च्या दशकात भाजपाच्या कार्यकर्त्या म्हणून काम करत असताना आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. पेशाने स्त्री रोग तज्ज्ञ असलेल्या माया कोडनानी यांना अहमदाबादच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. १९९५ साली पहिल्यांदा त्या अहमदाबाद महानगरपालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या. महानगरपालिकेत स्थायी समितीचे अध्यक्षपदासारखे महत्त्वाचे पदही त्यांनी सांभाळले होते. १९९८ साली त्यांनी अहमदाबादच्या नरोडा विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला. काँग्रेसच्या उमेदवाराचा ७४,५०० इतक्या मोठ्या मताधिक्याने त्यांनी पराभव केला होता. २००२ च्या दंगलीनंतरही त्यांनी याच मतदारसंघातून २००३ साली पुन्हा एकदा विजय मिळवत एक लाखांचे मताधिक्य घेतले होते. त्यानंतर भाजपाने त्यांना अहमदाबाद अध्यक्षपदाची जबाबदारी दिली.

हे वाचा >> गुजरात दंगल आणि नरेंद्र मोदींवरील ‘बीबीसी’चा माहितीपट Youtube आणि ट्विटरवर ब्लॉक, केंद्राच्या आदेशानंतर कारवाई

२००७ मध्ये १ लाख ८० हजारांचे प्रचंड असे मताधिक्य घेऊन त्या नरोडा विधानसभेत तिसऱ्यांदा निवडून आल्या. यावेळी मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात त्यांना महिला व बाल विकास आणि उच्च शिक्षण विभागाच्या राज्यमंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आली.

मात्र नरोडा पाटिया हत्याकांडात नाव गोवले गेल्यामुळे माया कोडनानी यांच्या राजकीय कारकिर्दीला खीळ बसली. २८ फेब्रुवारी २००२ रोजी अहमदाबादमध्ये मुस्लीम समाजाच्या विरोधात दोन हत्याकांड घडले होते. एक नरोडा गाम येथे मुस्लीम समाजाची घरे जाळल्यामुळे ११ लोकांचा मृत्यू झाला होता. तर दुसऱ्या प्रकरणात नरोडा पाटिया येथील मुस्लीम मोहल्ल्यावर हल्ला केल्यानंतर ९७ लोक मारले गेले होते. या दोन्ही प्रकरणात माया कोडनानी आरोपी होत्या. त्यांच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, गुन्हेगारी कट रचणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते.

२७ मार्च २००९ रोजी गुजरात उच्च न्यायालयाने नरोडा पाटिया प्रकरणी कोडनानी यांचा अंतरीम जामीन फेटाळल्यानंतर त्यांनी आपल्या राज्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या विशेष चौकशी पथकासमोर शरणागती पत्करली. ऑगस्ट २०१२ रोजी विशेष सत्र न्यायालयाने विद्यमान भाजपा आमदार असलेल्या कोडनानी यांच्यासह ३० आरोपींना नरोडा पाटिया हत्याकांडाप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. न्यायाधीश ज्योत्सना याग्निक यांनी कोडनानी यांना या हत्याकांडातील किंगपिन (kingpin) म्हणजेच महत्त्वाची सूत्रधार असल्याचे त्यावेळी संबोधले होते.

माया कोडनानी यांना शिक्षा सुनावल्यामुळे २०२१ साली झालेल्या निवडणुकीत नरोड येथून भाजपाने डॉ. निर्मला वाधवानी यांना उमेदवारी दिली. पण यावेळी मताधिक्य घटले. वाधवानी या ५८ हजारांच्या आसपास मताधिक्य घेऊन निवडून आल्या.

एप्रिल २०१८ साली, गुजरात उच्च न्यायालयाने कोडनानी आणि इतर १७ आरोपींना नरोडा हत्याकांडाच्या पहिल्या प्रकरणातून निर्दोष मुक्त केले होते. त्यावेळी कोडनानी वैद्यकीय उपचारांसाठी जामीनावर बाहेर होत्या. गुरुवारी (दि. २० एप्रिल) नरोड हत्याकांडाच्या दुसऱ्या प्रकरणात देखील त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. मात्र त्यांना आता पुन्हा सक्रिय राजकारणात सहभागी होता येईल का? याबाबत भाजपाने कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही.

हे वाचा >> विश्लेषण : गुजरात दंगल, आणीबाणी… मोदी सरकारचे एनसीईआरटीच्या पुस्तकांमध्ये आठ वर्षांत बदल

जयदीप पटेल कोण आहे?

गुरुवारी नरोद गाव हत्याकांडात ज्या ६९ आरोपींची मुक्तता करण्यात आली. त्यात विश्व हिंदू परिषदेचे माजी सह सरचिटणीस जयदीप पटेल (वय ६३) यांचाही समावेश होता. प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून शिक्षण घेतलेले जयदीप पटेल हे नरोडा भागात पॅथॉलॉजी चालवत होते. २००२ साली गोंध्रा येथे रेल्वे जळीत कांडानंतर उसळलेल्या दंगलींमध्ये सहभागी झालेल्या प्रमुख व्यक्तींपैकी पटेल एक होते. जयदीप पटेल यांना अटक झाल्यानंतर विश्व हिंदू परिषदेत ते सक्रीय नव्हते. मात्र गेल्या काही दिवसांपासून ते पुन्हा सक्रिय झाले आहेत. आदिवासींसाठी काम करणाऱ्या व्हिएचपीच्या भारतीय जन सेवा संस्थान या संघटनेचे ते राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. पटेल यांना निर्दोष सोडल्यानंतर द इंडियन एक्सप्रेसने त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ते म्हणाले, “मी आता भगवान श्रीनाथ यांचे दर्शन घ्यायला निघालो आहे. देवाने अखेर माझी प्रार्थना ऐकली आणि माझ्यावर कृपादृष्टी केली.”

बाबू बजरंगी कोण आहे?

माया कोडनानी यांच्याप्रमाणेच बाबू राजाभाई पटेल उर्फ बाबू बजरंगी हा देखील नरोडा गाम आणि नरोडा पाटिया या दोन्ही हत्याकांडातील आरोपी होता. नरोडा गाम हत्याकांडात सरकारी वकिलांनी बजरंगी यावर प्रमुख आरोपी असल्याचा ठपका ठेवला होता. हत्या, हत्येचा प्रयत्न, गुन्हेगारी स्वरुपाचा कट रचने, गर्दीला चिथावणी देणे, दंगल पेटवणे असे गुन्हे त्याच्यावर दाखल होते.

बजरंगी पटिदार जातीमधील कडवा पटिदार या उपजातीचे प्रतिनिधित्व करतात. अनेक वर्ष बजरंग दलाशी संबंध असल्यामुळे बाबू पटेल यांचे नाव बाबू बजरंगी असे घेतले जात होते. या गुन्ह्यात अटक झाल्यानंतर गेली अनेक वर्ष ते बजरंग दलात सक्रिय नाहीत. २००७ साली एक खासगी वृत्तवाहिनीने २००२ च्या गुजरात दंगलीचे एक स्टिंग ऑपरेशन दाखवले होते. ज्यामध्ये काही लोकांनी गुजरातच्या दंगलीत सहभाग असल्याचे सांगितले होते. ज्यामध्ये बाबू बजरंगीचाही समावेश होता. सरकारी वकिलांनी याच स्टिंग ऑपरेशनचा आधार घेऊन बजरंगी यांनी दंगलीच्या गुन्ह्यात सहभाग असल्याचा कबुली जबाब दिल्याचे सांगितले होते.

२०१७ साली पटिदार आरक्षण आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांनी बजरंगी यांना हिंदुत्वाचे खरे नायक असे संबोधले होते. बजरंगी यांनी सध्या एक संघटना स्थापन केली असून हिंदू मुलींना फसवून इतर धर्मात लग्न केलेल्यांना धडा शिकवणे आणि हिंदू मुलींची सुटका करण्याचे कार्य करतात.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjps maya kodnani vhps jaydeep patel bajrang dals babu bajrangi were acquitted by the court in the naroda village massacre kvg
Show comments